पिंपरी चिंचवड शहरातील बहुचर्चित व प्रलंबित विषय असलेल्या प्राधिकरणातील शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के जमीन परताव्याचा प्रश्न उपलब्ध जमीन व चटई क्षेत्र निर्देशांक देऊन मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
गेली चार वर्षापासून या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे प्रयत्नशील होते. यासंदर्भात २९ नोव्हेंबर २०१५ व २१ जून २०१६ अशा दोन वेळेस नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासमवेत चाबुकस्वार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळेस सकारात्मक चर्चा होऊन अंतिम मान्यतेसाठी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी आजच्या बैठकीत सादर करण्यात आला. नुकतेच २४ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या सर्व आमदासमवेत घेतलेल्या बैठकीतही आमदार चाबुकस्वार यांनी श्री. ठाकरे यांच्याकडे या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी विनंती केली होती. व मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले होते. त्यानुसार हा प्रश्न निकाली लावावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांना श्री. ठाकरे यांनी त्यावेळी दिले होते.
यानंतर लगेचच आजच्या आठव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळातील आपल्या कार्यालयात याविषयी आज बैठक घेतली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश खडके, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगरानी, डॉ. नितीन करीर, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे या बैठकीत उपस्थित होते.
शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्यासाठी ११ हेक्टर क्षेत्र कमी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी निर्दशनास आणून दिले त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘जेवढी जागा उपलब्ध आहे त्यामध्ये ५० टक्के शेतकऱ्यांना जागा दया व उर्वरित शेतकऱ्यांना चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे’ आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयानंतर आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे प्राधिकरणातील सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून आमदार चाबुकस्वार यांचे विधीमंडाळाच्या आवारात पेढे भरून स्वागत केले.
चौकट
अरे… हा…? मग तर,
हा प्रश्न सुटलाच पाहिजे – मुख्यमंत्री
आपण भाजप चे प्रदेशाध्यक्ष असताना या प्रश्नी निगडी येथे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेट दिली होती व ‘हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ’ असे आपण म्हटले होते, अशी आठवण आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.
ही जुनी आठवण लक्षात येताच मुख्मंत्र्यांनी ‘अरे… हा… मग तर हा प्रश्न सुटलाच पाहिजे’ असे म्हणत हसून दाद दिली.