स्वातंत्र्यप्राप्तीपासून जेवढया निवडणूका झाल्या तेवढया निवडणूकांमध्ये प्रारंभीची ४८ वर्षे काँग्रेसने नंतर राष्ट्रवादीने तर त्या पुढे सेना-भाजपने आंबेडकरी ताकदीचा बोन्साय करून ठेवला होता. या प्रस्थापित राजकारणी मंडळींनी व राष्ट्रीय पक्षांनी कायम ओसरीपर्यंतच आंबेडकरी नेत्यांना ठेवलेले होते. मात्र वंचित आघाडीमुळे बळ प्राप्त झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी एकाचवेळी काँग्रेसला व भाजपलाही अस्मान दाखवण्याचा निर्धार केला. काँग्रेस नेत्यांना बोट धरण्यापर्यंत वंचित ठिक वाटली पण वंचित थेट आख्खा हातच पकडायला मागते आहे ही कल्पना त्यांनाही सहन झाली नाही. अखेर या निवडणूकीत काँग्रेसला जेवढा फाजील आत्मविश्वास नडला तेवढीच वंचितला आपल्या डोक्यात गेलेली हवा नडली.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर वंचित आता दखल घेणारी शक्ती ठरली असली तरी प्रकाश आंबेडकरांचा अकोला व सोलापूर या दोन्ही ठिकाणांहून झालेला पराभव आंबेडकरी जनतेसह तमाम वंचित वर्गाच्या आता जिव्हारी लागला आहे. वंचितचा एकही उमेदवार राज्यात निवडून येऊ शकला नाही याचे सर्वांना दु:ख तर आहेच शिवाय वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला ९ मतदारसंघात फटका बसला व त्याचा मोदींना लाभ झाला हे देखील तितकेच वास्तव आहे. एकमेकांना जोखण्यात व समजण्यात उशीर झाल्याने वंचितसह काँग्रेस व राष्ट्रवादीलाही पराभव पत्कारायला लागला हे वास्तव नाकारून चालत नाही. मोदींची जरी त्सुनामी आली असली तरी पुरोगामी अशी प्रतिमा असलेल्या महाराष्ट्रात ३२ जागांच्या पुढे भाजप-सेना जाऊच शकली नसती हे निर्विवाद सत्य आहे.
असे गृहीत धरू की, वंचित आघाडीचा जन्मच झाला नसता तर आज जी वंचितला ४० लाखाच्या आसपास मते पडली आहेत ती हमखास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारडयात पडणारी होती या मुद्दयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वंचितच्या सभांना महाराष्ट्रभरात मिळणारा प्रचंड प्रतिसाद, लाखा-लाखाची होणारी गर्दी पाहून समविचारी काँग्रेसशी युती झाल्यास वंचितला बळकटी येईल असा विश्वास सर्वांना वाटत होता. काँग्रेसनेही प्रारंभी सहा जागा देण्यास संमती दर्शविली होती. आजपर्यंत दलित नेत्यांना आपल्यामागे फरफटत नेणाऱ्या काँग्रेसने आपल्या राजकीय आयुष्यात प्रथमच राजगृहाच्या (प्रकाश आंबेडकरांच्या घरी) उंबरठयावर तीनदा पाऊल टाकले. एकीकडे वंचितचा राज्यभरात सभांचा सुरू असलेला जोर, दुसरीकडे काँग्रेसशी होणारी चर्चा, जागा वाटपाबाबत दोघांचेही मुद्दे एकमेकांना पटत नसताना अखेर वंचितने ‘तुम्ही ज्या जागांवर तिसऱ्या क्रमांकावर आलेले आहात त्या जागा दया’ अशीही मागणी करून पाहिली. परंतू ही मागणीही काँग्रेसच्या पचनी पडली नाही. आंबेडकरांशी युती करण्यास काँग्रेस पुढाकार घेत असली तरी राष्ट्रवादीची त्यास एकप्रकारे मूक संमतीच होती. परंतू राष्ट्रवादीनेही जे काही व्हायचे ते काँग्रेसच्या बोली चालीतून झालेले बरे, आपण आपले अंग चोरलेले बरे… असाच पवित्रा धरला होता.
वंचित जर राष्ट्रवादीच्या हक्कांच्या जागेवर हक्क सांगू लागली तर त्यांना दूर लोटलेलेच चांगले अशा पावित्र्यात शरद पवार होते. वंचितने ताणल्याने स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचाही आवाज चढून त्यांचीही जागांची मागणी वाढली होती. दरम्यान, एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच वंचित उमेदवारांची नावे जाहीर करत घोषणा करण्याचा सपाटा लावू लागल्याने चर्चा थांबली आणि काँग्रेसही वंचितचा नाद सोडून देत आपल्या कामाला लागली.
या साऱ्या घडामोडींकडे भाजपची चाणक्य मंडळी बारीक लक्ष ठेऊन होती. काँग्रेस आपल्या प्रतिष्ठेपेक्षा खाली उतरायला तयार नाही आणि वंचित आपला हेका सोडायला तयार नाही याच्या उकळ्या सर्वात जास्त मुख्यमंत्र्यांना फुटू लागल्या. अशातच शिवाजी पार्क दादर येथे सभेसाठी वंचितने राज्य शासनाकडे अर्ज सादर करायचाच अवकाश की शासनाने त्यास तात्काळ मंजूरी देऊन वंचितला वाढण्यासाठी एकप्रकारे खतपाणीच दिले. भाजपची खेळी नंतर अशी बदलली की, त्यांनी महायुतीतील रामदास आठवले व महादेव जानकर या दोघांनाही विचारले नाही. कारण वंचितने अधिक संख्येने धनगर समाजातील मंडळींना तिकीटे जाहीर करून नाराज धनगरांची मते काँग्रेसकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली. जी भाजपला प्रचंड सोयीची ठरली.
वंचितला मिळणारी मते ही काँग्रेस राष्ट्रवादीचीच हक्काची मते असणार हे आठवीतील पोरगा देखील सांगू शकतो असे सर्वसाधारण सूत्र असताना वंचितने एकाचवेळी काँग्रेसला व भाजपला दोघांनाही अंगावर घेत रणशिंग फुंकले. आणि अपेक्षेप्रमाणे भाजप व सेनेचा दणदणीत विजय झाला. जर काँग्रेस व वंचितची युती झाली असती तर प्रकाश आंबेडकरांसह किमान चार जण आज खासदार म्हणून दिल्लीत हमखास गेले असते. वंचितच्या कार्यकर्त्यांना उभारी आली असती, चैतन्याची लाट विधानसभेपर्यंत टिकली असती आणि काँग्रेसला विधानसभेसाठी वाकवण्यात जोर वाढला असता हे नाकारून चालणार नाही.
भाजपने एकही जागा आरपीआयला म्हणजेच आठवलेंना न सोडताही उलट या सारखा सन्मान नाही असे मानत आठवले मुख्यमंत्र्यांच्या पुढे मागे फिरण्यात मश्गुल होताना गेल्या तीन दिवसांपासून दिसत आहेत. वंचित आली नसल्याचा आनंद त्यांनाही झालाच असणार..! आठवलेंनीच म्हटल्याप्रमाणे आता मोदी कमीत कमी खोटे बोलतील असा आशावाद बाळगत ते कॅबिनेटचा चमचा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर वंचित पुन्हा आपले अस्तित्व अधिक जोमाने सिद्ध करण्यासाठी विधानसभेच्या तयारीला लागला आहे.
वंचितमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा झालेला पराभव असा जो टाहो फोडला जातोय तो बऱ्याच जणांना मान्य नाही. का तर इतर राज्यांत ही काँग्रेसचा पराभव झालायच की ? असं काहींचं म्हणणं आहे.
मोदींची खतरनाक त्सुनामी लाट असतानाही ५४२ पैकी फक्त ३०३ जागांवर भाजप आली. उरलेल्या इतर २३९ जागांवर अन्य पक्ष आलेतच की…! याचाच अर्थ या २३९ जागांवर निवडून आलेले सक्षम, खंबीर, समजदार व मोदीला हरविण्यासाठी तयारी केलेले होते. प्रकाशजी आंबेडकर जेव्हा काँग्रेस बरोबर वाटाघाटी बोलणी करत होते याचा सरळ अर्थ आंबेडकरांना माहित होता की, वंचितची मते व काँग्रेसची मते कुठल्याही परिस्थितीत भाजपला जाणार नाही. का तर काँग्रेस व वंचितची विचारधारा जवळपास समान आहे. जागावाटपावरून पटले नाही यात काँग्रेस बरोबर वंचितचेही तितकेच नुकसान झाले. वंचित ही सुरूवात होती तशी काँग्रेसला १५० वर्षांची परंपरा आहे. काँग्रेस शून्यही होते व शंभरही होत असते. काँग्रेसला फक्त टेकूची गरज होती तशी स्थिती वंचितची नव्हती. बोलणी फिस्कटली म्हणून तर मिडियापासून सारेजण वंचितमुळे नुकसान झाल्याचे बोलतात. जर वंचितने काँगरेस बरोबर चर्चाच केली नसती तर आपलेच घोडे पुढे दामटले असते तर प्रश्नच नव्हता.
त्यामुळे राहून राहून काँग्रेस च्या पराभवास वंचितला जबाबदार धरलेच जाणार आहे. काँग्रेस कायमची नपुंसक जरी झाली तरी तिने सर्व काही भोगलेले आहे तर वंचितची ही जस्ट सुरूवात होती.
वंचितची उभारी तेज रफ्तार होणेसाठी दमदार सुरूवातीलाच काही अंशी विजयाची गरज होती.