भाग – २
आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे ताब्यात आली होती. साथीला असलेले दुसरे आमदार महेश लांडगे या दोघांनी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली. १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जवळून पाहिल्याने व त्यामध्ये सहभागीही असल्याचा अनुभव असल्याने राष्ट्रवादीची बलस्थाने, कच्चे दुवे याचा पक्का अभ्यास रेडी होता.
आता निवडणूकीच्या तोंडावर पक्षामध्ये कोणाकोणाला इनकमिंग करावे लागेल, कोण स्वत:हून येईन याचीही आखणी करण्यात आली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ताकदवान असलेल्या कार्यकर्त्यांना, विद्यमान नगरसेवकांना जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात थेरगावमध्ये विशेष जोर देण्यात आला. दरम्यान भाजपमध्ये येण्यासाठी प्रत्येकजण धडपड करू लागला. परिस्थिती अशी झाली की, प्रत्येक प्रभागात चार-पाच बलाढय कार्यकर्ते एका जागेसाठी तिकीट मागण्याच्या स्पर्धेत असल्याचे चित्र होते.
एखादा किल्ला जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे तेथे जाणारे रस्ते, छुप्या वाटा, गुप्तहेरांचे जाळे पेरणे आदींची तयारी करावी लागते त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागाची रेकी झाली. केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने जाहीर सभांचे मैदान गाजविण्यासाठी प्रभावी वक्ते व टिम तयार होत्या. याचबरोबर राजकारणात कोण कायमचा शत्रू नसतो व कायमचा मित्रही नसतो या उक्तीनुसार राष्ट्रवादीचे या शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांना भाजपच्या पंखाखाली आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी फत्ते झाली. आझमभाईच्या भाजप प्रवेशाने सर्वचजण अवाक झाले. भाजपच्या जून्या निष्ठावंताना न्याय देण्याबरोबर नव्याने आलेल्यांनाही संधी देण्याची फार मोठी कसरत करावी लागत असल्याचे ते दिवस होते.
परंतू यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी समतोल साधत नाराजी व संघर्ष होण्याचे जवळजवळ टाळले. नरेंद्र मोदी सत्तास्थानी येऊन अवघ्या २६ महिन्यांचा कालावधी लोटलेला असल्याने त्या लाटेचा प्रभाव व धग कायम होती. स्थानिक वॉर्ड किंवा प्रभाग पातळीवरील निवडणूक ही संबंधित व्यक्तीची प्रतिमा, प्रतिष्ठा, त्याचे कार्य व पक्ष या चार मापदंडावर जिंकली जात असल्याने व जिंकण्यासाठी जे जे मार्ग अवलंबावे लागतात त्या त्या आयुधांचा वापर भाजपकडून यावेळी झाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहास २०१७ ची ही निवडणूक फारच रंगतदार ठरणारी होती. कारण भाजपचे अवघे तीन नगरसेवक ही पार्श्वभूमी असताना तोच भाजप प्रचंड ताकदीने मैदान जिंकण्यासाठी रणागणांवर उतरला होता.
दोन्ही आमदारांनी कोणाला तिकीटे बसवायची, कोण कितपत प्रभावी आहे याची यादी प्रदेश भाजपला व मुख्यमंत्र्यांना दिली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही पूर्ण पाठिंबा व सहकार्य आमदार जगताप यांना दिले होते. वेळप्रसंगी तातडीचे निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्यही दिल्याने राष्ट्रवादीला आता सत्तेतून दूर करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले. हे दोन्ही आमदार आझमभाई पानसरे, अमर मुलचंदानी हे निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे सूत्रधार बनले होते.
आणि अपेक्षेप्रमाणे निकाल फडकला. ७६ जागांवर भाजप, राष्ट्रवादी ३७, मनसे १, शिवसेना ९ आणि अपक्ष ५ असे चित्र स्पष्ट झाले. निर्विवाद बहुमत मिळवून भाजप सत्तेवर आला. राष्ट्रवादी पक्ष तर भाजपच्या या विजयाने हँग झाला. दादांना हरवणं सोपं काम नव्हतं भाजप वाल्यांना हे माहित होतं, १९८६ ला महापालिका स्थापनेपासून ते कालपर्यंत या शहरातील फुटपाथापासून ते प्रचंड मोठया प्रकल्पाच्या कोनशिलेवर, ‘पवार’ या नावाचीच पाटी आजपर्यंत झळकली होती. या शहरातून वाहणाऱ्या हवेला व त्याद्वारे उमटलेल्या प्रत्येक तरंगालाच फक्त पवारांचे नाव देणे बाकी राहिले होते. आता चित्र बदलले होते. या दैदिप्यमान यशाचा भाजपमध्ये आयुष्य झिजवलेल्यांचाही पटकन विश्वास बसत नव्हता. गेली २५ वर्षे सत्तेच्या झोक्यावर असलेल्या दादांच्या ५७ उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते होती. त्यातील काहीजण तर काठापर्यंत पोहोचले पण होते. २००२, २००७ आणि २०१२ अशी सलग तीनदा पिंपरी चिंचवड महापालिकेवर अजितदादांची सत्तारुपी हुकूमत असल्याने राज्यभरातील तमाम राजकारणी अजित दादांचे दुसरे नाव पिंपरी चिंचवड असे पुकारत असतं ते आता बंद होणार होतं..! तीन नगरसेवकांचा हा भाजप अडीच पायांचा झालेला असतानादेखील त्यांनी घेतलेली भरारी चकित करणारी होती. अजितदादांनी जे झाड लावलं, पाणी घातलं, खत घातलं, वाढवलं ते झाडंच आता त्यांच्या अंगावर कोसळलं होतं. क्रमश: उद्या वाचा शेवटचा भाग ३. यामध्ये भाजप सत्तेच्या दोन वर्षात काय झाले? काय नाही झाले? लोकांच्या अजून काय अपेक्षा आहेत?