विजय जगताप-
प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असते असे म्हणतात. पराकोटीचे राजकीय हाडवैर असलेल्यांना बदलत्या परिस्थितीनुसार नाईलाजास्तव बदलावे लागते. भाजप आणि शिवसेनेमध्ये काल झालेल्या युती करण्याच्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आता एकमेकांविरोधात पेरलेले सुरूंग काढून तिथे तुपाचे दिवे लावण्याची वेळ युतीमधील दोन्ही पक्षातील नेत्यांवर आता येणार आहे.
गेली पाच वर्षे एकमेकांच्या विरोधात गरळ ओसणारे हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्दयाखाली एकत्र आलेले असले तरी पिंपरी चिंचवड शहर जिल्हयाच्या राजकारणात या पक्षाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेले मतभेद हे मनभेदाच्याही पलिकडे गेलेले होते. मात्र सारे काही विसरून आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालण्याची पाळी या युतीने त्यांच्यावर आणली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ऐनवेळी शेकापच्या तिकीटावर उभे राहिलेल्या लक्ष्मण जगताप यांनी कडवी झुंज दिली होती. या लढतीला पक्षीय स्वरूपापेक्षा वर्चस्ववाद, स्थानिक पातळीवर सर्वश्रेष्ठ कोण? असे स्वरूप आले होते. पराभूत झाल्यानंतर पुढे जगताप यांनी भाजपात प्रवेश करणे, विधानसभेला निवडून येणे आदी गोष्टी घडल्या असल्या तरी या दोघांमधील राजकीय कटूता किंचितही कमी झालेली नव्हती. यापूर्वी २००९ ला झालेल्या विधानसभा निवडणूकीतही हे दोघे एकमेकांच्या विरोधात होते. त्यावेळी शिवसेनेकडून असलेल्या बारणे यांचा अपक्ष उमेदवार जगताप यांनी पराभव केला होता.
गेली काही महिने युती होईल न होईल असे वातावरण असताना भाजपला मात्र मावळमधून लढण्याची तीव्र इच्छा होती. जरी युतीचा विद्यमान खासदार सेनेचा असला तरी कशीही करून ही जागा भाजपच्या पदरात पाडून घेण्याच्या हालचालीही झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी निगडीत पक्ष कार्यक्रमासाठी येऊन एक सभाही ठोकली होती व युती होऊन अजूनही या जागेची मागणी भाजप करीत आहे. आजच (मंगळवार) पिंपरी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मावळची जागा भाजपला सोडण्याची मागणी केली आहे. युती झाली असली तरी मावळची जागा कुणी लढवायची हे निश्चित झालेलं नाही. मात्र मावळ मधून लढण्यास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारणे यांना तयारी करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. असे असतानाही भाजपचा जीव मात्र या जागेसाठी तळमळत आहे.
पुणे जिल्हयाच्या राजकारणात पुणे शहराचा अपवाद वगळता २५ लाख लोकसंख्येच्या पिंपरी चिंचवड शहरात भाजपचा खासदार होण्यास कधीच संधी प्राप्त झालेली नाही. २००९ पर्यंत या शहराचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात व्हायचा आणि शरद पवारांचा होल्ट येथे कायमचाच असायचा. २००९ ला लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली. शिरूर, मावळ, बारामती, पुणे असे चार लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. शिरूरमधून सेनेचे आढळराव पाटील हे सलग विजयी होत असल्याने भोसरीकरांना आपले खासदार सेनेचे आहेत ही भावना वाटायची व भाजपला त्याची सल रूतायची. मावळमधून २००९ आणि २०१४ ला सेनेचेच खासदार झाले त्यामुळे भाजपला पुणे शहर वगळता संपूर्ण जिल्हयात भाजपचा खासदार युतीमुळे होत नसल्याची वेदना ठसत आली आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातून आता चौथ्यांदा सेनेच्या तिकिटावर शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात उतरले आहेत. भाजपने मागील तीन वर्षापासून तयारीचा भाग म्हणून आमदार महेश लांडगे यांना येथे चाचपणी व तयारी करण्यास सांगितलेही त्यादृष्टीने लांडगे यांनी तयारीही केली व वातावरणही निर्माण केले. मात्र युतीधर्मानुसार पुन्हा शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचाराची धूरा भाजपवासी झालेल्या लांडगेंना सांभाळावी लागणार असल्याचे चित्र आहे. परंतू ही जागा भाजपने लढवावी अशी तीव्र इच्छा महेश लांडगे व्यक्त करीत आहे.
दरम्यान मावळची जागा सेनेच्या पदरात पडो किंवा भाजपच्या २००९ नंतर प्रचंड कटूता आलेल्या जगताप व बारणे यांना युतीच्या मनोमिलनानंतर आता एकमेकांचे तोंड गोड करावे लागणार आहे. पेरलेले सुरूंग काढून तुपाचे दिवे तर लावावे लागणार आहेतच शिवाय मोदी, शहा, उद्धव ठाकरे अथवा फडणवीस यापैकी कोणाचीही सभा मावळ मध्ये लागली तर एकमेकांना बासुंदीच्याच रसाने अभिषेक घालावा लागणार हे वास्तव आहे. कारण जगताप नुसते आमदार नाही तर पक्षाचे अध्यक्ष देखील आहे.
२००४ ते २००९ पर्यंत जगताप व बारणे यांच्यात होता ‘याराना’ — गेल्या दहा वर्षात प्रचंड संबंध ताणलेल्या आमदार जगताप व खासदार बारणे यांच्यात कधी काळी ‘याराना होता’ हे वाचून नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना धक्का बसू शकतो. २००३ साली महापौर असलेल्या प्रकाश रेवाळे यांनी महापालिका खर्चाने पिंपरी चिंचवड फेस्टीव्हल करण्याचे बंद केले. तेव्हा पिंपरी चिंचवड सोशल क्लबच्या वतीने शहरात फेस्टीव्हलची धुरा उचलण्यात आली. या सोशल क्लबचे अध्यक्ष होते बारणे तर कार्याध्यक्ष होते लक्ष्मण जगताप. यांच्यातील मनोमिलन व युतीमुळे २००४ ते २००९ पर्यंत चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या शहरात पार पडले. भाजपच्या आताच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे या तेव्हा कोषाध्याक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. तर पालिकेचे अधिकारी असलेले प्रवीण तुपे हे या अराजकीय सोशल क्लबचे सूत्रधार होते.