विजय जगताप –
आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंन्टाईन डे. प्रेमाच्या नात्यातील मधुरता, गोडी, उत्साह, आनंद यास संजीवनी देणारा हा जागतिक दिन. बातमी खासची टिम आज आपल्याला अशा तीन विवाहित जोडप्यांचा परिचय करून देणार की ज्यांनी आपल्या नात्याला मानवता, समानता, करूणा व प्रेमाच्या सर्वोच्च टोकावर नेऊन ठेवले आहे. प्रत्येक प्रेमवीर आजचा हा दिवस मोठया आनंदाने साजरा करतात, एकमेकांना भेटवस्तू देतात. परंतू आपल्या जीवनातील श्वासच एकमेकांना आयुष्यभरासाठी समर्पित केलेल्या या तीन जोडप्यांची कहाणी खास बातमी खासच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
समाजाला दृष्टी देणारे एका जोडीचे दोन डोळे..!
सातारा शहरातील सुसंस्कारीत ब्राम्हण चौकोनी कुटुंबातील शेखर हा खुप विनम्र मुलगा. बारावीत शिकत असताना एक अपघात घडला की ज्यामुळे शेखरचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सुखवस्तु असलेले हे कुटुंब या अपघातामुळे कोसळून गेले. घटना अशी घडली की, सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर शेखर क्रिकेट खेळत असताना बाऊंड्रीवर उभा राहून तो फिल्डींग करत असताना टेनिस बॉलचा जोरदार फटका त्याच्या उजव्या डोळ्यावर बसला. बॉलच्या वेगाला इतका स्पीड होता की, चष्मा घालत असलेल्या शेखरच्या डोळ्यात काचेचा अक्षरश: भुगा जाऊन डोळ्याचा रेटिनाच गेला. असंख्य डॉक्टरांना दाखविले परंतू शेखरचा एक डोळा कायमचा अधू झाला. कालांतराने जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा शेखरने एक अट आई-वडिलांना घातली ती अट होती की, ‘मला एक डोळा नसलेलीच मुलगी पाहिजे’. सगळेच शॉक झाले. आता अशी मुलगी कुठे शोधायची? कशी मिळणार? सारे कुटुंब काळजीत पडले. परंतू शेखर आपल्या भूमिकेपासून हटला नाही. वधू-वर सुचक मंडळात अशी अट घालणारा बायोडेटा दिला. रोज पेपरमध्ये ‘वधू पाहिजे’ ही जाहिरात बघितली जात होती. निसर्ग पण कमाल करत असतो, अखेर एके दिवशी एक जाहिरात शेखरच्या वडिलांच्या वाचनात आली. औरंगाबाद येथील मुलगी एक डोळ्याने अंध असलेली आढळली. लहानपणी शेकोटी करत असताना जळत्या कोळशाची ठिणगी उडून तिचा डोळा भाजला होता. व त्यामुळे एका डोळ्याला कायमचे अपंगत्व आले होते.
क्षणाचाही विलंब न लावता शेखर त्या मुलीच्या घरी गेला. मुलीच्या कुटुंबानेही स्थळ पसंत केले होते. आपल्या पत्नीला स्वत:च्या व्यंगाबद्दल कुठलीही अपराध भावना वाटू नये अशी काळजी शेखरने घेतली होती. दृष्टी समानतेचे एक पाऊल शेखरने उचलून बळकट केले होते. पुण्यातील पुण्यातील कोथरूड भागात गेली १७ वर्षापासून शेखर आपल्या पत्नीसह सुखाने संसार करत प्रेमाची अवीट गोडी वाढवत आहे.
इच्छा व स्वप्नांसाठी एकमेकांना मुरड घालणारं जोडपं
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाला माहित असलेले नाव म्हणजे राजू शिवतरे. वय वर्षे ५२ पर्यंत पोहोचलेल्या राजूने सारे आयुष्य समाजसेवेसाठी विशेषत: रक्तदान क्षेत्रातील कार्यासाठी वाहून घेतले आहे. चिंचवडमध्ये राहणारा राजू म्हणजे सर्वांच्या सुख दु:खात धावणारा सोबती. वयाच्या विसाव्या वर्षीच राजूने आयुष्यभर कुठेही नोकरी वा धंदा करायचा नाही तर समाजसेवेसाठी स्वत:ला वाहून घेण्याचे निश्चित केलेले. जेव्हा लग्नाचे वय झाले तेव्हा राजूने अशाच पत्नीचा शोध घेतला की माझ्या कार्याला ती स्विकारेल आणि मर्यादीत अपेक्षा तिच्या जीवनाबद्दल असतील.
मित्रपरिवाराची संख्या प्रचंड असलेल्या राजूला अपेक्षित असलेली एक मुलगी एका मित्राने दाखविली. हर्षदा तिचे नाव. राजूचे कार्य ऐकून अशा जोडीदाराबरोबर जीवन घालवायला आवडेल असा तिच्या मनाने कौल दिला. संसार करणे, कुटुंबवत्सल जगणे, मुलांना संस्कारीत करणे या तीन जबाबदाऱ्या कुठल्याही कुरबुरीशिवाय गेली २७ वर्ष हर्षदा शिवतरे या सांभाळत आहेत. या दोघांच्या नवरा बायको नात्याची वीण इतकी घट्ट आहे की, गेली ३२ वर्षे राजू टुव्हिलरच असल्याचा दोघांनाही आनंद आहे. अपेक्षा वाढल्या की ताण वाढतो आणि ताण वाढला की, चूकीची कृत्ये हातून घडतात अशी विचारधारा दोघे बाळगून आहेत. मित्रांबरोबर एकदाच बाहेर फिरायला गेलेल्या राजूला चमचमीत खाण्याचा व एन्जॉय करण्याचा मोह झाला. परंतू काही वेळातच भानावर आलेल्या राजूने मनाला सावरून घेतले. जर मी गाडीघोडयावर फिरलो, चांगलं-चुंगलं खाल्लं तर ती घरी एकटीच असणार.. ती काय जेवणार? तिला या सुखापासून वंचित ठेऊन मी का हौस करायची? असे ठरवत राजू पत्नीप्रेमापोटी आनंदही साजरा करत नाही व कोणाच्या आनंदसोहळ्यात उपस्थित राहण्याची वेळ आलीच तर खाणेही टाळत आला आहे. नवऱ्याने समाजासाठी समर्पित केलेलया आयुष्याचा हर्षदा शिवतरे यांनीही स्विकार करत ‘सुख हे मानण्यावरच असतं’ या सिद्धांतावर त्यांची विचारधारा तयार झाली आहे.
रिमांड होम मधल्या शकुंतला देत आहेत नानांना हृदयपूर्वक साथ..!
भा. वि. कांबळे हे नाव व त्यांचे ‘पवना समाचार’ हे वृत्तपत्र शहरात कोणाला माहिती नाही असा कोणी शोधूनही सापडणार नाही. जातीने सोनार असले तरी कांबळे आडनावामुळे कायमच इतरांच्या नजरेतून उपेक्षित ठरल्याच्या असंख्य घटना या कांबळे परिवाराला सहन कराव्या लागल्या आहेत. अरूण उर्फ नाना कांबळे हा त्यांचा थोरला मुलगा. वडिलांप्रमाणेच हरहुन्नरी. लोकांच्या अडचणी, समस्या सोडविणे, धावून जाणे, ही भा. वि. कांबळेची सवय नानांना देखील लागलेली. आपल्या वडिलांच्या सामाजिक प्रतिमेला शोभेल त्यांची उंची वाढेल असा निर्धार लहानपणीच नानाने केलेला होता. लग्नाचे वय झाले आणि जेव्हा मुलगी शोधण्यास सुरूवात झाली तेव्हा नाना अनेक मुलींना नापास करत होते. अखेर वैतागून नानांची आत्या त्यांना म्हणाली, ‘सगळ्या पोरी नापास’ करतो आता तुला काय रिमांड होम मंधली पोरगी करायची काय? असा संतप्त सवाल केला. झालं… नानांची ट्युब पेटली. आता मुलगी करायची तर रिमांड होम मधलीच. नानांच्या हट्टापुढे कुटुंबानेही मान डोलावली. अखेर सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहात एक रिमांड होम मधून आलेली मुलगी शिकत असल्याची वार्ता नानांच्या कानावर आली. मुलगी बघायला नाना स्वत: गेले. कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक स्तर असा काही एक विचार न करता नानांनी घरी कळविले. आणि लगेचच पुढच्या आठवडयात गाडी पाठवून नवरी व तिच्या बरोबरचे पाच-सहा जण यांना पिंपरीत आणले. एवढंच वऱ्हाड होते. लग्न पार पडलं. नानांचे पत्रकार असणे, घरचा पेपर, घरची प्रेस याची सारी व्यवस्था शकुंतला वहिनी सांभाळू लागल्या. लग्न होऊन दोन वर्षेच झाली आणि नानांच्या छातीत सारखं दुखतं म्हणून डॉक्टरांना दाखविले. आणि सगळ्यांना धक्काच बसला. ओपन हार्ट सर्जरी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १ लाख ३५ हजार रूपये लागणार होते परंतू जवळ पैसे नव्हते. राज्यात जेवढया जेवढया दानशूर संस्था आहेत तेथे जाऊन या जोडीने पैसे गोळा केले. ऑपरेशनसाठी हॉस्पिटल निवडलं… औंध येथील राज्य सरकारी रूग्णालय (आत्ताचे सांगवी हॉस्पिटल) मृत्यु परवडला परंतू इथे ऑपरेशन नको अशी मानसिकता व गैरसमज असल्याने सर्वांनी नानांना भरवलं. नानांनी देखील ‘ऑपरेशन नकोच’ असा पवित्रा घेतला. परंतू शकुंतला वहिनींनी त्यांना धीर दिला आणि म्हटलं की, तुम्ही जहाजाचे कॅप्टन आहात तुम्ही जहाज सोडलं तर आमचं काय? आणि क्षणार्धात नानांनी निर्णय बदलला. ‘मी तुम्हाला दवाखान्यात आणलं आहे आणि मीच तुम्हाला घरी घेऊन जाणार’ असे वहिनींनी नानांना निक्षून सांगितलं. नानांचं ऑपरेशन यशस्वी झालं. गेली ३५ वर्षे हे जोडपं सुखाने संसार करीत आहे. ‘मी शेवटी रिमांड होममधली.. माझं आयुष्य.. माझं जगणं.. असंच वाऱ्यावर गेलं असतं. परंतू तुम्हाला, तुमच्या हृदयाला बळकटी देण्यासाठी निसर्गाने जर मला पाठवून दिलं असेल तर काय सांगावं?’ असं सूत्र शकुंतला वहिनी मांडतात. आजचा व्हॅलेंन्टाईन डे खास या तीन जोडप्यांना समर्पित.