— विजय जगताप
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील वजनदार नेते असलेल्या आझमभाई पानसरे यांचा आज वाढदिवस. आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये न्याय मिळत नाही असे म्हणत त्यांनी २५ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘पानसरे लवकरच आमच्याबरोबर मुंबईत दिसतील’ असे जाहीर वक्तव्य आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यावेळी केले होते. संयमाचे दुसरे नाव म्हणजे भाजप. आणि अतिसंयमशील व्यक्तिमत्व म्हणजे आझमभाई.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा ‘बातमी खास’ने घेतलेला परामर्श.
८ फेब्रुवारी २०१४, आझमभाई राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये
२४ ऑक्टोबर २०१४, आझमभाई काँग्रेस सोडून पुन्हा राष्ट्रवादीत
८ जानेवारी २०१७, आझमभाई राष्ट्रवादी सोडून भाजपात
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातील गुढ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आझमभाई भाजपात गेल्यानंतर केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ आपले वलय, दरारा व आदरयुक्त भिती कायम ठेवलेल्या आझमभाईंनी भाजपात जाणे या मागची त्यांची अस्वस्थता नेमकी काय? किंवा भाजपाने त्यांचा स्विकार केला या मागील गणित काय? या दोन्ही बाबींचा विचार केला तर दोघांनी एकमेकांची सोय पाहिली असाच निष्कर्ष जाणवतो.
आझमभाईंची महत्वाची पात्रता म्हणजे ते मुस्लिम आहेत.ओबीसी व दलितांना बऱ्यापैकी बकुटीला बांधलेल्या भाजपाला एका प्रभावी मुस्लिम राजकीय वलयाची गरज होती ती या निमित्ताने पुर्ण झाली बाकी आझमभाईकडे धारदार वक्तृत्व, अभ्यासू मुद्देसूद मांडणीची कला,संपूर्ण शहरभर प्रभाव पडेल अशी कार्यकर्त्यांची फौज, नसली तरीही भाजपाला ते हवे होते. आझमभाई केवळ मुस्लिम चेहराच नव्हे तर त्यांचे हजारो दलित, बहुजन व अमराठी माणसांवर त्यांचे असलेले गारूड हे त्यांचे कॅपिटल म्हणता येईल..!
१९९९ ला विधानसभेसाठी, २००९ ला लोकसभेसाठी त्या अगोदर २००२ ला पालिका निवडणुकीत पराभव होऊनही आपल्या नावाचे वलय शाबूत ठेवलेले पिंपरी चिंचवड मधील एकमेव असामी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवारांची भेट झाल्यावर व त्यांनी पाठीवर हात टाकल्यावर जग जिंकल्याचा भास होणारे कार्यकर्ते सगळ्या महाराष्ट्रात आहेत. ते शरद पवार मात्र ईद असेल, घरगुती कार्यक्रम असेल वा राजकीय दौरा असेल तर ते हमखास आझमभाईंच्या घरी आलेले आहेत. इतके सहृदय नाते या दोघांमध्ये होते, मग तरीही ते भाजपात का गेले? मराठीत एक म्हण आहे, सोन्याची सुरी असेल तर मग काय गळा कापायचा का? असो.
भाजपची विचारसरणी, ध्येयधोरणे, हिंदुत्ववादी अजेंडा यामुळे आझमभाई प्रभावित झालेत का? तर बिल्कुल नाही. तर सध्या मावळतीकडे झुकत चाललेल्या त्यांच्या राजकीय अस्तित्वाला एका संजीवनी बुटीची गरज होती ती या निमित्ताने पुर्ण झाली. त्यांची वेदना व ठसठस फार गंभीर होती. कानामागून आलेले कार्यकर्ते आमदार, खासदार होत होते पण त्यांना जातपातीचे कुटील राजकारण मागे सारत होते. पवारांनी अनेकदा शब्द देऊनही तो पाळला जात नव्हता. ते कमी पडत होते की ज्यांची निवड झाली ते भारी पडले होते हे कळायला मार्ग नव्हता.
भाजपला त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत असे नाही, त्यांचे वर्तुळ पूर्ण झाले एवढाच त्यांना आनंद आहे. आझमभाईंना आमदारकी किंवा महामंडळ मिळणार ही चर्चा करण्यातच दोन वर्षे होऊन गेली आहेत. भाजपने पालिकेवर झेंडा फडकवून आपले इप्सित साध्य केलेले आहे. एकूणच अजितदादांना कात्रीत ठेवण्यासाठी जे जे प्रयोग करता येतील ते केले गेले आहेत.
आझमभाईंची आश्वासनपूर्ती उद्या समजा केलीच नाही तर ते फार मोठे उपद्रवमूल्य ठरू शकतील असेही नाही, हा होमवर्क देखील भाजपने करून ठेवला असावा असे वाटते.
१९९२ च्या निवडणुकीत पालिकेवर बिनविरोध निवडून येऊन आपल्या वलयाचा धुराळा निर्माण केलेले भाई ‘कच्चे खिलाडी’ असतील या भ्रमात मात्र भाजपने राहू नये.
दोन वर्षापूर्वी आझमभाई भाजपात प्रवेश करण्यापूर्वी फक्त ४८ तास अगोदर खासदार साक्षी महाराज यांनी, ४ बायका आणि ४० मुलांचा उल्लेख करून मुस्लिम समाजाला डिवचले होते, हे भाजपचे मुस्लिमांना डिवचणे तर पुढेही सुरूच राहणार आहे. भाजपचा एक चांगला ताकदवान दखलपात्र असलेला हा साठीकडे आलेला लोकनेता भाजपात मात्र बेदखल व्हायला नको हिच मनोकामना..!