मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना युतीची उमेदवारी देऊ नये ही जागा भाजपला सोडावी, आणि जर या जागेमधून बारणेंचा पराभव झाला तर भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार धरू नये, असे साकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल पिंपरीतील नगरसेवकांनी घातले. मात्र त्यांची ती कृती आपल्याच मुख्यमंत्र्यांना व राष्ट्रीय अध्यक्षांना आव्हान देणारी असल्याची चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगली होती.
दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील नेहरू कला क्रीडा मंच येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप आघाडी देशात ३०० पर्यंत जागा मिळवेल असे म्हणत महाराष्ट्रातून ४५ जागा आम्ही जिंकणारच असा नारा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या सुरात सूर मिळविला होता.
सध्या देशपातळीवर बदललेली परिस्थिती पाहता एक एक जागा भाजपला महत्त्वाची वाटू लागली आहे. अशातच काल नितीन गडकरी एका कार्यक्रमासाठी चिंचवड येथे आले असताना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली काही नगरसेवकांनी मावळची जागा भाजपला सोडा अशी मागणी केली. तसेच श्रीरंग बारणे यांच्या सेनेच्या उमेदवारीबद्दलही त्यांनी भूतकाळात भाजपबद्दल विखारी टिका केल्याचे म्हटले.
वास्तविक या कृतीमुळे बारणे यांनी कोंडी होण्याऐवजी या मंडळींनी त्यांनाच मोठे केले व आपल्याच मुख्यमंत्र्यांना व राष्ट्रीय अध्यक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयोग केला असल्याची आज पालिका वर्तुळात दिवसभरात चर्चा होती.