कुठलाही उद्योग, व्यवसाय, प्रकल्प, संस्था सुरू करायची म्हटलं तर मुख्य अडचण असते जागा आणि पैशाची…! कधी कधी तर चणे आहे पण दात नाही, अशी ही परिस्थिती असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल दि. १० फेब्रुवारी रोजी चिंचवड येथे गुरुकुल प्रकल्पाला ५ कोटी रुपये आणि ३० वर्षे कराराने जागा उपलब्ध करून देण्याची घोषणा करून दार्तृत्वाची अनोखी प्रचिती दिली.
पाहुणे म्हणून बोलाविल्यावर पाहुण्यांनी यजमानांना मदत करणे व त्यांची अपेक्षापूर्ती करण्याची पद्धत सर्रास आढळते. राजकीय वजनदार व्यक्तिमत्वांना आमंत्रित करण्यामागेही खरा उद्देश तोच असतो.
काल रविवारी येथील क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुल या संस्थेला केंद्रीय रस्ते विकास वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिपिंग कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून (सीएसआर) पाच कोटी रुपये देण्याची घोषणा करण्याबरोबरच संस्थेला पालिका किंवा प्राधिकरणाची पाच एकर जागा ३० वर्षे भाडे कराराने देण्याचे आदेश प्राधिकरण अध्यक्ष व महापालिका आयुक्त यांच्या उपस्थित दिले.
महाराष्ट्राच्या मोजक्या राजकीय नेत्यांमध्ये प्रभावी व्यक्तिमत्त्व व खुमासदार, शैलीदार भाषणांसाठी नितीन गडकरी ओळखले जातात. भाषणांमधून संवाद साधणे, सामाजिक उदाहरणे देणे आणि अभ्यासपूर्वक नोंदी उलगडणे ही त्यांच्या भाषणाची वैशिष्ट्ये म्हटली जातात. कालच्या आपल्या २१ मिनिटांच्या भाषणात त्यांनी गडचिरोली भागात आदिवासी विद्यार्थ्यांकडून जठरोपासारख्या वनस्पतीद्वारे विमान व जहाजांसाठी तेल निर्मिती आम्ही कशी करतो याची विस्तृत माहिती दिली. गडकरी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ११०० शाळा व ९०० शिक्षक असलेल्या या भव्य पसाऱ्याचा उल्लेख त्यांनी विनम्रपणे करत आपले काम गुरुकलपेक्षा छोटे असल्याची मार्मिक टिप्पणी केली.
तसेच शिक्षणाचा संबंध रोजगाराशी असावे याचाही उल्लेखही केला.
वनवासी कल्याण आश्रमाचे सदाशिव देवधर यांचे शिष्य असलेल्या नितीन गडकरींनी आपल्या गुरुच्या आग्रहाखातर या संस्थेला भेट दिल्याचे स्पष्ट केले. बायोडिझेल, इथेनॉल तंत्रज्ञान यासारखी तेल व नैसर्गिक साधने वनसंपत्तीतून कशी निर्माण होते याची त्यांनी फोड करून तर सांगितलीच शिवाय पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर नागपूरचे आयुक्त असताना आम्ही संडासाच्या पाण्यापासून कसा प्रकल्प प्रकल्प सुरू केला व त्यापासून नागपूर पालिकेला वार्षिक ७९ कोटी रुपये कसे मिळविले याचीही माहिती दिली.