( विजय जगताप)
‘चोर तर चोर वर शिरजोर’ या म्हणी प्रमाणे स्वत:ला वाचविण्यासाठी सगळे प्रयत्न करून झालेल्या परंतू उलटा बाँम्ब आपल्यावरच उडत असलेल्या स्पर्श व्यवस्थापनाला आज आपला ‘बोरी बिस्तरा’आवरावा लागला.
बेडसाठी १ लाख रूपये घेण्याच्या प्रकरणात स्पर्शचे प्रवीण जाधव व ज्योत्सना दांडगे हे दोन डाॅक्टर न्यायालयीन कोठडीत असण्याची घटना ताजी असतानाच स्पर्शच्या वाॅर्डबाॅयला रेमडिसिव्हर विकण्याच्या प्रयत्नात काल अटक झाली.
‘टाळूवरचे लोणी खाणे ‘या प्रकारासही लाज वाटेल अशी गंभीर कृत्ये उघडकीस येत असलेल्या ‘स्पर्शवर आता पालिकेने कारवाई करावी ‘यासाठी खुद्द पोलीस आयुक्तांनी पालिकेस पत्र लिहावे यासारखे दूर्देव नाही.
पिंपरी पालिका प्रशासनाने मागील आठवडयातच स्पर्शच्या ताब्यात असलेल्या ॲटो क्लस्टर कोविड सेंटरमध्ये रूग्ण पाठवण्यास व त्यांनाही नवीन रूग्ण स्विकारण्यास मनाई केली आहे. सुमारे अडीचशे रूग्णांची क्षमता असलेल्या या सेंटरमध्ये सध्या अवघे १४८ रूग्ण येथे उपचार घेत असून चार -आठ दिवसात त्यांचेही डिस्चार्ज होणार आहे.स्पर्शचे रोजच उघडकीस येणारे प्रताप पाहून या रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची अवस्था भयभीत झाल्यासारखी आहे.
दरम्यान, ‘तो मी नव्हेच ‘या स्टाईलने आमच्या डाॅक्टरांनी बेडसाठी पैसे खाल्ले नसून उलट
यामध्ये आमची बदनामी झाली असा कांगावा स्पर्श व्यवस्थापनाने पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये अर्ज करून केला होता. (मात्र स्पर्शच्या आणखी एका महिला डाॅक्टरला अटक झाल्याने व पैसे मिळाल्याचं त्यांनी पोलिस चौकशीत ओकल्याने स्पर्शचं पितळ नंतर उघडं पडलं. )
तसेच आपल्या बचावासाठी स्पर्शचे प्रमुख डाॅ अमोल होळकुंदे यांनी मग आपले गा-हाणे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मांडलं. त्यामध्ये ,पालिका प्रशासन व राष्टवादीचे एक माजी महापौर,शहरातील एका भाजप आमदाराचा भाऊ व दोन भाजपच्या नगरसेविका यांनी आपल्याला कसं खिंडीत गाठलं परंतू आपण त्यांची ‘अपेक्षापूर्ती’ आपण न केल्याने स्पर्शला ते कसं बदनाम करत आहे अशी व्यथा सादर केली.या पत्रातील माजी महापौर म्हणजे योगेश बहल हेच आहेत अशी शहरभर चर्चा झाल्याने मग खुद्द बहलांनीच परवा पोलीस आयुक्तांना पत्र देऊन,’स्पर्शच्या व्यवस्थापनाची चौकशी व्हावी व माझीही चौकशी व्हावी ‘असा बाॅम्ब टाकल्याने स्पर्श संस्था आणखी गोत्यात आली.आणि भरीस भर म्हणजे काल रेमडिसिव्हर इंजेक्शन विकण्यात स्पर्शचा वाॅर्डबाॅयच सापडल्याने तोंड झोडून घ्यायची वेळ स्पर्शवर आली.
हाॅस्पिटल व्यवसायाचा धंदा करत व पुढे पालिकेतील हितसंबंधी दोन चार नगरसेवक यांच्या माध्यमातून ठेकेदारीत घुसलेल्या (यामध्ये भाजपचे काही व राष्ट्रवादीची एक महिला नगरसेविका) स्पर्शने आता स्वत:बरोबरच पालिकेलाही बदनाम केले आहे.
या स्पर्शवाल्यांचा वट इतका होता की ,भोसरीत मागील वर्षी कोविड सेंटर सुरू करण्याचा ठेका यांना मिळाला परंतू कोरोना संपलाय अशी चिन्हे निर्माण होताच ते बंद करावे लागले होते.तरी एकही पेशंट नसताना फक्त सेटअपची तयारी केली या तांत्रिक मुद्दयावर बिल देण्याचे सगळे कायदे वाकवून साडेतीन कोटींचे बिल स्पर्शला देण्यात आले.या प्रकरणात अजित पवार नामक एका अतिरिक्त आयुक्तास हाकलून देण्याची आफत कोसळली.सध्या या बिल घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
संकटे आली तर चहूबाजूंनी येतात असे म्हणतात,सध्या या फेजमधून स्पर्श संस्था जात आहे.डाॅक्टरांनी बेडसाठी पैसे घ्यावे किंवा कर्मचा-यांनी रेमडिसिव्हर विकावे असा आदेश किंवा शिकवण नक्कीच स्पर्श व्यवस्थापनाची नसणार. परंतू रेल्वे असो की विमान यांचा अपघात झाला की त्या खात्याच्या मंत्र्यांना राजीनामा दयावाच लागतो.
उदया शहरात कोरोना आटोक्यात आला नाही किंवा उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडले तर आयुक्त राजेश पाटील यांनाही आपला बोरी बिस्तरा गुंडाळावा लागणारच आहे.स्पर्शची व्यथा व दूर्दशा याची दोन्ही बाजूंनी विचार करण्यासारखी स्थिती जरूर आहे. पाचशे किंवा हजारही न सोडणारे स्थायी अध्यक्ष असलेल्या या महापालिकेत ठेकेदारी करायची असेल तर आमच्या सल्ल्याने व आमच्या पध्दतीनेच हा प्रकार अलिकडच्या चार वर्षात जोमाने वाढला आहे .शिल्पकार असो की चित्रकार यालाही पैसे दिले नाही तर डांबून ठेवणारे महाभाग या शहरात अाहेत.स्पर्श संस्था त्यांच्या गुण व अवगुणांनी आता जात अाहेत मात्र ती गेली नसती किंवा संकटात सापडली नसती तरी तिचा कडेलोट करण्याची तयारी झालीच असती…कारण एका क्लायमॅक्समागे अनेक क्लायमॅक्स दडलेल्या स्पर्शच्या या स्टोरीवर पिक्चर काढण्यासाठी मनमोहन देसाईसारखे डायरेक्टर जरी आज जिवंत असते तरी ते पण वेडे झाले असते.