(विजय जगताप)
पंधरा वर्षे पिंपरी चिंचवड शहराचे कारभारी राहिलेल्या अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच पिंपरी पालिकेत पाऊल टाकले.मात्र सत्ताधारी भाजपने या दौऱ्याकडे फिरवलेली पाठ व दस्तूरखुद्द शहराच्या महापौरांची देखील असलेली अनुस्थिती न बोलता बरेच काही सांगून गेली.
वास्तविक पालिकेचे विद्यमान कारभारी असलेले भाजपचे शहरातील दोन्ही आमदार तसेच पालिकेतील पदाधिकारी अजित पवारांच्या या भेटीदरम्यान नसतील असे सर्वांनी गृहित धरलेच होते.मात्र स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांचा अपवाद वगळता प्रोट्रोकॉल म्हणूनही भाजपचे कोणीच उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यात भर म्हणून अजित पवार यांनी प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात आलेल्या औंध रावेत रस्त्यावरील उड्डाणपूलाचेही उदघाटन करण्याचा कार्यक्रम जोडून घेतल्याने भाजपच्या मंडळींची ही एकप्रकारे खपली काढण्याचीच घटना होती. कारण राज्यात सहा महिन्यांपूर्वी अनपेक्षित सत्तापालट झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गडबडीत या पूलाचे महापौरांच्या हस्ते उदघाटन करून पूल वाहतूकीसाठी खुला केला होता.मात्र पूल बांधला शासनाने आणि उदघाटन केले भाजपच्या पालिका पदाधिकाऱ्यांनी हे लक्षात आल्याने प्राधिकरण अधिकाऱ्यांनी तातडीने पूलावरच राडारोडा टाकून वाहतूक बंद केली होती.
दरम्यान शहरातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या व पालकमंत्री असूनही पवार यांनी शहरात न टाकलेले पाऊल यावर चारच दिवसांपूर्वी बातम्या सोशल मिडियात झळकल्या होत्या तर भाजपच्या एका कार्यकर्त्याने पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पालकमंत्री नेमावा अशी उपरोधिक मागणी करून लक्ष वेधले होते.
त्यामुळे एकाच भेटीत अनेक जोडकामे करत अजित पवारांनी अचूक टायमिंग साधला.
सद्यस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये भारत-पाकिस्तानसारखी खुन्नस झाली आहे. कोरोना काळातही एकमेकांवर धुलाई करण्याची संधी दोघेही सोडत नाही असे वातावरण आहे. अजित पवार यांनी १९९७ ते २०१८ येथे राज्य गाजविलेले असल्याने व आज जेवढे भाजपमध्ये आहेत त्यामधील ९५ टक्के एकेकाळचे त्यांचेच कार्यकर्ते असल्याने पक्षीय चौकटीमुळे त्यांनाही आज जात्यातून सुपात आलेल्या अजित पवारांचा रूबाब पहायला मिळाला नाही. पण जर याच अजितदादांचा पहाटेचा शपथविधी सक्सेस झाला असता तर याच भाजपच्या मंडळींनी अजितदादांना कुठे ठेऊ अन् कुठे नको असे केले असते.