एमआयएमला सोबत घेऊन महाराष्ट्रात वेगळा प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची काल पिंपरीत झालेली यशस्वी सभा अनेक राजकीय समीकरणे सोडवून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल सोमवारी पिंपरी येथील एच.ए. मैदानावर झालेल्या या सभेला फक्त दलितच नव्हे तर बहुजन समाजातील विविध छोटे-मोठे पक्ष-संघटना-संस्था यामधील कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने आगामी विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असणार काय? या शक्यतेला इंजि. देवेंद्र तायडे यांनी आज ‘बातमी खास’ शी बोलताना दुजोरा दिला.
विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ साली पिंपरी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे अण्णा बनसोडे हे ६१ हजार ६१ मते मिळवून तेव्हा निवडून आले होते. भाजप-सेनेचे अमर साबळे हे मतदारसंघाला व शहराला नवीन असूनही त्यांनी ५१ हजार ५३४ इतकी चांगली मते तेव्हा मिळविली होती. २०१४ ला मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी आणि भाजप व शिवसेना हे चारही पक्ष राज्यात स्वतंत्ररित्या लढले. पण पिंपरीत मात्र भाजपने आपला मित्रपक्ष आरपीआय (आठवले गट) साठी ही जागा सोडली. या लढतीत शिवसेनेचे ऍड. गौतम चाबुकस्वार यांना ५१ हजार ५६ मते तर दुसर्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना ४८ हजार ७६१ आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना तिसर्या क्रमांकाची ४७ हजार २८८ मते मिळाली. यावरून मतदारसंघात दलितांची मते प्रभावी ठरत व निर्णायक ठरत असल्याचे मागील दोन निवडणूकांवरून सिद्ध झालेले आहे.
२००९ व २०१४ च्या निवडणूकीत अस्तित्वही नसलेला ऍड. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन पक्ष आता वारे बदलल्याने नव्या वंचित बहुजन आघाडी या बॅनरखाली निवडणूक लढविण्यास सज्ज झाला आहे. ‘जर कदाचित कॉंग्रेस बरोबर युती झाली तर कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ आम्ही मागून घेणार’ असा दावा तायडे यांनी बातमी खासच्या प्रतिनिधीशी बोलताना केला.
दरम्यान, काल झालेल्या सभेला तरूण वर्गाची असलेली लक्षणीय उपस्थिती तसेच भावनिक मुद्दयांना न भाळणारा व सोशल मिडियाच्या प्रभावामुळे समंजसपणे पुढे आलेला मतदार, शहराच्या प्रत्येक भागातून महिला, युवती, ज्येष्ठांचीही उपस्थिती राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. आरपीआयच्या आठवले गटाचे प्राबल्य असलेल्या या मतदार संघात आता वंचित बहुजन आघाडीने मुसंडी मारल्याने मतांचे ध्रुवीकरण कसे होणार? हे युती व आघाडी होणार की नाही? यावर अवलंबून असणार आहे.