‘घरकुल प्रकल्पाला मुंडेनगर नाव देणारच’ असा इशारा देऊन गेलेले एकनाथ पवार यांच्या कृतीचा व इशाऱ्याचा घरकुलवासियांनी धसका घेण्याऐवजी थेट त्यांच्याविरूद्ध कायदेशीर मार्गाचा आता अवलंब करण्यास सुरूवात केली आहे.
श्री. पवार हे या भागाचे नगरसेवक आहेत. तसेच महापालिकेत ते सत्तारूढ पक्षनेते म्हणून भाजपची जबाबदारी सांभाळतात. काल काही कामानिमित्त घरकुल येथे ते आले असता स्थानिक नागरिकांनी त्यांना भेटून नामकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. मात्र हा प्रस्ताव क्षेत्रीय समितीच्या बैठकीत पास झाल्याने रद्द होऊ शकत नाही अशी ताठर भूमिका घेऊन ‘चर्चेसाठी पालिकेत या’ असे त्यांनी म्हटले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे चिडलेल्या त्यांच्या पीएने शिविगाळ केली असल्याचे घरकुल फेडरेशनने म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेला घरकुल हा बहुचर्चित प्रकल्प त्याच्या पायाभरणीपासूनच वादग्रस्त ठरला गेलेला आहे. केंद्रात काँग्रेसचे आघाडी सरकार असताना जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत बेघरांसाठी घरे उभारण्याचे पालिकेने केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने ठरवून या प्रकल्पाला सुरूवात केली. या योजनेचे हॅन्डबिल पालिकेने छापण्यापासून येथील कामामध्ये भ्रष्टाचाराला सुरूवात झाली. ‘दिड लाखात घर’ अशी जाहिरात केल्याने हजारो नागरिकांच्या या प्रकल्पात घर मिळविण्यासाठी उडया पडल्या. पुढे हे घर पावणेचार लाखात पालिकेने विकले. मात्र असे प्रकल्प करणे पालिकेचे काम नाही याची जाणिव होत हात भाजून घेतले हा भाग वेगळा…!
या इतिहासात डोकावण्याचे कारण म्हणजे ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशा पद्धतीने जर कोणी सक्ती व अधिकारशाही येथे ‘गोपीनाथ मुंडे’ नामकरण देऊन दाखवत असेल तर ते साफ चूकीचे आहे. येथे राहणारे दुर्बल घटकातील जरूर आहेत परंतू स्वाभिमानी आहेत. जर त्यांचा मुंडे नावाला विरोध असेल तर ते इतर कोणा पक्षाच्या नेत्यांच्या नावाचा आग्रह धरत नाही की कोणा युगपुरूष किंवा महापुरूषाच्या नावाचाही…!
मात्र ‘हात दाखवून अवलक्षण’ करून घेऊन एकनाथ पवार यांनी स्वत:चा, पक्षाचा व गोपीनाथ मुंडे या प्रतिमेचाही अवमान ओढवून घेतला आहे. सक्ती, जबरदस्ती, दंडेलशाहीने असे प्रश्न सुटत नसतात. पालिकेने घरे दिली, म्हणजे येथील जनता आपल्या तालावर नाचणारी नाही याची जाणीव व वास्तव सत्तारूढ भाजपने स्विकारले पाहिजे. एकनाथ पवारांविरूद्ध येथील नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणं म्हणजे विवेकी, संयमी भाजपने नागरिकांची ‘मन की बात’ ओळखली नाही. यामध्ये एकनाथ पवार कमी पडले असे म्हणावे लागेल. ‘एकनाथ पवारजी को गुस्सा आनाही नही चाहिये’ असे वर्तन आता त्यांच्याकडून अपेक्षित आहे. येथे असलेल्या ६३२० घरांमधील १९ हजार मतदारांशी पंगा घेणे भाजपला आवडणार आहे काय? याचा विचार व्हावा व लोकांनी आपले नाव बुडवायला नाही तर मिरवायला पाहिजे एवढा जरी धडा पवारांना मिळाला तरी तो पुरेसा आहे.