आपापल्या गावी जाणा-यांनी तहसिलदार कार्यालयात संपर्क साधावा की नेमके काय करावे? याबद्दल निश्चित माहितीच आकुर्डी येथील कार्यालयात कोणाला नसल्याने प्रशासनासहीत नागरिकांचाही गोंधळ उडाला आहे.
काल केंद्राने जाहिर केल्यानुसार ज्यांना आपल्या गावी जायचे आहे त्यांनी पोलिस आयुक्त वा तहसिलदार कार्यालयात मेलद्वारे संपर्क साधावा असे आदेश निघाले होते. मात्र आकुर्डी येथील तहसिलदार कार्यालयाने चक्क आज सकाळी एक बोर्ड लावून अजून काहीच आदेश आले नसल्याचे म्हटल्याने नागरिक संभ्रमात पडले.
दरम्यान या नागरिकांचे अर्ज मेलवर आल्यास पुढे काय करायचे? ते कोरोना वाहक तर नाहीत ना? याबाबतीत काय काळजी घ्यायची याची माहितीच आमच्याकडे आली नसल्याचे या कार्यालयातील एका कर्मचा-याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
तर याबाबत ठोस माहिती नगरसेवकांनाही नसल्याने त्यांनीही हात वर केले आहेत. सकाळी नऊपासूनच या कार्यालयात लोकं चौकशी करायला येऊ लागल्यावर प्रशासनावर बोर्ड लावायची पाळी आली.