गुलटेकडीनंतर जिल्हयात दुस-या क्रमांकाची असलेली पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई नागरिकांसाठी दिवसभर खुली ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांची जीवनावश्यक गरज असलेल्या भाजी मंडईलाही लाॅकडाऊन ठेवण्यासंदर्भात पोलीस व पालिका प्रशासनापुढे भूमिका घेतली होती. संपूर्ण शहराचेच यामुळे भाजीपाल्याचे चक्र बिघडल्याने व्यापारी तसेच छोट्या मोठया विक्रेत्यांवर संकट कोसळले होते. मंडईतील भाजी विक्रेते सोशल डिस्टींन्शनचे पालन करीत नाही अशी प्रशासनाची तक्रार होती.
दरम्यान गुलटेकडी येथील घाऊक व्यापार तसेच मंडईच्या दैनंदिन कारभाराला जिल्हाधिकारी व पुणे महापालिकेने परवानगी दिली असताना पिंपरीत मात्र नागरिकांची होणारी गर्दी पाहून पोलीस व पालिका प्रशासन मंडई उघडण्यास परवानगी देत नव्हते. या संदर्भात पिंपरीचे माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी व्यापारी व भाजी विक्रेत्यांची कैफियत आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कानावर घालून उभयमान्य तोडगा काढण्यात महत्वाची भूमिका बजावली .
त्यानुसार आज दुपारी झालेल्या बैठकीत ॲड चाबुकस्वार यांच्या आग्रही मागणीला आयुक्तांनी मान्यता दिली. मात्र स्वच्छता, दोन माणसांमध्ये पुरेसे अंतर, गर्दी न होण्याची घ्यावयाची काळजी याचे काटेकोर पालन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार आता दररोज पहाटे पाच ते सायंकाळी सहापर्यंत पिंपरीतील ही मंडई सुरू राहणार आहे.