श्रीकांत चौगुले
जगभर कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर तो आता भारतातही चांगलेच हातपाय पसरत आहे. लोकांच्या मनातील कोरोनाविषयी भिती, त्यापोटीची काळजी, आणि सरकारी यंत्रणाचे प्रयत्न यामुळे लोकांनी घरीच राहणे पसंत केले आहे.
सलग दोन दिवस सुट्टी मिळाली तरी आनंद मानत ट्रीपसाठी घराबाहेर पडणारी मंडळी किंवा सुट्टी असो वा नसो पायाला भिंगरी लावल्यासारखी घराबाहेर फिरणारी मंडळी आता मात्र घरातच स्थिरावली आहेत. व्यवसाय, नोकरी करणारी मंडळी घरी, शाळांना सुट्टया असल्यामुळे मुले ही घरी, तसेच मंदिरे, बागा याबाबीही बंद असल्याने ज्येष्ठ मंडळी देखील घरी…!
एकदंरीत कधी नव्हे तर अख्खे कुटुंब आणि कुंटुंबाचे सदस्य सध्या घरी आहेत. काही मंडळी तर सकाळी बाहेर पडायची ते रात्री उशिराच घरी परतायची अशा घरात दुपारच्या वेळात माणसांचा आवाज कधी ऐकायला यायचा नाही पण कोरोनाने आता सगळेजणच घरी थांबलेत.
कुटुंबातील सर्वच सदस्य एकाचवेळी आणि सतत घरी राहिल्याने त्यांच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत. बाहेरून कामावरून कंटाळून थकून भागून येणारी मंडळी मुलांवर चिडचिड करायची आता थांबली आहे. घरातल्या महिलेला स्वयंपाकात मुले व इतरही मदत करू लागले आहेत. त्यामुळे काही नवीन पदार्थ सर्वांनी मिळून करणे व एकत्रित आस्वाद घेत आनंद लुटणे चालू आहेत. मुलांबरोबर खेळायला, बोलायला वेळ नाही किंवा सतत कामात असणारी मंडळी मुलांबरोबर सध्या पत्ते, कॅरम इ. खेळ खेळण्यात गुंतली आहेत. काही आठवणी, प्रसंग, गप्पा रंगत आहेत. एकंदरीत कोरोनाची आपत्ती आणि या आपत्तीतून सक्तीचे घरी राहणे हे कौटुंबिक नाते अधिक दृढ करणारे ठरत आहे. नात्यानात्यातील जवळीक प्रेम, जिव्हाळा वाढत आहे. एकमेकांची काळजी घेतली जात आहे. मिळणारा वेळ एकत्रित आणि आनंदात घालवला जात आहे. कोरोनाच्या संकटावर मात करता करता कुटुंबातील नाती अधिक जवळ येत आहे. जिव्हाळ्याचे दर्शन घडत आहे.