विजय जगताप
१७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून केंद्रात कोणाचे आणि कसे सरकार येईल? याविषयी ‘बातमी खास’ने पाच शक्यतांचा निष्कर्ष काढला आहे.
पहिली महत्त्वपूर्ण शक्यता म्हणजे पंतप्रधान मोदी आणि शहा यांच्या म्हणण्याप्रमाणे जर कमीत कमी ३०० जागा भाजपाला मिळाल्या तर या नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी देशातील अनेक छोट्या-मोठ्या पक्षांची रिघ लागेल, आणि स्पष्टच असेल की देशातील हे सरकार बहुमताचे सरकार अत्यंत मजबूत आणि टिकणारे असेल.
या सरकारचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे मोदी व शहाच करतील. या नव्या सरकारचे नेते जुने असले तरी त्यांच्या योजना मात्र नव्या असतील. यावेळी नोटबंदीसारखा चुकीच्या निर्णयाचे काम होणार नाही. परराष्ट्र धोरणाबद्दल हे नवे सरकार ताकदेखील फुंकून पितील. आपणच सर्वज्ञानी या गैरसमजातून बाहेर पडून मोदी व शहा ही जोडी तज्ज्ञ मंडळी, विशेष जाणकार यांचा सल्ला घेऊन नवीन पायंडे रचतील. आरोग्य, शिक्षण आणि अर्थनिती या विषयी पंतप्रधानांचा अंमल स्वतः असेल प्रचारी पंतप्रधानांचा नाही. थोडक्यात काही ठोस कामे होतील; परंतु या बलदंड ताकदीचा दुष्परिणामही होण्याची शक्यता असून, हिंसाचार, अत्याचार, मग्रुरी व जुलूमशाहीचा नवा अध्याय निर्माण होऊ शकतो.
शक्यता क्रमांक – २
दुसरी शक्यता म्हणजे २०० किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर या कडबोळ्यास एकत्र करून एनडीएचे सरकार बनविणे भाजपला सहज शक्य आहे. कारण भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, राष्ट्रपती हे भाजपने नियुक्त केलेले असल्याने सरकार बनविण्यासाठी ते पहिली पसंती भाजपलाच देतील. खासदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी सत्ता आणि पत्ता या दोन्ही गोष्टी भाजपकडे असल्याने त्यांना जड जाणार नाही. फक्त भाजपला आपला नवा नेता कोण असावा याचा विचार करावा लागेल. भाजपला समर्थन देणारे छोटे-मोठे पक्ष व खुद्द भाजपातील वरिष्ठ नेते मंडळीपण आपला नवा नेता विनम्र, दूरदृष्टीकोणाचा व विचारशील असावा या मताला पोहोचतील. संघ आणि भाजप सोडून विरोधी पार्टीलादेखील तो नवा नेता पसंद असेल असा ठरवला जाईल.
शक्यता क्र. ३
जर काँग्रेसला १०० च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर काँग्रेस नवे सरकार बनविण्यासाठी पुढाकार घेईल. काँग्रेस पक्ष राष्ट्रपतींना सांगू शकतो की, आम्हाला भाजपपेक्षा कमी जागा जरूर मिळाल्या आहेत; परंतु भाजपला जनतेने नाकारलेले आहे. त्यामुळे सरकार बनविण्यासाठी आम्हाला संधी द्यावी. पण ही शक्यता राष्ट्रपतींच्या भूमिकेवर अवलंबून असेल की काँग्रेसला संधी द्यायची की नाही. काँग्रेसजवळ पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार सध्या तरी नाही. जर त्यांनी राहुल गांधींना पुढे केले तर विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या ते पचनी पडणार नाही. पंतप्रधान होऊ ठरू शकतील असे अनेक चेहेरे आहेत; परंतु काँग्रेसच्या पाठिंब्याने आघाडी सरकार स्थापन झाले तर त्या सरकारची अवस्था चरणसिंह अथवा देवेगौडा सरकारसारखी नाजूक असेल. कदाचित अल्प काळाचे ते सरकार ठरू शकेल.
शक्यता क्र. ४
चौथी शक्यता म्हणजे जी भूमिका आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली आहे, म्हणजे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून मुक्तता हवी. थोडक्यात गुजराल व देवेगौडासारखी…! हे कधी शक्य होईल तर जेव्हा भाजप व काँग्रेसला दोन्ही मिळून दोनअडीचशे इतक्या जागा मिळतील. मग त्यासाठी भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष नको असलेल्यांना ३०० पेक्षा जास्त जागा हव्यात. अहंकार, जातीय तनाव आणि व्यक्तिगत द्वेषांने ग्रस्त असलेले हे सरकार असेल.
शक्यता क्र. ५
हे एक स्वप्न असेल. कोणालाच बहुमत नाही आणि जनतेने दिलेला कौल अनेक तुकड्यांत विभागलेला असेल, मग सर्व पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतील काय? एकमेकांचे विरोधक अखेर एकत्र येऊन युरोपमध्ये काही देशात अशा प्रकारचे सरकार बनलेले आहे; परंतु हे भारतात कितपत शक्य आहे. हे पाहणे मनोरंजक ठरेल. यामधला सर्वात मोठा अडथळा अहंकाराचा असेल. आत्ताच्या निवडणुकीत शिविगाळ पासून कंबरेखालपर्यंत वार झालेले आहेत आणि पुन्हा ते एकत्र येणे कठीण आहे. अखेर राष्ट्रपती पुन्हा निवडणूक घेण्यासाठी आदेश काढू शकतील.