विजय जगताप –
राजकारणात सर्व काही माफ असते असे म्हणतात. घेतलेले निर्णय बदलणे आणि केलेल्या घोषणा पुन्हा बासनात गुंडाळणे यालाच तर राजकारण म्हणतात. पुन्हा लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केलेल्या पवार साहेबांनी अचानक दोन दिवसांपूर्वी माढामधून लढणार असल्याचे संकेत देऊन आपली ‘…छोटी सी आशा’ पूर्ण होण्यासाठी लोकसभेच्या दाराची आता कडी वाजविली आहे.
देश असो की महाराष्ट्र, राजकारणाची आगामी दिशा काय असेल व पुढे काय घडेल, याची संभाव्य चाहूल समजण्यामध्ये शरद पवार हे तमाम राजकारण्यांचे बाप म्हणून ओळखले जातात. पवारांचे आडाखे व अंदाज क्वचितच चुकल्याचा इतिहास आहे. सध्या देशपातळीवर मोदींविरोधात भली मोठी आघाडी एकत्र येऊन टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. मोदींचा करिश्मा संपलेला असून लाट ओसरलेली आहे, हे कर्नाटक तसेच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या आणि त्याही अगोदर झालेल्या गुजरात राज्याच्या निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. अशक्य समजली जाणारी घटना म्हणजे मायावती व अखिलेश यादव एकत्र आल्याने तर मोदी विरोधकांना आत्ताच विजय झाल्याचा आनंद झालाय. एकूणच देशपातळीवर उभ्या राहिलेल्या या आघाडीमध्ये सामंजस्यपूर्वक चर्चा व सूत्रसंवाद साधणे यामध्ये शरद पवार यांना आदराचा व ज्येष्ठत्वाचा मान असल्याचे कोलकत्ता येथे झालेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात संपूर्ण देशाने पाहिले आहे.
नोव्हेंबर २०१८ पासूनच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांच्या वाटपाबाबत चर्चा सुरू झाली व दोन्ही पक्षांनी गांभीर्याने आगामी लोकसभेकडे पाहिले. आता ताण वा वाद निर्माण होणार नाही अशी दोन्ही पक्ष काळजी घेत आहेत. देशात उत्तरप्रदेशनंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्राकडे आहेत. त्यामुळेच आपल्या तत्वावर व भूमिकेवर ठाम असलेले ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेसने अगोदर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने सबूरीचे धोरण स्विकारत त्यांनाही समतोल न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा लोकसभा लढवणार नाही अशी घोषणा केलेल्या व राज्यसभेचा मार्ग पत्करलेल्या पवारांनी म्हणूनच काळाची पाऊले ओळखून आपला निर्णय बदलून माढा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहेत. या निर्णयाबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचकपणे, पवारांचे वाढते वय व आदर दाखवत चिमटा काढला असला तरी पवारांनी त्यांना दिलेले उत्तर पुरेसे बोलके आहे.
वास्तविक शरद पवारांची प्रधानमंत्रीपदाची मनिषा कधी लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते ही भावना वारंवार बोलून दाखवितात. दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या हयातीत ‘पवार प्रधानमंत्री होणार असतील तर पाठिंबा देऊ’ अशी जाहीर घोषणा केल्याचा इतिहास आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे पवारांच्या घरी चर्चेला जाणे व सोनिया गांधी यांना पवारांविषयी अलिकडे निर्माण झालेली आस्था पाहता उद्या आघाडीला बहुमत आलेच तर ते पेलणे व सरकार चालविणे हे आव्हान पवार सहज निभावू शकतात याबद्दल आघाडीमध्ये संदेह नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातील एक एक जागा महत्त्वाची असल्याने व कुठलाही धोका पत्करायचा नाही असे ठरविल्याने माढ्यामधून खासदारकी लढविण्याची आता पवारांची तयारी सुरू आहे. हे करत असतानाही त्यांनी एका दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी मारले आहेत;
प्रचंड महत्वाकांक्षी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या नेत्यांमधील वाद व गटतटाचा संघर्ष आपल्या उमेदवारीमुळे थांबेल, हक्काची एक जागा भांडणात गमावण्यापेक्षा पदरात पडेल आणि महाआघाडीच्या गळ्यात ‘अक्षता’ पडण्याची संधी निर्माण झालीच तर ‘रोजा’ चित्रपटातील गाण्याप्रमाणे ‘दिल है छोटासा, छोटी सी आशा’ ठेवायला काय हरकत आहे, असा विचार पवारांनी केला असावा.