(विजय जगताप)
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेवटचे अतिदूर्गम गाव असलेल्या कळकराई या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणच्या कर्मचा-यांना दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर यश आले.
खोल दरीतून गेलेल्या वीजवाहक तारा तुटल्याने संपूर्ण गाव मागील पंधरा दिवस अंधारात होते, विशेष म्हणजे गावाला कोरोनाने विळखा घातलेला असल्याने हे आव्हानात्मक काम महावितरणने यशस्वी करून दाखविले.
पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हयाच्या सीमेवर हे काळकराई गाव मावळ तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. अतिदूर्गम आणि सह्याद्रीच्या डोंगररांगानी वेढलेले हे जंगलसदृश्य गाव असून गावात अवघे ५५ वीजग्राहक आहेत.गावाची वेस ओलांडली व डोंगर पार केला की कर्जत तालुका सुरू होतो.गावाला सध्या कोरोनाच्या संसर्गाने वेढले असून अशातच मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने दरी-खो-यातून उभारण्यात आलेल्या ८०० मीटर लांबीच्या तीन वीजतारा तुटल्या आणि कळकराई गाव अंधारात गुडूप झाले.
महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून २२ केव्ही वाहिनीद्वारे कळकराई गावापासून साडेतीन किलोमीटर लांब असलेल्या सावळा या गावात रोहित्र उभारून लघुदाब वाहिनीद्वारे कळकराई गावाला वीजपुरवठा केला जातो.यासाठी डोंगरावर दोन तर डोंगराच्या पायथ्याला दोन असे चार वीजखांब उभारण्यात आलेले आहे.आणि तेथून सुमारे दिड किलोमीटर खोल दरीमधून वीजतारा टाकण्यात आल्यानंतर कळकराई गावातील घरांमध्ये वीज आलेली आहे.
हे दृश्य पहायलाच इतके अंगावर काटा आणणारे आहे की इतक्या अवघड पध्दतीने महावितरणने वीज दिलेले राज्यातील हे पहिले गाव असावे.
आधीच दूर्गम भाग, त्यात कोरोनाने गावाला वेढलेले आणि लाईट नसल्याने जणू ह्दयक्रिया थांबल्याची गावक-यांची स्थिती होती.स्थानिक गावक-यांनी त्वरीत मावळचे आमदार सुनिल शेळके यांना गाव अंधारात असल्याची माहिती दिली.त्यांनी त्वरीत आपल्या काही कार्यकर्त्याना पाहणी करण्यासाठी तेथे पाठवले . सागर बोडके या कार्यकर्त्यांने आपल्या टिमसह विद्युत विभागातील कर्मचारी घेऊन या गंभीर स्थितीचा सर्व्हे केला.अखेर महावितरणच्या कर्मचारी व अधिका-यांनी हे आव्हान पेलायचे ठरविले.पुणे ग्रामीणचे अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरूनगर विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गरूड , मावळचे उप कार्यकारी अभियंता विजय जाधव,शाखा अभियंता श्याम दिवटे यांनी ३० जनमित्र व कंत्राटदार मे.कोमल इलेक्ट्रीक्स यांच्या कर्मचा-यांनी ७ मे रोजी कामास सुरूवात केली.गावातील लहान मोठयांसह सारे गावकरी महावितरणच्या टिमला मदत करण्यासाठी लोटले होते.काम वेग घेत असताना अचानक दरीत उतरताना नितळ झालेल्या पाषाणाची (दगड)मोठी ढेप सचिन भोसले या कर्मचा-याच्या डोक्यावर कोसळली. रक्तबंबाळ झालेल्या भोसले यांना तातडीने दुस-या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले .खिंडीतून निसटलेल्या दगडाचा मार बसल्याने त्यांना तीन टाके पडले.अखेर दुस-या दिवशी सायंकाळी हे काम पूर्ण होताच गावक-यांनी टाळयांच्या कडकडात सर्वाचे अभिनंदन केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.आमदार शेळके यांनीही आनंद व्यक्त केला.