केंद्राने लागू केलेल्या कामगार कायद्यांच्या विरोधात शिवसेना हा राजकीय पक्ष देखील आहे व परवाच्या आंदोलनात या पक्षाची मंडळी देखील सहभागी असल्याने पक्षप्रमुख
म्हणून ठाकरेंवरही गुन्हा दाखल व्हायला हवा ,अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे स्वराज अभियानचे महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे यांनी आज केली.
देशभर केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात २६ नोव्हेम्बर रोजी आंदोलन करण्यात आले होते.
पिंपरी येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन पूर्णपणे शांततेत केले गेले. कोणताही त्रास कोणत्याही नागरिकास झालेला नाही. राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले पक्षही या आंदोलनात सहभागी झाले होते. असे असताना पिंपरी चिंचवड येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकामधील काही जणांविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात कामगार नेते कैलास कदम, इरफान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संजीवन कांबळे, संदीप भेगडे, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम, अजित अभ्यंकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, महाराष्ट्र पोलीस कायदा, साथीचे रोग अधिनियम, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही पोलिसांची कृती निषेधार्ह असून हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश द्यावेत अशी स्वराज इंडिया- महाराष्ट्रने मुख्यमंत्र्यांकडे केली.
राज्यात सत्ताधारी पक्ष असूनही आपल्या पक्षाने या काळ्या कायद्याविरोधी भूमिका घेतली आहे, हे चांगलेच आहे. पण मग असे कायदे रद्द करा असे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या जनतेविरुद्ध गुन्हे दाखल होणार नाहीत हे आपणच पोलिसांना सांगणे अपेक्षित आहे. आपण हे सांगणार नसाल तर मग पक्ष नेते म्हणून खरेतर आपल्यावरच गुन्हे दाखल करावयास हवेत कारण आंदोलनात आपला पक्षही सहभागी होता, असे कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.