( विजय जगताप)
पिंपरी महापालिकेत काॅग्रेस पक्ष शून्य नगरसेवक संख्येवर असला तरी संघटना पातळीवर मात्र मागील दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन असो की सामाजिक प्रश्न याबाबत काँग्रेस आक्रमक भूमिका बजावत आहे, मात्र गटबाजीमुळे एकच आंदोलन वा कार्यक्रम दोन गट स्वतंत्रपणे राबवित असल्याने यांच्यात समेट कधी होणार याची प्रतिक्षा काँग्रेसप्रेमींना लागून राहिली आहे.
सचिन साठे हे दिर्घकाळ शहर जिल्हा अध्यक्षपदी कायम आहेत.शहरात काँग्रेस पक्षाचा डोलारा टिकवणे व शहरपातळीवर पक्ष सातत्याने जिवंत ठेवण्याचे काम ते करत आले आहेत.२०१७ साली पालिका निवडणूकीत भाजपने त्यांच्यावर जाळे फेकूनही निष्ठावंत काँग्रेसी म्हणून त्यांची नोंद विशेष उल्लेखनीय ठरली. भाजपच्या तडाखी लाटेत शिवसेनेचे देखील पानिपत होता होता वाचले.
काॅग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून न येणे यासाठी तत्कालीन नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांनी तसेच वरिष्ठ नेत्यांनी शहराकडे फिरवलेली पाठ देखील तितकीच कारणीभूत ठरली.
पिंपरीत तशी काँग्रेसला गटबाजीची परंपरा पूर्वीपासूनचीच…! एकत्रित काॅग्रेस असताना पक्षात एकाच वेळी प्रा रामकृष्ण मोरे यांना मानणारा व अजित पवार यांना मानणारा असे दोन गट होते. मोरे सरांच्या निधनामुळे शहरात काँग्रेस पुढे इतकी पोकळ झाली की ती उठूच शकली नाही.
दोन वर्षापूर्वी युवक काॅग्रेसच्या निवडणूका झाल्या आणि मयूर जयस्वाल व नरेंद्र बनसोडे हे दोन ताकदीचे युवक पटलावर आले. जयस्वाल हे युवक काॅग्रेसचे राज्य सरचिटणीस झाले तर बनसोडे हे शहर युवकचे अध्यक्ष झाले.
युवकांचे हे दोन्ही शहरपातळीवरील नेते एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर राहत असले तरी त्यांच्यात पडलेले अंतर सध्या कोसो दूर आहे.
सचिन साठे यांच्या कार्यक्रमात बनसोडे सहभागी नसतात, मात्र बनसोडेंचा स्वंतत्रपणे कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न लक्षवेधी ठरत चालला आहे.साठे यांनी प्रतिकूल काळापासून काॅग्रेसचा गाडा हाकण्याचे काम निष्ठेने केले,परंतू गटबाजी व वरिष्ठांचे दुर्लक्ष यामुळे त्यांना मर्यादा आल्या आहेत.
परवाच्या युपीमधील ताज्या अत्याचाराच्या घटनेत दोन स्वतंत्र आंदोलन झाल्याने काॅग्रेस लोकांच्या नजरेत जिवंत दिसली खरी मात्र पदाधिका-यांच्या एकमेकांच्या नजरेतून उतरली आहे.