( विजय जगताप)
आपल्याच सरकारच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या भूमिकेला छेद देण्याचे धाडस दाखवून पार्थ पवार यांनी ऐन थंडी -गारठयाच्या या दिवसात आपल्या पक्षाचा घाम काढल्याने भाजपमध्ये आनंदाच्या उकळया फुटल्या आहेत.
दिड वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०१९ च्या दरम्यान पार्थ पवार हे नाव महाराष्ट्राला समजले. राजकारणात उडी मारणारे पवार घराण्यातील तिसरे ठरलेले रोहित पवार यांनी मागील दोन वर्षापासून कर्जत-जामखेड मधून आमदारकीची तयारी सुरू केल्याने साहजिकच पार्थला मागे ठेवणं म्हणजे अन्यायासारखं होईल,अशी भावना अजितदादांच्या परिवारात उफाळून आली आणि त्यास थेट लोकसभा रिंगणात उतरविण्याचा निर्णय झाला.तेव्हा शरद पवार स्वत: आपली भीष्मप्रतिज्ञा मोडून लोकसभा लढविण्याच्या तयारीत होते मात्र ‘एकाच घरातील किती जणांनी लढायचं’ या जाणिवेने शरद पवार यांनी स्वत: माघार घेत अजितदादांच्या आग्रहाखातर मावळमधून पार्थच्या उमेदवारीला आपल्या मनाविरूध्द कौल दिला. पक्षाच्या संस्थापकावरच तेव्हा नामुष्कीची वेळ आली होती.कारण शरद पवार सोडून आख्खी राष्ट्रवादी पार्थच्या बाजूने अपरत्यक्षरित्या उभी होती.चिंचवड येथील वाल्हेकरवाडीच्या ( आहेर गार्डन)पहिल्या सभेनंतर शरद पवारांनी पार्थच्या प्रचारात फारसे लक्ष न दिल्याची खोच सर्वांच्या नजरेतही येत होती. पुढे अजितदादांनी पार्थच्या विजयासाठी जीवाचं रान केलं मात्र मोदी लाटेचा ज्वर दुस-यांदा पुन्हा श्रीरंग बारणे यांना कामी आला.”भाजपमुळेच मी विजयी झालो “अशी प्रतिक्रिया तेव्हा बारणे यांनी दिली होती.
पार्थचा पराभव हा पवार घराण्यातील पहिला पराभव म्हणून इतिहासात नोंद झाला.वास्तविक लोकसभा २०१९ ची सर्व सुत्रे तेव्हा अजित पवार यांनी आपल्या हाती घेतली होती. भाजपने तर सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी पवारांच्याच नातेसंबंधातील कुल घराण्यातील महिलेला उभी करणं, प्रचंड यंत्रणा लावणं शिवाय नरेंद्र मोदी, शहा यांच्या सभा लावूनही सुळे या विजयी झाल्या.
पुढे विधानसभेला मात्र सर्व सुत्रे आपल्या हाती घेत हा ८० वर्षाचा योध्दा पुन्हा मैदानात उतरला आणि असं मैदान मारलं की भाजपच्या तोंडातील सत्तेचा महाराष्ट्रातील घास काढला. पवारांचे डावपेच, राजनीती व चाणक्यपणाला उभ्या देशाने सॅल्यूट ठोकले.
पहाटेच्या शपथविधीमुळे मनात अढी असूनही परंतू अजित पवारांना मानणारा वर्गही मोठा असल्याने त्यांना पुन्हा पंखाखाली घेत उपमुख्यमंत्री केलं गेलं.
पराभवानंतर १४ महिन्यांनी पार्थ यांनी आपल्या सामाजिक कामाची छाप निर्माण करण्यास अलिकडे सुरूवात केली. मग कोरोनाचा आढावा घेणेसाठी आयुक्तांबरोबर बैठक घेणे, आपल्या फाऊंडेशन मार्फत मावळातील हाॅस्पिटलांना रूग्ण सुविधेसाठी साहित्य पुरविणे, कान्हे येथे नियोजित शासकीय रूग्णालयासाठी लक्ष घालणे आदी कामांना सुरूवात केली.त्याकडे फारसे कोणी गांभीर्याने बघितले नाही मात्र राममंदिर शिलान्यास दिवशी त्यांचे ‘जय श्रीराम ‘असे ट्विट करणे आणि सुशांत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे आश्चर्याचा धक्का होता. पक्षभूमिकेच्या मूळावरच घाव घालण्याच्या या प्रकारामुळे तिरकस व अवहेलनायुक्त बोलण्यात ‘बाप ‘असलेल्या पवारांनी पार्थला योग्य जागा दाखविली.
अजितदादांनी नुकतेच ६२ व्या वर्षात पदार्पण केल्याने अजून किती दिवस पार्थला रिंगणाबाहेर ठेवायचं हा देखील प्रश्न आहे.लोकसभेतील पराभवानंतर पार्थ आता हळूहळू पुढे येत असताना ते अपरिपक्व असल्याच्या पवारांच्या विधानानरून घरातील वातावरण स्फोटक बनले आहे.यापुढे खासगी मते व विचार बाहेर न फुटण्याची काळजी त्वरेने घेण्यास सुरूवातही झाली आहे.
एकीकडे समवयस्क चुलत भाऊ रोहित पवार याचे ॲक्टीव्ह होणे, पवारांनी त्यास रयत सारख्या शिक्षण संस्थेवर घेणे,समवयस्क आदित्य ठाकरे थेट आमदार झाल्यानंतर मंत्री होणे या गोष्टी पार्थला अस्वस्थ करणा-या असाव्यात , त्यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी कोंडलेली वाफ बाहेर आली इतकंच या घटनांबाबत म्हणता येईल. बाकी पार्थ उचकवायला भाजपमधील काही मंडळींनी बाहया सरसावल्या असल्या तरी फारसा उपयोग होणार नाही अशी चिन्हे आहेत.