( विजय जगताप)
आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं.परंतू अमिताभ बच्चन सारखा महानायक जेव्हा मृत्यूपासून फक्त दोन बोटे दूर होता ( ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेला फायटींग सीनमधील अपघात) तेव्हा तो ‘खडखडीत बरा होऊन चालत घरी जाईन’असे भविष्य सांगून गिरीश शहा यांनी डाॅक्टरांचा जीव भांड्यात पाडला होता.पुढे ठिक झाल्यानंतर अमिताभला ही घटना समजली आणि तो गिरीश शहांचा फॅन बनला.
गिरीश शहा ( वय ७६) हे पुण्यात राहत असलेले एक साधे गृहस्थ.एकाच माणसाच्या अंगामध्ये किती गुण व कला असाव्यात याचं निसर्गालाही कोडं पडावं असं भन्नाट व्यक्तिमत्व…! शिक्षक, बॅंक आॅफ बडोदाचे निवृत्त मॅनेजर,जगप्रसिद्ध हस्ताक्षर तज्ज्ञ,अर्थसल्लागार, कायदयातील किडा असलेली विद्वता,वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र याचा प्रचंड अभ्यास व छंद, छायाचित्रणाची आवड,लेखक, कवी,संवेदनशील मनाचा सामाजिक कार्यकर्ता…अशी त्यांची बहुविध रूपे आहेत.
आयुष्य भरभरून जगलेल्या व नोकरी व छंदांमुळे जग पाहिलेल्या,जगभरातील माणसं वाचत त्यांचा अभ्यास करण्याचा नाद असलेल्या गिरीश शहा यांचं आत्मवृत्त चार वर्षापूर्वी प्रसिध्द झालं.पंडीत भीमसेन जोशी,पु.ल.देशपांडे,बाबासाहेब पुरंदरे,व.पु.काळे,उस्ताद अल्लारखाॅ,अमजद अली खान, झाकीर हुसैन,परवीन सुल्ताना, शोभा गुर्टू,न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, कायदेतज्ञ नानी पालखीवाला,डाॅ श्रीराम लागू,महाराष्ट्रातील अर्धा डझन मंत्री, मुख्यमंत्री अशा शेकडो टाॅपमोस्ट मंडळींशी त्यांचा झालेला परिचय व स्नेह यामुळे या सा-या मंडळींच्या आठवणी त्यांनी आपल्या आत्मवृत्तात लिहिलेल्या आहेत.त्यात अमिताभ बच्चनची देखील आठवण आहे.
१९८२ मध्ये कुली चित्रपटाचे शुटींग सुरू असताना अमिताभला अपघात झाल्यानंतर सारा देश हळहळला व तो बरा होण्यासाठी प्रार्थना करू लागला.मुंबईतील ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.आशिया खंडात प्रसिद्ध नाव असलेले शरद शहा या पोटाच्या विकारातील तज्ञ असलेल्या डाॅक्टरांच्या नेतृत्वाखाली अमिताभवर इलाज सुरू होता.तेव्हा गांधी व बच्चन घराण्याचे मधुर संबंध होते. पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी ताबडतोब आपला मुलगा राजीव यास खास दूत म्हणून अमिताभची प्रकृती पाहण्यास पाठविले.मुंबईत आल्यानंतर राजीव गांधींनी अमिताभची भेट घेऊन उपचाराची माहिती डाॅक्टरांकडून घेतली आणि जाताना डाॅक्टर शहा यांच्या डोळ्यात डोळे घालून “ हा आमचा पेशंट आहे, इलाजामध्ये कुठलीच कसूर होता कामा नये, त्याचा जीव वाचविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे” असा खडा इशाराच दिला.
अमिताभ नट असल्यामुळे त्याची असलेली तूफान लोकप्रियता आणि त्यात थेट देशाच्या पंतप्रधानांचे असलेले लक्ष यामुळे डाॅक्टर शहा यांना राजीव गांधींच्या इशा-यामुळे घाम फुटला. प्रकृती नाजूक झाली की जगातील प्रत्येक डाॅक्टर हा रूग्णाच्या नातेवाईकांना “ आता यांना देवच( गाॅड) वाचवू शकतो” अशी सुचना करत असतात.डाॅक्टर शहा यांना आपल्या दूरच्या नातेवाईक असलेल्या गिरीश शहा यांची आठवण झाली.तेव्हा ते सांगलीच्या बॅक आॅफ बडोदामध्ये कार्यरत होते.लगेच मुंबईहून ट्रंक काॅल सांगलीच्या बॅकेत खणखणला.( तेव्हा मोबाईल युग नव्हते, जिल्ह्यांच्या बाहेर फोन करायचा म्हटले तरी ट्रंक काॅल करावा लागे)डाॅक्टरांनी सगळी कहाणी सांगितली.गिरीश शहा यांनी ताबडतोब अमिताभची जन्मवेळ, जन्मतारीख मागितली.डाॅक्टरांकडे ही माहिती रेडी होती.अर्ध्यातासानंतर पुन्हा मुंबईहून बॅकेत फोन वाजला.
“काही काळजी करू नका, अमिताभ ठणठणीत बरा होऊन पायी घरी जाईन, त्याच्या पत्रिकेतच अपघाताचा योग आहे, बिल्कूल चिंता करू नका”असं एका दमात मोठया आवाजात ओरडून गिरीश शहा हे डाॅक्टरांना सांगत होते.( पूर्वी ट्रंक काॅलवर बोलताना आपोआप आवाजाची पट्टी चढली जायची)
अखेर अमिताभ वाचला.डाॅक्टर शहा हे पुढे वर्षभर त्याच्या घरी तपासायला जात असत.एकदा गप्पा मारताना डाॅक्टर शहांनी अमिताभला राजीव गांधींचा दम व नंतरची घटना सांगितली. देव-धर्म व ज्योतिषावर अमिताभची श्रध्दाच असल्याने त्याने ताबडतोब गिरीश शहा यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.दोघांची भेट झाली पुढे या भेटीचं स्नेहरूपी धाग्यात रूपांतर झालं.
आज बातमी खासच्या कार्यालयात आलेल्या गिरीश शहा यांच्या तोंडून हा किस्सा ऐकताना मजा आली. त्यांचा लवकरच “अर्पण”या नावाचा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे.बातमी खास परिवारातील घटक असलेल्या अंशुल प्रकाशनातर्फे हा कविता संग्रह बाजारात येतोय. शहा यांनी चिंचवड येथील आपल्या दिवंगत बहिणीला ( नंदू शहा-प्राचार्य फत्तेचंद जैन कन्या हायस्कूल )तो अर्पण केलाय.कुंडली शास्त्र व हस्ताक्षर तज्ञ ( गुन्हेशाखा,सीबीआय, राॅ आदी संस्था तपासासाठी त्यांची मदत घेतात) यामुळे आंतरराष्ट्रीय नाव झालेल्या गिरीश शहा यांचे हे पुस्तक म्हणजे पाचवे अपत्य असणार आहे.
येत्या २९ जून रोजी प्रकाशित होत असलेल्या या कविता संग्रहाची पहिली प्रत प्रकाशक म्हणून मी त्यांना आज भेट दिली.