पिंपरी चिंचवडच्या घरकुलमधील घटना
(विजय जगताप)
आमचा परिसर सील केलाय? आमची राशनकार्डे बंद पडलीत?हक्काचे धान्य तरी दया?अशी विनंती रहिवाश्यांनी एकत्रितपणे पत्र लिहून थेट अजितदादांच्या पीएला ते पत्र व्हाॅटसअप केले,आणि सूत्रे हालली. राज्यात प्रथमच २ हजार कुटूंबांचे धान्य घेऊन थेट दुकानदारच त्यांच्या दारात आल्याची घटना नुकतीच येथे घडली.
आर्थिक दूर्बल घटकातील लोकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या चिखली येथील घरकुल वसाहतमध्ये हा प्रकार घडला.१५५ इमारती असलेल्या घरकुलमध्ये जवळपास साडेपाच हजार कुटूंबे राहतात. शहराच्या विविध भागातून लोकं येथे रहायला आल्याने ८० टक्के लोकांच्या राशनकार्डवरील पत्ता स्थलांतरीत झाल्याने बदललेला नव्हता, शेकडो जणांचे कार्ड आधारलिंक झालेले नव्हते आणि कोरोना रूग्ण येथे सापडल्याने तर हा परिसर सील झालेला होता.
अशा अडचणीच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी येथील घरकुल फेडरेशनचे प्रवर्तक अशोक मगर व विष्णू मांजरे यांनी थेट आपले गा-हाणे उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचवायचं ठरविलं, मात्र ते लक्ष घालतील का? अशी शंका आल्याने मग दादांचे पीए डिकळे यांना पत्र लिहून ते व्हाॅटसअप करण्यात आले. दुस-या दिवशी श्री मगर यांना थेट दादांचे खासगी सचिव राम चौधरी यांचा फोन आला. ‘तुमच्या अडचणी लक्षात घेण्यात येत असून किती जणांच्या रेशनकार्डची समस्या आहे याची लिस्ट पाठवा ‘.
लागलीच घरकुलच्या सर्व इमारतीच्या अध्यक्षांनी यादया बनवल्या ,व्हाॅटसअपवर त्या पाठवण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व अन्न धान्य वितरण अधिका-यांना आदेश दिले गेले. मग चिखली व परिसरातील रेशन दुकानदारांना धान्य घेऊन ते तेथेच वितरीत करण्याचं सांगितलं गेलं.. ही प्रक्रिया इतकी फास्ट होत होती की धान्य कसे येईल? वाटपाचे नियोजन कसे करायचे? सोशल डिस्टींक्शन कसे पाळायचे? गर्दी कशी टाळायची? याचा प्लॅन आखण्यात आला आणि अवघ्या सहा दिवसात २ हजार कुटूंबांना कुठल्याही गोंधळाशिवाय त्यांच्या दारात गहू व तांदूळ देण्यात आला. यासाठी वितरण अधिकारी भोसले व स्वामीनी महिला बचत गट,उषा छाजेड, झलकारी महिला बचत गट आणि सिजा गुप्ता या चार दुकानदारांचे सहकार्य लाभले.
रेशनचे धान्य घेऊन रहिवाश्यांच्या दारात नेऊन देण्याची ही पहिलीच घटना राज्यात यानिमित्ताने घडली.यासाठी अशोक मगर यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला.