(अरुण तुकाराम बोऱ्हाडे)
प्रतिवर्षी एक मे, हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. याचदिवशी १९६० साली, स्वातंत्र्योत्तर भारतातील मराठी भाषकांचे राज्य म्हणून सध्याच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
एक मे, हा दिवस जगात सर्वत्र कामगार दिन म्हणूनही पाळला जातो. कामगारांना आपल्या हक्कासाठी लढताना रक्त सांडावे लागले होते. त्यांचे स्मरण यादिवशी जगभर केले जाते.
नविन पिढीला माहिती असेल किंवा नसेलही, पण आपल्या मराठी भाषकांच्या राज्याच्या मागणीसाठीही अनेकांना रक्त सांडावे लागले आहे. सन १९५५-५६ मध्ये “मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे” या घोषणांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता. “संयुक्त महाराष्ट्र आंदोलन” म्हणून ते इतिहासात नोंदले गेले. या आंदोलनात सुमारे १०५ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. मुंबईत गेलात तर, “हुतात्मा चौक” येथे या हुतात्म्यांची जपलेली चिरंतन स्मृती पहावयास मिळते. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या सर्व आंदोलकांचे व त्यासाठी लढलेल्या धुरीणांचे स्मरण केले जाते. त्या सर्वांना विनम्र अभिवादन.
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी गुजरातसह द्विभाषिक मुंबई राज्य होते. त्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण होते.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक मे १९६० रोजी केंद्र सरकारने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ यांसह सध्याच्या महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. कै. यशवंतराव चव्हाण हे अत्यंत संयमी, मुत्सद्दी आणि कुशल नेते होते. आंदोलन कर्त्यांची भूमिका केंद्रीय नेतृत्वाला व्यवस्थित पटवून, संयुक्त महाराष्ट्राला त्यांनी मान्यता मिळवून आणली, हा मंगल कलश त्यांनीच आणला असे मानले जाते. अर्थात त्यावेळी सध्याच्या कर्नाटकातील कारवार, धारवाड, निपाणी, बेळगांव हा भाग महाराष्ट्रात सामिल होवू शकला नाही. आजही तेथील मराठी बांधव कर्नाटक सरकारच्या सावत्रपणाच्या भावनेचे चटके सोसत आहेत, ती खंत कायम बोचत राहणारी आहे.
नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री यशवंतराव चव्हाण यांचीच निवड करण्यात आली.
या नवीन एकजिनसी मोठ्या मराठी भाषिक राज्याचे नेतृत्व करताना मोठीच कसोटी लागणार होती. भाषा जरी मराठी असली तरी, मराठवाडा व विदर्भातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना विश्वास देणे, सर्वांना बरोबर घेऊन काम करणे, प्रत्येकाचा मान व अभिमान सांभाळणे तसे आव्हानात्मक होते. कै. यशवंतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत, सुजाण व समतोल व्यक्तीमत्व होते. ते आधुनिक विचारांची कास असलेले, सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील प्रतिनिधी होते. प्रत्येक प्रश्नांची जाण व सोडविण्यासाठीचे कौशल्य त्यांना अवगत होते.
घराचे बांधकाम करताना घराचा पाया मजबूत असेल तर त्याचा हवा तसा विस्तार करता येतो. तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या विकासाचा पाया मजबूत तर घातलाच, शिवाय तो दूरदृष्टीने सर्वव्यापी असा केला. राज्याचा विकास म्हणजे केवळ भौतिक किंवा आर्थिक प्रगती नव्हे. तर त्या राज्यातील सामान्य माणसाला राज्य आपले वाटले पाहिजे, त्याच्या जीवनात सहजता यायला हवी. व्यक्ती च्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक सुविधांसह शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खेळ-क्रिडाविषयक गोष्टींनाही महत्त्व दिले पाहिजे, ही त्यांची मनोभूमिका होती.
द्वैभाषिक राज्याच्या नेतृत्वात असतानाच त्यांनी महाराष्ट्रात कोयना धरण प्रकल्पाची पायाभरणी केली. कोयना धरण प्रकल्प हीच खरी महाराष्ट्राच्या विकासाची जननी आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.
कोयना प्रकल्प मार्गी लागल्याने, महाराष्ट्र राज्य विजनिर्मितीत स्वयंपूर्ण झाले. सातारा, सांगली व कोल्हापूरच्या बहूतांश भागातील शेती ओलिताखाली आली. त्यामुळे ऊस उत्पादन सुरू झाले आणि पाठोपाठ सहकारी साखर कारखानदारी भरभराटीस आली. गेल्या साठ वर्षांत राज्यात इतरही असंख्य लहानमोठे धरणप्रकल्प, पाटबंधारे योजना करण्यात आल्या. कोयना विज निर्मितीमुळे मुंबईबाहेर आणि पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात औद्योगिकीकरण वाढीस लागले. एम.आय.डी.सी.ची स्थापना करण्यात आली. उद्योगांना लागणाऱ्या दळणवळणासाठी रस्तेबांधणी करण्यात आली. अनेकांना माहिती नसेल मुंबईला जाण्यासाठी ठाणे खाडीवरिल पूल यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला. महाराष्ट्रात आय.टी.आय.चे जाळे उभारण्यात आले. त्यामुळे उद्योगांना प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध झाले आणि युवकांना दर्जेदार रोजगार उपलब्ध झाले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला रोजगार, उद्यम, व्यवसायात संधी मिळाली. त्यापाठोपाठ नाशिक व औरंगाबाद व कोकणातही उद्योगधंदे वाढीस लागले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच शिक्षणाचा पाया मजबूत करण्यात आला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. माध्यमिक शिक्षणासाठी प्राधान्य देऊन खेडोपाडी शाळा काढण्यास प्रोत्साहन देण्यात आले. शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि कामगारांच्या पाल्यांसाठी ई,बी.सी. फी सवलत देण्यात आली. गेली साठ वर्षे माध्यमिक शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र सरकार करीत आहे, ही योजना राज्य स्थापनेपासून सुरू आहे. राज्यातील दुर्गम भागांत खेडोपाडी, वाड्यां-पाड्यांवर धावणारी एस.टी.बस राज्यातील जनतेची जीवनवाहिनी ठरली. एवढ्यात विकास थांबत नाही. साहित्य, कला, संस्कृतीच्या संवर्धन व विकासासाठी अनेक संस्था व महामंडळे स्थापन करण्यात आली. मराठी भाषेच्या विकासासाठी ‘मराठी ज्ञानकोश’, राज्य व्यवहार कोश, साहित्य प्रकाशनासाठी सहाय्य, चित्रपट निर्मितीसाठी सहाय्य, नाट्य व तमाशा कलाकारांना प्रोत्साहन, कुस्ती कबड्डी आशा खेळांना राजाश्रय देण्यात आला. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राने रुजविल्या, जपल्या, वाढविल्या.
गेली अनेक वर्षांपासून आज साठ वर्षांनंतरही आपला महाराष्ट्र देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वार्थाने आघाडीवर आहे. कोकणपासून विदर्भातील शेवटच्या गावापर्यंत भौगोलिक परिस्थितीचे वैविध्य, नैसर्गिक विविधता, शेकडो जाती-जमाती, आदिवासी, भटके-विमुक्त या सर्वांना बरोबर घेऊन राज्य पुढे चालले आहे. कोणी कितीही वाल्गना केल्या तरी महाराष्ट्र राज्य हे शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, सहकार, ग्रामविकास, नागरी विकास, दळणवळण, सांस्कृतिक अशा सर्वच बाबतीत निश्चितपणे आघाडीवर आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा, संतांचा, अनेक विचारवंतांचा आणि क्रांतिकारकांचा इतिहास लाभला आहे. महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहू यांचा समतेचा विचार या मातीत रुजला आहे. अनेक नामवंत पत्रकार, साहित्यिक व वैज्ञानिक या मातीने घडविले आहेत, तसेच त्यांनीही आपले विचारमोती या मातीसाठी दिले आहेत. आपला भूगोलही समृद्ध आहे. सुमारे ३ लाख ७१ हजार चौरस कि.मी.चे क्षेत्रफळ, ७२० कि.मी.चा सुंदर सागरी किनारा, सुमारे ४५० कि.मी.ची सह्याद्री पर्वताची रांग, आकाशाला गवसणी घालणारी गिरीशिखरे, शिवाय बालाघाट व सातपुड्याच्या डोंगररांगा, वेरुळ-अजिंठ्याची लेणी व इतर असंख्य कला-संस्कृतीची परंपरा सांगणारी पर्यटन स्थळे, सुमारे ३५० हून अधिक गड -कोट -किल्ले, विपुल वनसंपदा..! अभयारण्ये, घाटरस्ते कशाकशाचा उल्लेख करावा ! हेच आपले वैभव आणि हीच आपली समृद्धी आहे.
महाराष्ट्रात ४०० हून अधिक मध्यम व मोठी धरणे, शेकडो लहान मोठे पाटबंधारे प्रकल्प शेतीसाठी झिरपत आहेत. अनेक लहानमोठे वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. महाराष्ट्राने सुमारे ३३ हजार कि.मी.चे पक्के राज्यरस्ते बांधले आहेत.
बदलत्या काळाला सामोरे जाताना केलेली भरभराटही नोंद घेण्याजोगी आहे. पुणे, हिंजवडी व खराडीची माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) उद्यमनगरीने जवळपास पाच लाख देशवासियांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील, देशातील व जगातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांनी शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रात विणले आहे. त्याद्वारे देशभरातील लाखो विद्यार्थी विविध शाखांतील शिक्षणासाठी पुणे-मुंबईला येत असतात. पुण्याजवळ तळेगाव, चाकण, रांजणगांव औद्योगिक क्षेत्रांत जगप्रसिद्ध वाहन उद्योगातील कंपन्यांमधून लाखो अभियंते व तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध झाले आहेत.
कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या पायाभरणीवर महाराष्ट्रातील पुढील सर्व सरकारांनी व नेत्यांनी या पायावर इमारती बांधून विकासाला हातभार लावला आहे. कै. वसंतराव नाईक यांची हरित क्रांती, वसंतदादा पाटील यांची कृषी- सहकार क्षेत्रातील योगदान, शंकरराव चव्हाण यांचे मराठवाड्यासाठीचे योगदान, शरदराव पवार साहेबांचे कृषी, सहकार, औद्योगिक विशेषतः वाहन उद्योग व आय.टी. उद्योगांसाठीचे, तसेच क्रिडा क्षेत्रासाठीचे योगदान महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहणारे आहे. मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीतील पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग किंवा फडणवीसांच्या काळात होऊ घातलेला नागपूर समृद्धी मार्ग या गोष्टींची नोंद घ्यावीच लागेल.
महाराष्ट्रातील सहकारी बँकांची क्षमताही मोठी आहे. हे सर्व आपोआप घडलेले नाही. नेतृत्व करणारांनी सजगतेने, कल्पकतेने, दूरदृष्टीने त्या त्या वेळी घडवून आणले आहे. राजकीय सारीपाटावर कोणी कुठलेही डाव-प्रतिडाव मांडूदेत किंवा मोडूदेत. या देशातील कोणाही सधन अथवा निर्धन व्यक्तीला जगण्यासाठी, सुरक्षितपणे राहण्यासाठी आणि आयुष्याला घडविण्यासाठी माझ्या मराठी मातीचा अर्थात महाराष्ट्राचा पदर अधिक विश्वासाचा आणि निश्चितपणाची ग्वाही देणारा आहे, हे मान्यच करावे लागेल.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला साठ वर्षे होत असताना त्यानिमित्ताने आपणांस हार्दिक शुभेच्छा.