विनोद खन्ना – हे नाव कागदावर लिहिले तरी ती अक्षरेही देखणीच दिसतील असा हा बॉलिवुडचा अतिशय हॅन्डसम हिरो…!
सिंह जसा आपल्या भारदस्त आयाळीने रूबाबदार व जंगलाचा देखणा राजा म्हणून ओळखला जातो. अगदी तसेच या पंजाबी मर्दाने आपल्या चालण्याच्या स्टाईलने व भेदक नजरेने १९८० चे दशक अक्षरश: गाजवून सोडले.तेव्हा साबण, शॅम्पू, क्रिम याच्या जाहिराती टिव्हीवर करायच्या म्हटल्या म्हणजे नट्या व माॅडेल पोरी यांच्या नावे जणू सातबारा असल्यासारखी परिस्थिती होती.परंतू गोदरेज कंपनीच्या सिंन्थाॅल साबणाची ॲड विनोद खन्नाने करून वहिवाटच बदलून टाकली. मेरा गाव मेरा देश या पिक्चरचे शुटींग सुरू असताना हा बाबा डायरेक्टरला व धर्मेंद्रला म्हणाला, ‘मला नकली खोटं खोटं न मारता खरंच हाण ‘ इतका तो आपल्या भूमिकेसाठी परफेक्टनिस्ट होता.
१९८२ च्या सुमारास चित्रपटसृष्टी सोडून तो संन्यासी बनला. मोबाईल , इंटरनेटचे युग नसताना त्याने भारताच्या कानाकोप-यात ओशो रजनीश हे नाव तेव्हा २४ तासात पोहोचविले.आणि तो पुण्यात आश्रमात आठवडयातील दोन दिवस राहू लागल्याने तर कोरेगाव पार्क मधील हे आश्रम रातोरात भारतात प्रसिद्ध झालं. अध्यात्म, बुद्धतत्वज्ञान, ओशोंची वचने यामुळे भक्त संप्रदाय पुणे व पिंपरीतही वाढला. पुढे सात वर्षानी त्याने संन्यासी जीवन सोडून दिले. २००१ ला सुरेश कलमाडींनी भरविलेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलचे वृत्तांकन करायला गेलो होतो. या फेस्टीव्हलचे उदघाटन त्याच्या हस्ते होणार होतं. केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री असलेल्या विनोद खन्नाजवळ केवळ पत्रकार असल्यानेच जाता आले.
पुढे एक-दिड वर्षातच वाजपेयी सरकारने पुण्यातील फिल्म इन्स्टिटयूटची जबाबदारी विनोद खन्नांवर सोपविली आणि त्याच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला अर्धातास अगोदर मी फिल्म इन्स्टिटयूटमध्ये पोहोचलो. परंतू वेळेवर आलेल्या विनोद खन्नाच्या शेजारी बसून गप्पा मारण्याची संधी मला घालवायची नव्हती आणि मी त्यात जिंकलो. अध्यात्म व ओशो रजनीशबद्दल व आश्रमातील अनुभवांबद्दल दहा मिनिटे आम्ही बोलत होतो. गमतीत मी त्याला ‘सिंथॉल’ साबणाची आठवण करून दिली.तेव्हा गालावर खोल खळी पडेपर्यंत खळखळून हसत तो म्हणाला, ‘अरे.. वो साबुण दिल्ली के मेरे एक फॅनने अब तक शोकेसमे संभाल कर रखा है.. वो सिंथॉलवाले तो साबण बेचना चाहते है लेकिन मेरे कई फॅन वो साबण एक बार लेते है और खत्मही नही करते..? अब कैसा उनका धंदा होगा?’ असा मला सवाल करताच आम्ही दोघंही खुप हसलो.
आज तो जाऊन तीन वर्ष पूर्ण होतंय.रूप, सौंदर्य, देखणंपण हे सारं क्षणभंगूर आहे, काहीच कायम राहत नसतं. बॉलिवुडमध्ये अनेक देखणे चेहरे आहेत पण विनोद खन्नाच्या दिसण्यात असलेला मर्दानी अंदाज, लकब व पहाडी आवाजाबरोबर बलदंड शरीरयष्टी कुणाकडंच नाही हेच त्याचं वैशिष्टय होतं आणि वैशिष्टय राहणार…