कोरोनामुळे आपल्या गावी आल्यानंतर (सलगर खुर्द तालुका मंगळवेढा )येथील रानातील आपल्या घराजवळील झाडांवर नागेश व्हनवटे या तरूणाने स्मार्ट टेक्निक वापरून पक्ष्यांच्या पाण्याची सोय करून सर्वांना प्रेरणा दिली आहे.
“पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा
घार हिंडते आकाशी, झेप घाली पिल्लापाशी
माता गुंतली कामासी, चित्त तिचे पिल्लापाशी.. “
या संत जनाबाईंच्या ओव्यांची आज यानिमित्ताने आठवण होत आहे.”चिमणी उड, कावळा उड सारखे खेळ.. असोत, की , इथे इथे बस रे मोरा, बाळ देते चारा,
चारा खा पाणी पी.. भुर्र उडून जा, “
असे म्हणत बाळाला भरवणारी आई चे अंगाई गीत ऐकत आपण सर्व जण मोठे झालो.आपल्या आयुष्यातील अनेक टप्प्यावर जगताना पक्षांचे अस्तित्व अपरिहार्य होतेच.. शिवाय त्यांना आपण आपल्यासोबतचा एक भाग मानले आहे.
पक्षी हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी आपल्याला झोपेतून उठविणाऱ्या कोकीळपासून तर बुलबुल, सुभग, सूर्यपक्षी असे सारे पक्षी आपला संपूर्ण दिवस आनंददायी जावा ,यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नाद मधूर संगीताचे स्वर उमटवीत असतात.कीटकांचा फडशा पाडून मानवी आरोग्यास पोषक वातावरण निर्माण करणे व कृषी व्यवस्थेत शत्रूकिडींचा नाश करून मनुष्य प्रजातीस मुबलक अन्नधान्य पुरविण्याचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षी सांभाळीत असत. पण आज जागतिककरणाच्या काळात विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा -हास केला . झाडांची जंगले तोडून तेथे सिमेंटची जंगले उभी राहिली. झाडांच्या सोबत राहणारा पक्षी म्हणजे चिमणी, कावळा , कोकीळ, बुलबुल हे पक्षी नामशेष झाले . पुर्वी लहान असताना चिमण्यांच्या किलबिलाट आज ऐकू येत नाही. कावळा न आवडणारा पक्षी पण त्याची काव काव ही बंद झाली आहे.लाॅकडाऊन च्या काळात आमच्या गावात कोणी घराबाहेर पडत नाही. हातावर पोट असणा-या चालत्या बोलत्या माणसांचे मात्र हाल चालू आहे. अशी माहिती नागेश यांनी बातमी खासशी बोलताना दिली.पक्ष्यांच्या काळजी बद्दल ते म्हणाले, मी घरातील टाकाऊ प्लाॅस्टिकच्या बाटल्या कापून या पक्षांच्याकरीता पाणी साठवण्याचे भांडे बनवले आणि ते प्रत्येक झाडावर लावले आणि रोज सकाळी यात पाणी व धान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.