पिंपरी मनपातील भाजपच्या सत्तेला दोन वर्षे पूर्ण होत नाही तोच स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शितल शिंदे यांनी बंडखोरी करून आपला अर्ज सादर केल्याने शिस्तबद्ध भाजपला पिंपरीत आता तडे गेले आहेत.
विशेष म्हणजे मूळ भाजपचेच असलेल्या शिंदे यांच्याकडून ही कृती घडली आहे. पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या दोन आमदारांचे निर्माण झालेले नगरसेवकांचे गट, आमच्या भागातला स्थायी समिती अध्यक्ष पाहिजे यासाठी झालेले दबावाचे राजकारण, प्रचंड महत्वाकांक्षी असलेले सारेच सत्ताधारी, पाहता अवघ्या दोन वर्षातच पक्षाला दृष्ट लागेल व चिरे पडून बुरूज ढासळू लागेल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. आश्चर्य म्हणजे सर्वोच्च पद असलेल्या महापौरांनी चार दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन भोसरीला स्थायी समितीचे अध्यक्षपद पाहिजे म्हणून संतोष लोंढे यांचे नाव सूचवित दबावाचा केलेला प्रयत्न हा संस्कारी भाजपचा कळस म्हणावा लागेल.
शह-काटशह, खेळ्या, कुरघोड्या, चाली, धोबी पछाड हे राजकारणातले पेटंट शब्द विरोधी पक्षासाठी खिंडीत गाठण्यासाठी वापरायचे असतात मात्र आपल्याच पक्षामध्ये ते वापरले जात असल्याचे दूर्मिळ चित्र पिंपरी चिंचवड भाजपमध्ये गेल्या दोन वर्षापासून उमटू लागले आहेत.
गावखेड्यामध्ये आजही एकाच वस्तीमध्ये जशी खालची आळी आणि वरची आळी असे दोन गट निर्माण झालेले दिसतात, तसाच प्रकार आज शहरात निर्माण झालेला आहे. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. एकसंध शहर, नैसर्गिक प्रवाह, सलगता असलेले शहर नष्ट होऊन भोसरी यांचे आणि चिंचवड त्यांचे अशीच ओळख आता बनत चालली आहे. सत्तेच्या गडाला शेवटच्या दीड-दोन वर्षात चिरे पडतील अशी कायम राजकीय वर्तुळात चर्चा व्हायची; परंतु शहर भाजपची शकले २४ महिन्यातच उडल्याने. संस्कार रूजविणारा व घडविणारा हाच का भाजप ? असे म्हणण्याची वेळ मतदार राजावर आली आहे.
आपल्याच भूमिकेला दिला छेद…! सत्तेच्या पाच वर्षात भाजपचे व साथ देणारे अपक्ष अशा सर्व नगरसेवकांना स्थायी समितीच्या मांडवाखालून पार करायचे हा चांगला निर्णय घेण्यात आला होता. समान न्याय, समान संधी असे या निर्णयाबद्दल बोललेही जायचे. मात्र सत्तेच्या तिसऱ्याच वर्षी श्री. मडिगेरी यांना अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन भाजपने आपल्या भूमिकेला पहिला छेद दिला. शितल शिंदे यांना सदस्य करायचे व नंतर त्यांना उमेदवारी न दिल्यास ते बंडखोरी करणार हे नेतृत्वाने गृहीत धरलं असावं. त्याद्वारे निष्ठावंत व मूळ भाजपचेच पक्षशिस्त बिघडवतात हा अचूक संदेश जाण्याबरोबरच भविष्यात डोकेदुखी ठरणारे शिंदे आपल्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारत असतील तर उत्तमच…! म्हणजेच, ‘साप मरे लाठी न टुटे…!’