(विजय जगताप)
भारत स्वतंत्र झाल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठा पेनिसिलीन (ॲंटिबायोटिक्स) उत्पादन करणारा देशातील सरकारी मालकीचा पहिला कारखाना पिंपरीत उभारला गेला आणि या भूमीला ‘चार चाॅंद’ लागले.
आज १४ नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन…! पिंपरी चिंचवड या शहराच्या निर्मितीत, विकासात आणि वाढीमध्ये या कारखान्याचा सिंहाचा वाटा असला तरी या भागात हा कारखाना उभारण्याची मान्यता देण्याचे श्रेय अर्थातच पंडित नेहरूंना द्यावे लागेल हे इतिहासकालीन सत्य आहे.
महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे पेनिसिलीन या औषधाअभावी निधन झाल्यानंतर संपूर्ण देश हळहळला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झालेल्या नेहरूंनी देशाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत तातडीने सरकारी मालकीचा पेनिसिलीन कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला.
पुण्याचे खासदार काकासाहेब गाडगीळ हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात तेव्हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. पुणे शहराजवळ १५ किलोमीटर अंतरावर टिकली एवढ्या आकाराची छोटी-छोटी खेडेगावं असून मुंबईला जाताना ही गावे दिसतात व या गावांच्या आसपास हजारो एकर मोकळी जमीनच जमीन असल्याचे काकासाहेब गाडगीळ यांनी नेहरूंच्या लक्षात आणून दिसले. पुणे शहराला सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असल्याने पुणं शहर देशात सगळ्यांना माहित होतं..मग या पुण्याजवळील पिंपरी अशी सातबारावर नोंद असलेल्या महामार्गालगतची ११३ एकर जमीन सरकारने लागलीच ताब्यात घेतली. १९४८ साली बांधकाम सुरू होऊन हिंदुस्थान ॲंटिबायोटिक्स असे नामकरण करून ७ मार्च १९५२ ला प्रत्यक्ष उत्पादनाला येथे सुरूवातही झाली.
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व पंतप्रधान नेहरू यांनी एकत्र येथे येऊन कामाची, उत्पादनाची पाहणी देखील केली. पुणे आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांना दळणवळणासाठी हा परिसर योग्य असल्याचे कौतुकही नेहरूंनी याप्रसंगी केलं.आणि काही वर्षातच सापाने कात टाकावी तसा हा भाग प्रचंड वेगाने कारखानदारीसाठी योग्य ठिकाण म्हणून उद्योजकांनी हेरला. एचएच्या शेजारी व पुण्याजवळ असं म्हणत १३ डिसेंबर १९५२ रस्टन ग्रीव्हज या कंपनीने आकुर्डीच्या तोंडावर जागा घेतली, पाठोपाठ जमनालाल बजाज यांनी जागा घेतली,मग स्वीडिश कंपन्या ( सॅन्डविक, फोर्ब्ज मार्शल, अल्फा लावल,एसकेएफ) या कंपन्या आल्या.१९७० च्या दशकात टेल्को आली,पुढे यशवंतराव चव्हाण यांनी पिंपरी चिंचवडला एमआयडीसी आणली, अण्णासाहेब मगर यांनी चार गावे एकत्र करून नगरपालिका स्थापन केली आणि मग शहराने मागं वळून पाहिलंच नाही. इतकी भरभराट होऊ लागली व इतका पैसा नगरपालिकेला मिळू लागला की आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिले जाऊ लागले.
थोडक्यात या भूमीकडे पंडित नेहरूंचे सर्वात प्रथम लक्ष गेले, यशवंतराव चव्हाण यांनी ही भूमी नांगरली, अण्णासाहेब मगर यांनी या भूमीवर पाणी मारून वॄक्ष लागवड केली. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी विकास प्रकल्पांचा पाया रचला. पाठोपाठ शरद पवार, अजित पवार,ते अलिकडे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी या भूमीला आकार व दिशा दिली.