( विजय जगताप)
कालपर्यंत एक कुटुंब असलेल्या शिवसेनेमधील ५४ आमदारांपैकी जवळपास ४० आमदार आपल्या बाजूने वळवण्याची जी जादू एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन दिवसात घडवली आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात एकनाथ शिंदे हे नाव सोमवारच्या रात्रीपासून (२० जून)प्रचंड गाजत आहे.
एकनाथ शिंदे यांनी जो ऐतिहासिक करिश्मा घडवून आणला आहे, तो पाहता एकेकाळी शिवसेनेला नडणाऱ्या व बंडाळी करणाऱ्या छगन भुजबळ ,नारायण राणे यांनाही एका क्षणात त्यांनी राजकीय इतिहासात छोटं करून टाकलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वात असं काय दडलं आहे की, प्रसंगी ठाकरे घराण्यासाठी जीव द्यायची तयारी असलेले आमदार देखील आज एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपलं राजकीय आयुष्य पणाला लावायला तयार झालेत ? यासाठी सर्वप्रथम एकनाथ शिंदे ही व्यक्ती नेमकी समजून घेणं गरजेचे आहे.
ठाणे जिल्ह्यात आपल्या दहशतीने,दरा-याने एकेकाळी प्रचंड नाव गाजविलेल्या आनंद दिघे यांचे उजवे हात म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जात. लोकांचे प्रश्न, अडचणी, अगदी घरगुती समस्या आपल्या दरबारात आपल्या न्याय्य पद्धतीने सोडवण्याची आनंद दिघे यांची ‘ स्टाईल’ होती. भलेभले त्यांच्यासमोर चळाचळा कापायचे,साधा निरोप आला तरी चड्डीत मुतायचे आणि कोणालाही दिघेंनी फोन केला तर समोरच्याची बोबडी वळलीच समजा,असा हुकूमशाही अंमल आनंद दिघे यांचा होता. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आपल्या गुरुचे हे सगळे गुण साहाजिकच ठासून भरले गेले. नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केल्यानंतर २००४ ला पहिल्यांदा एकनाथ शिंदे आमदार बनले. पुढे २००९,२०१४ आणि २०१९ अशी सलग चौथी टर्म आमदार म्हणून ते निवडून आले. ठाणेकर जनतेचा ते जीव की प्राण बनले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री (सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपक्रम)झाले.फौजेत दाखल व्हावं तसं संपर्कात आलेला प्रत्येक तरूण एकनाथ शिंदे यांना आपल्या गळ्यातील ताईत मानत.
ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. नवी मुंबई महापालिका हा अपवाद वगळता ठाणे जिल्हा परिषद, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महापालिका,मीरा भाईंदर महानगरपालिका येथे सेनेची सत्ता असून एकनाथ शिंदे म्हणतील ती पूर्व दिशा तेथे चालते. साहजिकच त्यामुळे आलेले वलय, निर्माण झालेला दरारा व पैसे प्राप्तीचे शेकडो स्त्रोत एकनाथ शिंदेंकडे आपसूकच एकवटले गेले आहेत.
गेल्या पंचवीस वर्षापासून नाॅनस्टाॅप राज्यात सर्वात जास्त टोलेजंग इमारती उभ्या राहण्याचा ठाणे जिल्ह्यातील प्रवास अजूनही थांबलेला नाही. बिल्डरमंडळी म्हणजे, ‘जिकडं गुलाल तिकडं चांगभलं…अशा वळणाची असतात. म्हणूनच
शिवसेनेसारख्या पक्षाला निवडणूका असो, जाहीर सभा असो की नेते मंडळींचा दौरा असो आदी कामांसाठी आर्थिक रसद पुरवण्याची जबाबदारी शिंदे चुटकीसरशी आपल्या अंगावर घेऊन यशस्वीपणे पार पाडत. मंत्री होण्यापूर्वी देखील आणि मंत्री (२०१४) झाल्यानंतर देखील शिवसेनेसाठी ते जणू अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा होते. “हुकूम मेरे आका…” एवढंच शिंदे बोलत, आणि पक्षाचं कसलंही काम क्षणात होऊन जाई. शिवाजी पार्कची सभा असो की राज्यात कुठेही सभा घेण्याचं नियोजन असो निम्मं मैदान गर्दीने भरवायची जबाबदारी शिंदे एकट्याने उचलत तर ‘निम्मं मैदान महाराष्ट्रासाठी ठेवा’ असं ते आत्मविश्वासाने पक्ष प्रमुखांना सांगत.
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर पक्षनेतृत्वाविषयी (उद्धव ठाकरे ) आपल्या पक्षाच्या सहकारी आमदारांमध्ये नेमकी नाराजी काय आहे ? याची शिंदेंइतकी पारखी नजर कोणाची नव्हती. बाळासाहेब ठाकरे असो की उद्धव ठाकरे आणि आता अलीकडचे आदित्य ठाकरे असो यांच्याभोवतीचे कोंडाळे हे कायम जवळच्या नातेवाईकांनी व खास व्यक्तींनी भरलेले आजही पहायला मिळते. या कोंडाळयामध्ये मागच्या दाराने म्हणजेच विधानपरिषद व राज्यसभेतून आमदार-खासदार झालेल्यांची संख्या अधिक आहे. ठाकरे घराण्याचं असलेलं वलय, दरारा प्रचंड असल्याने साक्षात उद्धव ठाकरे यांची भेट मिळणं म्हणजे आमदारांसाठी अतिशय अवघड विषय…! त्यासाठी सुभाष देसाई, नार्वेकर, संजय राऊत ,अनिल देसाई, वरूण सरदेसाई यांची सरबराई करणं व हांजी-हांजी करणं आमदारांच्या व साक्षात मंत्र्यांच्या देखील जीवावर येई. मग आमदारांसाठी एकनाथ शिंदे हा इतका मजबूत पूल असे की या मंडळींना ठाकरे नाही भेटले तरी चालत असत त्यांची कामे होऊन जात.
आमदारांना आपल्या गाडीत बसविणं, मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निधी देणे, मंत्रालयातील खोळंबलेली कामे मार्गी लावणे, शाळा,काॅलेजांचे प्रवेश, नोकऱ्या ,बदल्या (आमदारांचे विशेष इंटरेस्ट असतात हे माहिती असून देखील) कुठलीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे ती कामे मार्गी लावत. आमदारांना पैशाची अडचण असेल तर ते बिनदिक्कतपणे आपली व्यथा शिंदे यांच्यापुढे मांडत. कशाला पाहिजे हे विचारण्याची भानगड शिंदेंकडे नसायची. फक्त ‘किती लाख पाहिजे…’ तेवढाच प्रश्न विचारला जाई. विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण आमदार तर यामुळे अक्षरशः उड्या मारत. हे पैसे उसने नसल्याने व फेडायचे बिलकुल टेन्शन नसायचं. महिन्या -पंधरा दिवसातून मुंबईला येणारे आमदार प्रसंगी तर फक्त एकनाथ शिंदे यांना बघायला, भेटायला येत. आलेल्या प्रत्येक आमदाराचा सन्मान राखत ॲंटीचेंबरमध्ये घेऊन जाणं, त्यामुळे तो हवेत जाणं, जेवण करायचं का विचारणं? मग आमदारांबरोबर असलेल्या डझनभर कार्यकर्त्यांची चमचमीत खाण्याची सोय करणं.. यामुळे आमदाराची छाती फुटेस्तोवर फुगून जाई. गावाला आल्यावर आमदारांचे हेच कार्यकर्ते मुंबईतील स्वागताचे कवित्व दोन दोन महिने सगळ्यांना सांगत सुटत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र आमदार व मुख्यमंत्र्यांमध्ये प्रचंड अंतर पडले. अशातच कोरोना आल्याने जवळपास एक दिड वर्ष कोणच कोणाला भेटत नसत.भर म्हणजे मध्यंतरी स्वतः ठाकरेच आजारी त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटणं हा प्रकारच थांबला होता. मग एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांची सारी कामे स्वतः हाती घेत. २०१४ पासून मंत्री असलेल्या शिंदे यांना आमदारांना जिंकणं इतकं सोपं झालं होतं की, पक्षप्रमुखांना भेटण्याची आमदारांची इच्छाच जवळ जवळ मेली होती. काळाची व आपल्या पक्ष प्रमुख नेतृत्वाची पावले अचूकपणे शिंदेंनी ओळखली होती. दुसरीकडे वाऱ्याची दिशा कशी आहे हे ओळखून फडणवीस यांच्या बरोबरील दोस्ताना त्यांनी म्हणूनच सुप्तपणे मजबूत करत जपला होता. आमदारांची काही केंद्र पातळीवरची असलेली कामे देखील “होऊन जाईल” एवढंच बोलून
ते सोडवत. म्हणूनच सेनेच्या आमदारांसाठी आई बापानंतर देव्हा-यात पुजावा असा देव बनले होते एकनाथ शिंदे….!
एकीकडे आपल्या पक्षाचे आमदार तर दुसरीकडे पक्ष नेतृत्व यांच्या हृदयात आपलं स्थान एवढं भरभक्कम व बळकट शिंदे यांनी केलं होतं की, त्यांना डावलणं म्हणूनच मातोश्रीच्या दृष्टीने अडचणीचे ठरलं होतं.
महाविकास आघाडी सरकार बनत असताना वास्तविक सुरूवातीला मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचंच नाव पहिल्या क्रमांकावर होतं. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंडळींनी ‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील’ अशी अट घातल्याने शिंदेंच नाव मागं गेलं. आजच्या घडीला १०-१२ आमदार सोडले तर सेनेचे सर्व आमदार शिंदे यांच्या बखोटीला आहेत. चाकरानं धन्यालाच आभाळ दाखवावं ..अशी गत आज झाली आहे. शिंदे व त्यांच्या साथीला असलेले आमदार अडीच वर्षानंतर पुन्हा सेनेत नसतील याची त्यांनाही कल्पना आहे. स्वतःच्या ताकतीवर पुन्हा आमदार होतील इतके त्यामधील अनेक जण मजबूत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही सगळी गॅंग भाजपमध्ये जाईल, हे त्रिवार सत्य आहे. पण पुढे काय होईल याची तमा न बाळगता ठाकरेंना खुलेआम नडलेले हे आमदार व एकनाथ शिंदे राजकीय इतिहासात मात्र नोंदले गेले आहेत हे मान्यच करावे लागेल.
ठाकरेंना स्वप्नात देखील चॅलेंज करण्याची हिंमत नसलेले आज, ‘आम्हीच खरे शिवसेनेचे, तुम्ही नाही’ अशी भाषा करीत आहे. एवढे धाडस व डेअरींग होणं यामागे मध्यंतरी भाजपने ठाकरेंच्या अंगावर सोडलेल्या राणा दांपत्य, किरीट सोमय्या,कंगणा राणावत यांचाही वाटा आहे. ठाकरेंना नडणं या मंडळींनी ‘कॅज्युअल’ करून दाखवलं,ठाकरे नावाचा दरारा व वचक इथूनच संपायला सुरूवात झाली.
शिंदे आमदारांना कसं जिंकतात,यांचं आणखी एक उदाहरण म्हणजे, प्रताप सरनाईक व जाधव ( मुंबई मनपा स्थायी समिती सभापती) यांच्या मागच्या ईडी व आयकर धाडीचा तपास अचानक कसा थांबला हे आठवलं तर एकनाथ शिंदेंनी यासाठी काय केलं असेल याचे चित्र डोळ्यासमोर येते. शिंदेंवर का नाही मग आमदार जीव ओवाळून टाकणार?
मावळ्यांना छत्रपतीच भेटत नसतील,दिसत नसतील तर मग राज्य जिंकायचं कसं? पण त्या मावळ्यांमध्ये ठाकरेंच्या अपरोक्ष हुरूप भरण्याचं काम एकनाथ शिंदेंनी गेल्या पाच दहा वर्षांत केलं, म्हणून तर आज राऊतांपासून ठाकरेंपर्यंत सारेच जण असहाय्य व अगतिक झाले आहेत.
छगन भुजबळ, नारायण राणे,राज ठाकरे यांनी जेव्हा सेना सोडली तेव्हा या सा-यांना फाट्यावर मारणारे सेना नेतृत्व आज मात्र शिंदे व टीमचे स्वागत करण्यासाठी आतूर आहेत, म्हणूनच बुद्धांनी म्हटलंय,कुठलीच गोष्ट कधीच कायम रहात नाही.