( विजय जगताप)
“पुण्याचं ख-या अर्थानं सोनं झालं”…अशा खास शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मावळते महापौर मुरलीधर मोहोळ यांचं काल तोंडभरून कौतुक केलं तर दुसरीकडे भाजपाचीच सत्ता होती तरी पिंपरी चिंचवडकरांच्या वाट्याला कौतुकाचा एक शब्दही आलेला नाही.
एकाचवेळी कार्यकाळ संपलेल्या पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजप ची एकहाती सत्ता आली.दोनही महापालिकेमध्ये आता प्रशासक नियुक्त होऊन कारभार सुरू झाला आहे.
परवा (१४ मार्च) रोजी चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विटरवरून मावळत्या महापौरांचे कौतुक केल्यानंतर त्यावर लाईक्सचा अक्षरशः वर्षांव पडला.काही पुणेकरांनी तर ‘मुरलीधर मोहोळ यांना खासदार केलं पाहिजे’ अशाही प्रतिक्रिया या ट्विटरवर दिल्या.
कोविड काळातील विशेष कामगिरी आणि पुणे मेट्रोच्या कामाला दिलेली गती या बाबींचाही विशेष उल्लेख चंद्रकांतदादांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.
त्याच्या बरोबर परस्पर उलटी परिस्थिती भाजपची सत्ता पिंपरी चिंचवड मध्ये असूनही शहरवासीयांना अनुभवयास मिळाली होती.शहरातील डाॅकटर मंडळींनींच कोरोना काळात रेमडिसीवहर इंजेक्शनचा केलेला काळाबाजार आणि स्पर्श हाॅस्पिटलचा उघडकीस आलेला बिल घोटाळा यामुळे शहराच्या इज्जतीचे वाभाडे निघाले. अजून भर म्हणजे भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षास लाच प्रकरणी येरवडा कारागृहात जाण्याची आलेली वेळ यामुळे शहराचं सोनं होण्याऐवजी कोळसा झाला. हे कमी पडतं की काय असं वाटत असतानाच भाजपच्या पाच नगरसेवकांनी राजीनामे देऊन पक्षाला दिलेला घरचा आहेर ,दोन कारभा-यां मध्ये नंतर नंतर न राहिलेला समन्वय यामुळे’ मास्तर नसलेली शाळा ‘असेच पिंपरी चिंचवडच्या बाबतीत म्हटलं गेलं.तुषार कामठे नामक नगरसेवकांनी,या शहराची वाट दोन कारभा-यांमुळे कशी लागली याचा लेखनप्रपंच करून देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्याने कंपाऊंड नसलेली शाळा इतपर्यंत त्यात भर पडली. दोन वर्षांपूर्वी माधुरी मिसाळ यांना येथे प्रभारी नेमूनही त्यांनी न दिलेलं लक्ष शाळेला आता छप्पर पण नाही हे दाखवून देणारं ठरलं.
कहर झाला तो म्हणजे पंतप्रधान मोदी ज्या दिवशी पुण्यात आले त्याच दिवशी दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरीतील विविध विकासकामांची उद्घाटने ठेवली गेली. लग्नातच घाईघाईने मुंज उरकण्याची ही कृती ना शो ठरला ना प्रसिद्धीचा स्टंट? उलट देवेंद्रजी यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीने घातलेला राडा व चप्पल भिरकाविणे सारखा झालेला प्रकार यामुळे ” पिंपरीत काही खरं नसतं”असा मेसेज भाजप नेत्यांमध्ये जास्त पसरला.