———
( विजय जगताप)
“अलिकडील पाच महिन्यांपूर्वी गजाननने आपली राजकीय वाट वेगळी निवडल्याने ४० वर्षानंतर प्रथमच आमचे बोलणे थांबले होते परंतू ते कायमचे थांबेल असे वाटले नव्हते” असे सांगताच खासदार आप्पा बारणे यांना हुंदका अनावर झाला.
‘बातमी खास’ शी ते बोलत होते. शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा उजवा हात, श्वास व आप्पांची सावली अशी ओळख असलेले गजानन चिंचवडे यांचे आज( शनिवारी)सकाळी निधन झाले.
सकाळी आपल्या कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे मार्गी लावत असतानाच गजानन चिंचवडे यांच्या मुलाचा फोन मला आला. तातडीने मी त्यांच्या घरी गेलो तेथून आम्ही सर्वांनी लोकमान्य हाॅस्पिटल गाठले.परंतू ईश्वरी इच्छेपुढे कोणाचेच काही चालले नाही.
एक नव्हे दोन नव्हे तर ४० वर्षे शाळेपासून सुरू झालेल्या मैत्रीतील एक धागा कायमचा निसटला. माझा सहकारी, जिवलग मित्र व पुढे माझ्या प्रत्येक राजकीय घटना घडामोडींचा साक्षीदार गजानन होता.कल्पक दृष्टी, उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट, निवडणूक व्यवस्थापन व समाजातील सर्व स्तरातील मंडळींशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा त्याचा स्वभाव होता.
अलिकडे या कुटूंबाने वेगळी राजकीय वाट निवडली असली तरी सेनेवर वा वैयक्तिक माझ्यावर त्याने कधीच टिका टिप्पणी केली नाही.गेली २१ वर्षे माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्याचा पायंडा व प्रघात त्याने पाडला होता. मागील वर्षी १६ फेब्रुवारी या माझ्या वाढदिवशी कोरोना काळात सेवा केलेल्यांचा गौरव करण्याची संकल्पना त्याचीच होती. दु:ख या गोष्टीचे वाटते की पुढील आठवडयातच माझा वाढदिवस आहे. जर तो भाजपात गेलेला नसता तर आतापर्यंत गजाननने माझ्या वाढदिवसाची सर्व तयारी केली असती “असे म्हणत आप्पा भावुक झाले.
दरम्यान, २००९ पासून गजानन चिंचवडे यांचे खास मित्र असलेले बांधकाम व्यावसायीक रविंद्र नामदे यांनीही ‘असा मित्र होणे नाही ‘अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात केलेले गजानन चिंचवडे हे पीसीएमटी सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनातील पदावर सर्वप्रथम आले. पुढे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य, शिवसेनेचे शहर प्रमुख , जिल्हा प्रमुख अशी पदांची चढती कमान त्यांनी आपल्या कौशल्यावर व आप्पा बारणे यांच्या सहकार्याने प्राप्त केली.समाजकारण करताना आपल्या पत्नीला त्यांनी दोन वेळा महापालिकेत निवडून आणले.१३ जून २०१८ ला ते सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख झाले.त्यांच्या कार्याची व गुणवत्तेची दखल घेऊन मागील वर्षी ३ एप्रिलला शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून परत त्यांची फेरनिवड झाली.
मात्र सेनेत पुढे त्यांचे मन न रमल्याने २२ सप्टेंबर २०२१ ला भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. भाजपला त्यांच्या रूपाने चिंचवडगावात मोठी ताकद मिळाली.नुकतेच तीन महिन्यांपूर्वी ( ४ नोव्हेंबर २०२१) त्यांच्या आई पार्वतीबाई यांचे निधन झाले होते.चिंचवडे नगर येथे युनिक व्हिजन स्कुल या नावाची शाळा मागील एक दशकापासून ते चालवित होते.