(विजय जगताप)
पिंपरी महापालिका स्थायी समितीमधील त्या सोळा सदस्यांची चौकशी बाकी असल्याचे लाचलुचपत खात्याच्या वतीने काल गुरूवारी( ता.२६)न्यायालयात सांगण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय त्या १६ नगरसेवकांची ‘पुंगी टाईट’झाली आहे.
भीक नको पण कुत्रं आवर.. या म्हणी प्रमाणे ‘दर आठवडयाला मिळणारे पैशांचे पाकीट पण आता नको मात्र बदनामीपासून वाचलं पाहिजं’अशा मनस्थितीत हे सारेजण आल्याची चर्चा आहे.पालिकेचे स्थायी समितीत कार्यालयात काम करणारे चार कर्मचारी व खुद्द स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे या धाडीत अडकल्याने गेल्या आठ दिवसांपासून आनंदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये आजच्या एसीबीच्या स्पष्टीकरणामुळे मात्र सन्नाटा पसरला.
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार , शिवसेनेचा एक,अपक्ष एक आणि भाजपचे दहा असे संख्याबळ आहे.
एसीबीच्या धाडीत स्थायी अध्यक्षांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या रकमेचे स्पष्टीकरण देताना पिंगळे यांनी,’ही रक्कम सोळा सदस्यांना वाटावी लागते’ असे सांगितले होते. तोच धागा आज न्यायालयात एसीबीच्या वतीने मांडण्यात आला.
पाच वर्षे कायम फाटकी झोळीच राहिलेले एक दोन नगरसेवक सोडले तर बाकी सारे स्थायीत असलेले सदस्य मुळातच खिशाने ‘गब्बर’असलेले आहेत.
तोंडावर आलेल्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच हे प्रकरण घडल्याने आणि आता समजा भाजपसह ,राष्ट्रवादी व शिवसेनेच्या समिती सदस्यांनाही जर अटक झालीच तर भाजपच्या नावाने कालपर्यंत शिमगा घालणा-यांना ‘एसीबीकडूनच थेट ‘ करारा जवाब’ मिळणार आहे.
विशेष म्हणजे ‘या धाडीत जर आमचे नगरसेवक दोषी आढळले तर त्यांच्यावरही बिनधास्त कारवाई करावी ‘अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरे पाटील यांनी अगोदरच दिलेली आहे.