( विजय जगताप)
सत्तेचे पारडे अचानक फिरले अन् हमखास मंत्री होण्याची शक्यता असलेले लक्ष्मणभाऊ व महेशदादा यांच्या पदरी अपेक्षाभंगाचे ओझे आले तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने पिंपरीचे अण्णा व मावळचे अण्णा यांच्या कळया खुलल्या.
काल(२४ आॅक्टोबर)बरोबर एक वर्षांपूर्वी विधानसभेचा निकाल लागला आणि राज्यातील जनतेने भाजप -सेना युतीला सत्ता स्थापन करण्याचा स्पष्ट कौल दिला. परंतू सत्तेत निम्मा वाटा व मुख्यमंत्रीपदाचेही वाटप करण्याच्या मुद्दयावर सेनेने भाजपशी पंगा घेतला आणि अखेर अहंकाराच्या दर्पात सर्वाधिक जागा मिळविलेल्या भाजपला सत्तेच्या बाहेर थांबावे लागले परिणामी सेना, राष्ट्रवादी, व काँग्रेसचे संयुक्त महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले.
पिंपरी चिंचवडमध्ये आमदारकीच्या असलेल्या तीन जागांवर दोन भाजपचे ( महेश लांडगे व लक्ष्मण जगताप) तर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या तिस-या जागेवर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे निवडून आले. शेजारच्या मावळ मतदारसंघामधून भाजपचे विद्यमान राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे सुनिल अण्णा शेळके निवडून आले.
चारही आमदारांच्या वर्षभरातील मतदारसंघातील व विधानसभेतील कामाच्या प्रगतीपुस्तकावर कोरोनाच्या संकटाने वरवंटा फिरविला असला तरी सत्तेची ऊब मिळाल्याने दोन्ही अण्णांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आढळून येत असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. २९ नोव्हेंबर २०१९ पासून वास्तविक सरकारच्या कामकाजाला सुरूवात झाली परंतू तीन महिने होत नाही तोच १२ मार्चपासून कोरोनाचे संकट व लाॅकडाऊन सुरू झाल्याने विकासकामे असतील किंवा मतदारांची कामे या सा-या कामकाज प्रक्रियेला खिळ बसली.
१) चिंचवडमधून अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांनी दणदणीत मते घेतल्याने चौथ्यांदा आमदार झालेल्या लक्ष्मणभाऊंना सुरूवातीचे दोन महिने अस्वस्थ करून गेले परंतू नंतर कोरोना संकटकाळात नागरिकांना मदत करणे( निवारा, भोजन व अन्नधान्याची सोय) यात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रव्यवहार करून त्यांनी नागरिकांच्या कोरोना काळातील अडचणींचे निवारण करण्यास सुरूवात केली विशेष म्हणजे त्यांच्या सुचनांची दखल घेण्यात आली.
२) दुस-यांदा आमदार झालेल्या महेशदादांना आपल्या पक्षाची सत्ता आलेली नसली तरी भोसरीतील प्रश्नांविषयी ( सफारी पार्क, भामा आसखेड पाणी योजना ) हिरवा कंदील मिळाला.भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड होणे, कोरोना काळात लोकांची सेवा करता करता स्वत: पाॅझिटिव्ह होणे यासारख्या आनंद व चिंतेतून या वर्षभरात जावे लागले.
३) पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर दुस-यांदा आमदार झाल्याने व पक्षाची सत्ताही आल्याने त्यांना डबल जॅकपाॅट लागला.मतदारसंघातील झोपडपट्यांचे पूनर्वसन,बेकायदेशीर धंदे( मटका-जुगार )बंद करणे, कोविड काळात अंगणवाडी कर्मचारी , रिक्षावाले यांना मदत करणे आदी कामात त्यांना यश आले.
४) मावळचे आमदार झालेले सुनिल अण्णा शेळके हे देशातील कुठल्याही पक्षाकडून लढले असते तरी त्यांना आमदार करायचेच हा मावळच्या जनतेनेच हाती घेतलेला निर्णय होता. आमदार झाल्यानंतर त्यांच्यात आलेला प्रचंड आत्मविश्वास, मावळच्या जनतेचे प्रेम व सेलिब्रिटी आमदार असल्याचा त्यांना व मावळच्या जनतेला आलेला फिल वर्ष झालं तरी कमी व्हायचं अजून लक्षण नाही. वर्षभरात त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा आकडा अंदाजे दोन लाखाच्या पुढे गेलाय…कोरोना काळात जनतेला अन्नधान्य किट वाटणे , शेवटच्या टप्प्यात का होईना मावळला पर्यटनबंदीतून बाहेर काढणे, पवना बंदिस्त जलवाहिनीला हिरवा कंदील मिळणेसाठी नागरिकांच्या हिताचा तोडगा काढण्यात ते यशस्वी प्रयत्न करीत आहेत.