( विजय जगताप)
एरव्ही आपल्या पक्षावर व नेत्यांवर कडेकडेने गुरगुरणा-या एकनाथ खडसेंनी आता थेट देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊनच आरोप सुरू केल्याने राज्यात लवकरच मोठया घडामोडी घडणार असल्याचे स्पष्ट संकेत याद्वारे दिसून येत आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी केलेला अडथळा,मग कोरोना,पुढे सक्तीची पदवी परिक्षा,सुशांत, कंगना, मराठा आरक्षण असे जोरदार सापळे भाजपने रचले.शांत परंतू सावध असलेल्या महाविकास आघाडीने आता मुॅंहतोड जवाब देण्यासाठी मास्टरस्ट्रोकची तयारी केली असून गेले आठ महिने गुरगुरणे थांबविलेल्या खडसेंनी अचानक मागील तीन दिवसांपासून थेट फडणवीसांवर हल्ला सुरू केल्याने त्यास पुष्टी मिळत आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कैचीत पकडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे.माजी नौदल अधिकारी शर्मा यांना परवा शिवसैनिकांनी केलेली मारहाण पाहता या नव्या मुद्दयाची आता त्यात भर पडली आहे.
गेल्या चार वर्षापासून भाजप नेते एकनाथ खडसे यांचे आपल्याच पक्षाला झोडपण्याचे काम सुरू आहे.खडसेंच्या आरोपांना उत्तर न देता दुर्लक्ष करण्याचे काम राज्यातील भाजपची नेतेमंडळी करत आहेत.तर खडसे हे कधी एकदा पक्ष आपल्यावर कारवाई करतोय याच्या प्रतिक्षेत आहे परंतू खुलेआम पक्षाचा बाजार मांडूनही त्यांच्या टिकेला कोण उत्तर देत नाही व पक्षशिस्तीच्या भंगाची नोटीसही त्यांच्यावर बजावली जात नाही.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर व लगेचच कोरोना सुरू झाल्यानंतर मधले आठ महिने शांत असलेले खडसे पुन्हा आक्रमक झाले आहेत.त्यांची आक्रमकता एवढी वाढली आहे की ते पेशव्यांच्या काळातील नानासाहेब फडणवीसांचे कारस्थान व आताच्या देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर झालेल्या कारस्थांनाची उदाहरणे देत येत्या सहा महिन्यात पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. या सा-या घटना घडामोडी पाहता आता खडसेंना मानणारे काही भाजपचे आमदार तसेच पूर्वाश्रमीचे सेना, काॅग्रेस व राष्ट्रवादीचे असलेले काठावरील आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.