(विजय जगताप)
प्रेम प्रकरणातून मुलीच्या कुटूंबियांनी अमानुषपणे मागासवर्गीय तरूणाच्या केलेल्या हत्येचे पडसाद आता राज्यभर तीव्रपणे उमटत असून सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहे.आज राज्यातील विविध पक्षाच्या मान्यवरांनी सांत्वनासाठी येथे रिघ लावली.
कोरोनामुळे असलेला लाॅकडाऊन व मागील तीन महिन्यांपासून जमावबंदी आदेश लागू असल्याने आंदोलन, निषेध सभा, मोर्चा आदी मार्ग कोणाला अवलंबता येत नसले तरी या खूनप्रकरणी लोकभावना मात्र पेटून उठल्या आहेत. परिणामी त्याचे प्रतिबिंब सोशल मिडियात जोरदारपणे उमटत आहे.
विराज जगताप ( वय-२०,रा.पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड)असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.त्याचे याच गावातील काटे कुटूंबातील एका मुलीबरोबर प्रेम असल्याने संतापून मुलीच्या कुटूंबातील हेमंत काटे, सागर काटे,जगदीश काटे, रोहित काटे, कैलास काटे आणि हर्षद काटे यांनी मिळून रविवारी ( ता ७ जून) निघृणपणे लोखंडी राॅडने मारहाण करून त्याचा खून केला.सांगवी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रासिटी कायदयासह आरोपींवर खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य व त्यास असलेली जातीयवादाची किनार यामुळे राज्यभरातून निषेधाचा सूर उमटणे गेले चार दिवसांपासून सुरू आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर, त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर, माजी खासदार अमर साबळे, राष्ट्रवादी काॅगरेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष व माजी आमदार जयदेव गायकवाड, अशोक सर्वांगीण सोसायटीचे अध्यक्ष अशोक शिलवंत यांनी विराजच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आज मुंबईत या खूनातील आरोपींना कठोर शिक्षा होईल असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील संभाजी बिरगेड, मराठा सेवा संघ यांच्यासह नागरी हक्क समितीचे मानव कांबळे,रिपब्लिकन पक्ष ( आठवले) अध्यक्ष सुरेश निकाळजे , वंचितचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनीही पोलीस यंत्रणेला पत्र देऊन तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनाही निवेदन दिले आहे.
माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, ख्यातनाम पत्रकार संजय आवटे,निखिल वागळे यांनी सोशल मिडियात या घटनेविषयी संताप व्यक्त केल्यानंतर त्यास राज्यभरातून हजारोंचे समर्थन मिळत आहे.