( विजय जगताप)
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आमदार न करण्यावरून राज्यातील जनतेच्या रडारवर आलेल्या राज्यपालांनी आज अखेर विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांच्या निवडणूका घोषित कराव्यात, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली.
सरकार अस्थिर होण्याचा धोका टाळून एकप्रकारे राज्यपालांनी
घास सरळ तोंडात न भरवता डोक्यावरून फिरवल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने दोन वेळा करूनही राज्यपालांनी या प्रस्तावावर २० दिवस झाले तरी निर्णय घेतला नव्हता.यामुळे राज्यपाल व एकूणच भाजपचे यामागे कटकारस्थान असल्याची भावना राज्यातील जनतेत पसरली होती.
कोरोना संकटात जर सरकार अस्थिर झाले तर त्याचे खापर भाजपवर फुटणे स्वाभाविक होते.कारण हो किंवा नाही असा काहीच निर्णय राज्यपाल घेत नव्हते.तसेच भाजपने आपल्या एका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शिफारस चूकीचे म्हणत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतू तेथेही भाजपचा मुखभंग झाल्याने भाजपच्या काडया लोकांच्या लक्षात आल्या होत्या.आता जर मिडिया , जनता, कायदेतज्ञ यांच्या दबावातून उध्दव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्याचा निर्णय घेतला असता तर भाजप जाणिवपूर्वक हा प्रस्ताव लांबवत होता हे सिध्द झाले असते.
म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारकीचा नाद सोडून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणूका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी करत राज्यपालांनी ठाकरे यांचा मार्ग सुकर तर केलाच शिवाय आपल्या नावावर पावती फाडली जाऊ नये म्हणून आपल्यावरचे बांलटही टाळले.
कोरोना संकटामुळे या जागांच्या निवडणूका आयोगाने पुढे ढकलल्या होत्या.ठाकरे यांना तर २८ मे पर्यंत कुठल्याही स्थितीत आमदार बनणे आवश्यक होते.या पार्श्व भूमीवर सरकार अस्थिर होते की काय? अशी चिन्हे असताना भाजपने ‘पट भी मेरी और जीत भी मेरी’अशी खेळी करून महाविकास आघाडीला सुखद धक्का दिला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत “ अकारण टिका करून फायदा होत नसतो” असा टोमणा हाणत स्वत:ची मान सोडवून घेतली आहे.