( विजय जगताप)
सेलिब्रिटींनी नेहमी सावध बोलावं,जपून बोलावं..या संकेतांना फाटयावर मारत कोणाला काय वाटेल याची भीडभाड न ठेवता जगणारा होता ऋषी कपूर..!
अमूक एक गोष्ट बोलावी का ? समोरच्याला काय वाटेल? माझ्याविषयी लोकांचं काय काय मत बनेल? याची फिकीर त्याने कधी बाळगली नाही. सोशल मिडियात सदैव ॲक्टीव्ह राहणे यास त्याचे प्राधान्य असे.मग तो सण असो उत्सव असो , वाढदिवस असो की समाजात घडणा-या प्रत्येक ब-या वाईट गोष्टी असो, ऋषी कपूरचा तोंडपट्टा ट्विटरवर कायम धुमाकूळ घालत असे.
बातमी खासने त्याच्या या अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण वागण्याचा धांडोळा शोधला असता सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मचा वापर करण्यात तो फिल्म इंडस्टरीत सबसे तेज होता असे आढळले.तो २ एप्रिल पर्यंत ट्विटरवर पोस्ट टाकण्यात सक्रीय असल्याचीही नोंद सापडते. कोरोनाच्या संकटकाळात डाॅक्टर , नर्स , मिडिया , पोलिस यांना प्रौत्साहन देण्यात तो आघाडीवर होता.घरात बसून बसून लोकं कंटाळलीत त्यामुळे दारूची दुकाने सरकारने उघडावीत , सरकारला महसूलही मिळेल आणि लोकं रिलॅक्सही होतील अशी भारतातली पहिली पोस्ट त्याने २८ मार्चला ट्विटवर सोडली होती.
खाओ-पिओ, ऐश करो अशा मनोवृत्तीचा असलेला ऋषी कपूर स्वच्छंदी आयुष्य जगला.आपला मुलगा रणबीर कपूर याच्या मोजताना दम लागेल इतक्या झालेल्या गर्लफ्रेंड व आता अलिशा भट्टच्या प्रेमा पर्यंतच्या प्रवासाबाबत तो एकदा म्हणाला होता की, “त्याने त्याचे आयुष्य जगावं, दमला की तो थांबेल आपोआप..”
२०१७ ला ऋषीने ‘ खुल्लमखुल्ला ‘ या नावाचे आत्मचरित्र स्वत:च्या जीवनावरचे प्रकाशित केले.त्यात त्याने बेधडकपणे आपल्या वडिलांच्या ( राज कपूर) आयुष्यापासून स्वत:च्या आयुष्याचा खुल्लमखुल्ला पट त्याने बेधडकपणे मांडून आपण रोखठोक असल्याचे जगाला दाखवून दिले होते.