कमालीची जागरूकता दाखविण्याच्या नादात आपण नाहक लोकांची गैरसोय व मुस्कटदाबी करतोय, याचे भान पालिका व पोलीस प्रशासनाला नसल्याचा प्रत्यय तळेगाव दाभाडेमध्ये दिसू लागला आहे.
एखाद्या अंमलबजावणीच्या अतिरेकपणाचा कळस म्हणजे तळेगाव मध्ये प्रवेश करण्याचे मुख्य प्रवेशद्वार ( लिंब फाट्याजवळील) सील करण्याचा निर्णय तळेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड व तसेच पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेऊन टाकला. याचा परिणाम म्हणजे जीवनावश्यक किराणा व तत्सम वस्तूंची मालवाहतूकही बंद झाली.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यापारी, छोटे दुकानदार , व्यावसायिक यांची पळता भुई थोडी होत आहे . दुकाने उघडण्याच्या वेळा , त्यासाठी नागरिकांची होणारी तूफान गर्दी, एक वस्तू आहे तर दुसरी नाही अशी स्थिती निर्माण झाली.आणि वाहतूकीचा मुख्य रस्ता बंद असल्याने होणारी परवड पाहता धोकादायक स्थितीत नसलेले तळेगाव जाणिवपूर्वक पराकोटीच्या काळजीने प्रशासनाने लपेटून घेतल्यासारखे करून सगळयांचीच अडचण करून टाकली आहे.
बातमी खासच्या प्रतिनिधीने श्री झिंजाड यांच्याशी संपर्क साधला असता , जीवनावश्यक गाडया व वाहतूक वडगाव मार्गे चालू आहेतच की असे उत्तर दिले . परंतू हा मार्ग म्हणजे पाच किलोकिलोमीटरचा द्रविडी प्राणायम होत नाही का? या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, ‘नाही तरी विनाकारण लोकं फिरतच असतात की, थोडं लांबचा वळसा पडला तर काय हरकत आहे? ‘असा त्यांनीच प्रतिप्रश्न केला.त्यावर आमच्या प्रतिनिधीने , हा रस्ता सील करून व बाकीचे रस्ते ( वडगावहून येणारे) उघडे ठेवल्याने तांत्रिक आणि व्यावहारिक पातळीवर कोणाला कसल्या प्रकारचे समाधान लाभणार व मुख्य रस्ता सील केल्याने कोरोना येऊच शकत नाही यास वैदयकीय आधार काय? असा सवाल केला. त्यावर झिंजाड यांनी, ‘आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊन लोकांच्या मागणीवर विचार करू’असे उत्तर दिले.