(विजय जगताप)
राजकीय मंडळींची बोलताना जीभ घसरणे ही काही नवी बाब नाही परंतू जबाबदार पत्रकाराचीच जर हाडासहित जीभ घसरली तर दोष कुणाला द्यायचा ?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अर्नब गोस्वामी या टिव्ही अॅकरने नुकतीच केलेली असभ्य शेरेबाजी यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली . इतिहासात डोकावले तर गांधी घराणे विशेषत: सोनिया गांधी यांच्या वंशावरून जेवढी निर्भत्सना , हेटाळणी आतापर्यंत झाली तेवढी कोणत्याच सर्वोच्च राजकीय नेत्याच्या वाटयाला आलेली नाही .इंदिरा गांधी यांच्या नाकावरून तर बाळासाहेब ठाकरे यांनी ८० च्या दशकात काढलेले व्यंगचित्र फारच गाजले होते.
तर १९९९ ला जर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करणार( टक्कल)अशी जहाल घोषणा सुषमा स्वराज यांनी केली होती.शिव्या शाप व वाट्टेल तसे बोलण्यामध्ये उमा भारती देखील मागे नव्हत्या, प्रियांका व राहुल यांची तुलना थेट पाकिस्तानच्या जिन्नाशी करत व सोनियाचे वडील इटलीत मुसोलिनीच्या सैन्यात होते असा शोध त्यांनी लावला होता. भाजपच्या राज्य व जिल्हास्तरावरील नेत्यांनी देखील या कुटुंबाला हायब्रिड म्हणण्यापर्यंत आपला अभ्यास दाखवून दिला होता. या टिकेतून भाजपवाल्यांनी गांधी घराण्याच्या जावयाला देखील सोडले नव्हते.राहुल यांना “ पप्पू” असे म्हणत हेटाळणी करण्यात मोदीही अलिकडच्या काही वर्षापर्यंत मागे नव्हते.
पलटवार म्हणून सोनिया यांनीही मोदी यांना ‘ मौत का सौदागर’ असे म्हणत जहाल भाषा वापरली होती.तर काॅग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर ‘नीच, गंदी नाली का..’अशा शब्दात टिका केली होती . त्याचा परिणाम म्हणजे राहुल यांनी त्यांना पंतप्रधान मोदी यांची माफी मागायला लावत अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात केली होती.तर मोदींविषयी ‘चौकीदार चोर है’असे सातत्याने म्हटल्याने राहुल यांना सुप्रीम कोर्टात माफीही मागावी लागली होती.मात्र इतिहासात गांधी घराण्यावर टिका करणा-यांचाच उच्चांक आहे.
मात्र जेवढी टिका व हेटाळणी गांधी घराण्याची होते तेवढी त्यांची लोकप्रियता वाढते असेच आजपर्यंत सिध्दही होत आले आहे.