( विजय जगताप)
नेतृत्व कुशल व अनुभवी असले की काळाची पाऊले,संकटे व धोका त्वरीत ओळखता येत असतो.
राज्यातील सत्तेची सारी सुत्रे व रिमोट कंट्रोल आजमितीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असल्याचे जगजाहीर आहे.अल्पसंख्यांक तसेच मुस्लिमांना सातत्याने पंखाखाली घेणे व एकूणच धर्मनिरपेक्षतेने राज्यकारभार हाकण्याचे काम काॅगरेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष गेली कित्येक वर्ष करीत आहेत.यावेळेस जरी शिवसेना बरोबरीला असली तरी दोन काँग्रेसने आखलेले धोरण हा पक्ष देखील मान्य करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मार्चच्या पहिल्या आठवडयात( ९ तारीख) राज्यात सर्वप्रथम पुण्यात कोरोना रूग्ण आढळून आला.लगेचच खबरदारी घेत व धोक्याची घंटा ओळखून राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या.तेव्हा कोरोनाचे संकट फारसे गंभीर पातळीवर पोहोचले नसतानाही १५ व १६ मार्च असे दोन दिवस वसई येथे तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमास परवानगी मागणारा अर्ज १० मार्चला गृहविभागाकडे मान्यतेसाठी आला.नेमका तोच काळ कोरोनाने जगात हाहाःकार माजविणारा ठरला होता.भारतामध्ये मात्र फारसे भितीदायक वातावरण नव्हते.मुस्लिम समाजाच्या या कार्यक्रमास धर्मनिरपेक्ष बैठक असलेले राष्ट्रवादीचे गृहखाते नकार देणार नाही असा समज असतानाही गृहखात्याने कडक शब्दात या कार्यक्रमास परवानगी नाकारली.मग पुढे दिल्लीत हा कार्यक्रम निश्चित झाला. जगभरातील मौलवीने तसेच देशाच्या विविध भागातून मुस्लिम मंडळी या कार्यक्रमास दिल्लीत उपस्थित राहिली.दिल्लीत सरकार जरी केजरीवालांच्या आप चे असले तरी पोलीस यंत्रणा मात्र केंद्र सरकार चालविते. या कार्यक्रमास परवानगी नाकारणे सहज शक्य असतानाही दिल्ली पोलिसांनी ती दिली.
एव्हाना दिल्लीत असा कार्यक्रम झाला ?देशभरातून तेथे मुस्लिम बांधव आले होते? हे तोपर्यंत देशात कोणालाही ठाऊक नव्हते. २४ मार्चला अहमदनगरच्या मुकूंदनगर येथील मशिदीमध्ये नगर पोलिसांना संशयास्पद हालचाल होत असल्याचे जाणवले.त्यांनी पाहणी केली असता तेथे कोरोनाबाधित १० ते १२ तबलिगी लाॅकडाऊनमुळे अडकून पडल्याचे स्पष्ट झाले.चौकशी करता ते दिल्लीतील मरकज हून येथे आल्याचे स्पष्ट झाले. क्षणार्धात संशयाची सुरी फिरली. जर इथे असे तर दिल्लीत मरकज मध्ये कोरोनाबाधित असणारच? महाराष्ट्र पोलिसांनी ताबडतोब दिल्लीला जागे केले.पुढे दिल्ली पोलिसांनी आख्खी मरकज रिकामी केली.सगळयांना क्वारंटाईन केले.मात्र तोपर्यंत काहीजण पांगले होते.