विजय जगताप –
पाच वर्षांपूर्वी ‘कुठे ठेऊ अन् कुठे नको’ असा बडेजाव असलेल्या महायुतीतील चार पक्षांची आजची अवस्था ‘नको ती ब्याद’ ठरल्याने हात चोळण्याशिवाय व त्रागा करण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर २०१३ मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने सर्वप्रथम रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष व त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष (महादेव जानकर), शिवसंग्राम (विनायक मेटे) व स्वाभिमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी, सदाभाऊ खोत) यांची मोट बांधण्यात आली. महायुती असे त्याचे नामकरणही झाले. मोदी लाटेचा अंदाज येण्यापूर्वीच गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रापुरती निर्माण केलेली ही महायुती काँग्रेस राष्ट्रवादीला पर्याय ठरणार असल्याचे मोठ-मोठ्या सभांद्वारे सिद्धही झाले. लोकसभा निवडणुकीपर्यंत सेना-भाजपच्या जोडीला हे चार पक्ष एकत्र होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर या चारही पक्षांनी भाजपच्या पंखाखाली जाणे पसंद केले. त्याचे फळ म्हणजे विनायक मेटे यांच्याकडे शिवस्मारकाची जबाबदारी सोपवून राज्यमंत्री दर्जा व विधानपरिषद, जानकरांना कॅबिनेट मंत्रीपद, आठवलेंना केंद्रात राज्यमंत्रीपद, तर स्वाभिमानीच्या खोत यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले.
मात्र मागील पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजू शेट्टी व खोत यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन शेट्टी यांनी वेगळा रस्ता धरला. तर धनगर आरक्षण न झाल्याने व राष्ट्रीय समाज पक्षानेही बाळसे न धरल्याने महादेव जानकर हे फक्त पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ एवढ्याच पुरते सीमित झाले. मराठा आरक्षण व बीडमध्ये मनासारखी स्पेस न मिळू शकल्याने प्रारंभीचे साडेतीन वर्षे मेटेदेखील सरकारवर नाराज होते. नंतर मराठा आरक्षण झाले पण बीड व मराठवाड्यात भाजपने अन्य तगड्या मराठा मंडळींशी ‘दोस्ताना’ वाढविल्याने मेटेची अवस्था जैसे थे राहिली. तीच गत रामदास आठवलेंची झाली. आपल्या कविता व विधाने यामुळेच चर्चेत राहिलेल्या आरपीआयचा ना विस्तार होऊ शकला ना त्यांनी क्षितिज व्यापले.
या सर्व सहकारी मित्र पक्षांच्या हालचालींवर व प्रगतीवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या ऐन मोक्याच्या संधीच्या काळात ‘तुम्ही आता बोन्साय ठरला’ असल्याचा सर्व्हेचा रिपोर्टच ८ मार्चला त्यांच्यासमोर फडकावून या सर्वांची बोलती बंद केली. समतुल्य व समान बळ असलेल्या शिवसेनेला ‘पटक देंगे’ म्हणण्याइतपर्यंत मजल गेलेला भाजप जर असा वागू शकतो तर आपल्याला दिलेला मान मिळालेली संधी व सहभाग फारच ‘बहारदार’ काळ होता असे म्हणण्याची पाळी या चार पक्षांवर आली आहे.