परम पूज्य स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आळंदी येथे सुरू असलेल्या गीता भक्ती महोत्सवामध्ये होणाऱ्या रामायण महानाट्याची रसिकांना उत्सुकता असल्याचे चित्र आहे.
येत्या १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ४५० कलाकारांचा संच असलेल्या या महानाट्याचा प्रयोग होणार आहे. या संदर्भात या महोत्सव समितीचे कार्यवाह डॉ. संजय मालपाणी यांनी ‘बातमी खास’ शी बोलताना या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या साडेचारशे विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या महानाट्यामध्ये संपूर्ण रामायण नृत्य-अभिनय- संगीत व वेशभूषेसह सादर केले जाणार आहे. ९० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य व्यासपीठावर हा प्रयोग पाहण्यासाठी विक्रमी गर्दी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. गिरीश डागा यांनी लेखन केलेल्या या महानाट्यामध्ये शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग भव्य रंगमंचावर साक्षात सर्वांना पाहता येणार आहे. या महानाट्याचे ध्वनीमुद्रण व संगीत हे सर्व मुलांनीच तयार केले आहे. महोत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, देशभरातून आलेल्या ४ हजार महाराजांची व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवास व्यवस्था आळंदी परिसरात करण्यात आली असून गीता परिवारातील देश विदेशातील पाचशे कार्यकर्ते येथे आले आहेत. साक्षात माऊलींच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात कालच्या पहिल्या दिवशी कीर्तन ऐकण्यासाठी अनपेक्षित गर्दी लोटली होती पुढील सर्व दिवस अशीच गर्दी राहील असे चित्र असल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.