(विजय जगताप )
राजकारणात नेहमी बुद्धिबळाच्या चालींप्रमाणे चाली करत पुढे जावे लागते असे म्हटले जाते, काल (सोमवारी) मावळ लोकसभा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार संजोग वाघेरे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून एक प्रकारे आपल्या विरोधी उमेदवाराला न सांगता ‘चेक’ दिला असल्याची शहरात चर्चा आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे राजकीय विरोधक राहिलेले स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाला संजोग वाघेरे यांनी अभिवादन करायला जाणे ही वरकरणी साधी घटना नाही, यामागे अनेक पदर दडलेले आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन दशके पिंपरी चिंचवड शहरावर वर्चस्व गाजवलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे मागील वर्षी निधन झाले.
प्रचंड ऊर्जा, जबरी महत्वाकांक्षा आणि तूफानी जिद्द हा लक्ष्मण जगताप यांचा यूएसपी होता. आपल्या हयातीत शहरात ते म्हणतील व ठरवतील तो महापौर व स्थायी समिती अध्यक्ष हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं. सगळी यंत्रणा, वकूब, ताकद असूनही खासदार होणं हे त्यांचे स्वप्न होतं परंतू ते स्वप्नंच राहिलं …!
जगताप यांचे राजकीय विरोधक असलेले श्रीरंग बारणे यांच्याबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अक्षरशः मनाला मुरड घालून त्यांना रिंगणातून माघार घ्यावी लागली होती.मात्र तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उद्धव ठाकरे, संजय राऊत आदी नेत्यांच्या झोपा उडवल्या होत्या. मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्मण जगताप यांच्या किती नाकदुऱ्या काढाव्या लागल्या हे सर्व शहराला दिसून आलं होतं. त्यामुळे म्हणूनच संजोग वाघेरे यांनी जगताप यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करणं यास मोठा अर्थ आहे.
राजकारणात कधी कधी “ब्लाइंड गेम” खेळावा लागतो आणि तो यालाच म्हणतात, हे या निमित्ताने दिसून आलं आहे. वास्तविक मावळ लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी असणार यातील तिळमात्र शंका नाही. शिवसेनेचे श्रीरंग बारणे व शिवसेनेचेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संजोग वाघेरे यांच्यातील हा सामना आहे. आणि विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार घाटावरील अर्थात पिंपरी चिंचवडमधीलच आहेत,हे वैशिष्ट आहे .मावळ लोकसभा जिंकण्याचा मार्ग चिंचवड विधानसभेच्या पोटातून जातो, हे अर्धसत्य आहे कारण राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेला चिंचवड आणि या चिंचवडच्या आमदार सध्या भाजपच्या अश्विनीताई लक्ष्मण जगताप आहेत. पक्षनिष्ठा, आदेश विरुद्ध भावना आणि स्वप्न असे सध्या तरी या सामन्याचे स्वरूप म्हणावे लागेल. संयमी,
मृदू व शांत प्रकृती व स्वभाव हे गाववाला असूनही संजोग वाघेरे यांचे बलस्थान समजले जाते. त्यांचे वडील कै. भिकू वाघेरे यांनी १९६० च्या दशकात दामोदर कांबळे, निवृत्ती वाळुंजकर यांना सरपंच व विष्णू कांबळे यांना उपसरपंच करण्यात मोलाचा सहभाग दाखविला होता. एका अर्थाने छत्रपती शाहू महाराजांमधील समतेचा पाया पिंपरीगावात त्यांनी घडवून दाखविला होता. त्यामुळे संजोग वाघेरे यांची कृती वरकरणी राजकारणाचा भाग वाटत असली तरी “बातमी खास” च्या निरीक्षणानुसार पित्याच्या वारशाचेच गुण त्यामधून एक प्रकारे प्रकट होत आहेत. म्हणूनच की काय प्रबोधनकारांच्या नातवाबरोबर काम करत त्यांनी ते अप्रत्यक्षपणे दाखवूनच दिले आहे.