( विजय जगताप)
आगामी विधानसभा लढण्यासाठी भाजपमध्ये राहून राजकीय आत्महत्या करण्यापेक्षा भाजपला आत्ताच ‘टाटा’ करणे सोयीस्कर असल्याचे गणित मांडत प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी अखेर पक्ष सोडला आहे.
प्रदेश प्रवक्ते असलेले व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक अशी प्रतिमा निर्माण केलेले एकनाथ पवार यांच्या भाजप सोडण्याने पिंपरी चिंचवड शहराला खिंडार पडले..? असे म्हणणे अतिशोयक्ती म्हणता येईल. कारण मोदी लाटेचे आगमन होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड भाजपाचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी निवडून आलेले नगरसेवक हा मोठा चिंतेचा भाग म्हणता येईल. त्याचा दोष पवारांनाही देता येणार नाही कारण भाजपाचा जीवच सगळ्या राज्यात तोळामोसाचा होता व शिवसेनेची कुबडी घेऊनच भाजपची राज्यात वाढ होत असल्याचा तो काळ होता.
मात्र उत्तम संघटन कौशल्य, कामगार नेतृत्व करणारा लढाऊ कार्यकर्ता आता भाजपात नसणार.. एवढीच काय ती पोकळी शहर भाजपमध्ये निर्माण झाली आहे.
२०१४ मध्ये मोदी लाट देशभरात निर्माण झाल्याच्या काळात तत्कालीन भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती, मात्र भोसरी मतदार संघात आमदार महेश लांडगे यांचे निर्माण झालेले वर्चस्व पाहता इतर कुठल्याही राजकीय पक्षात जाऊन लांडगे यांना हरवणे सोपे नसल्याचे गणित मांडत मागील चार वर्षांपासून त्यांनी आपल्या गावाकडे (नांदेड)अधिक लक्ष केंद्रित केले होते. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी चर्चेतील प्रमुख नाव म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. येथील एकूण एक वाड्या वस्त्या पिंजून काढत मागील चार वर्षात त्यांनी समाजसेवी रूपी कामांचा व नागरी संपर्काचा डोंगर निश्चित उभा केला आहे. पवार यांनी भाजप सोडण्यामागचे कारण पत्रकार परिषदेत वेगळे दिले असले तरी भाजपला सोडचिठ्ठी देण्यामागची त्यांची खरी मेख वेगळी आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीला प्रचंड अनुकूल असल्याची स्थिती आहे. नुकत्याच झालेल्या लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय येथून मिळवला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात श्री पवार यांचे चांगले नाव व बस्तान बसलेले आहे, मात्र त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी असल्याने व ती गरजेची देखील असल्याने त्यांचे जाणे योग्यच असल्याचे ‘बातमी खास’चे निरीक्षण आहे.