(विजय जगताप )
आजपर्यंतच्या आपल्या राजकीय व सार्वजनिक जीवनात भल्याभल्यांचा न बोलता ‘कार्यक्रम’ करण्यात ख्याती असलेल्या शरद पवारांनी काल लोणावळ्यात मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनिल शेळके यांना थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कारण ज्यांचा सामना थेट देशाच्या पंतप्रधान व गॄहमंत्र्यांशी आहे ते शरद पवार तुलनेने अतिशय ज्युनिअर असलेल्या आमदार शेळके यांना आव्हान देऊच शकत नाही. शेळकेंवर नेम धरून बाण मात्र अजित दादांना लागेल असे पवारांनी दाखवून दिले आहे.
आपले राजकीय आडाखे,डाव व खेळ्या कधीच उघड न करणे आणि आपल्या उजव्या हाताची कामगिरी डाव्या हाताला देखील कळू न देणे, यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार प्रसिद्ध आहेत. गुरुवारी (ता.७) रोजी लोणावळा येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्यांनी, माजी मंत्री मदन बाफना यांच्या वक्तव्याचा आधार घेत, मावळचे आमदार सुनील शेळके यांना दिलेल्या आव्हानामागची खरी मेख उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना इशारा देणारी आहे.
‘एका दगडात तीन पक्षी मारणे’ अशा अर्थाची वाक्यरचना तसेच म्हण मराठी भाषेत खूप प्रसिद्ध आहे. थोडक्यात शरद पवार यांनीही कालच्या एका इशारात भाजपला, अजित पवार गटाला, आणि आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना असे एकत्रित तीन डोस पाजले आहेत.
महायुतीच्या जागा वाटपात बारामतीची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडणे, ही मोठी रिस्क असल्याची भाजपच्या वर्तुळात आजही चर्चा आहे, तर अजित दादांना ही जागा जिंकून ‘आपणच बारामतीचे लोहपुरुष आहोत’ हे सिद्ध करून दाखवायचे आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट)एक आकडी जागा सोडण्यास तयारी दर्शवली असल्याचे वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झाले आहे. भाजपला एक एक जागा जिंकणे महत्त्वाचे असल्याने ते ,जनमताचा कल, निर्माण झालेले न्यारेटिव्ह, व सद्यस्थिती (ग्राउंड रिॲलिटी) याबाबत कमालीची दक्षता घेत आहेत. थोडक्यात शरद पवारांच्या इशा-याने भाजप सावध झाली असून वय ,आजारपणाच्या मर्यादा हे सर्व झुगारून दिल्याचा आत्मविश्वास पवारांनी या इशाऱ्यातून न बोलता भाजपला पहिल्या डोस मधूनच दाखवून दिला आहे.
आपण निर्माण केलेला पक्ष आपल्या डोळ्यादेखत अजित पवारांनी हिसकावल्याची जबर वेदना शरद पवारांना ठसत आहे. “शिरूरचे खासदार अमोल कोल्हे कसे निवडून येतात हे बघतो “..असे मध्यंतरी अजित दादांनी म्हटले होते, याचबरोबर आपल्याच बारामतीत आपल्याला डिवचण्याची सुरू असलेली तयारी आदी प्रकार पाहता अजित दादांना थेट आव्हान देणारे कडक इंजेक्शन दाखवण्याची गरज होती, ती लोणावळ्यातील बैठकीत शरद पवारांनी दुसऱ्या डोसमधून पूर्ण केली.
तिसरा डोस शरद पवारांनी यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना दिला आहे .केंद्र तसेच राज्यात आपली सत्ता नसणे, आपले वय व धावपळीला असलेल्या मर्यादा यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक असणे, महाविकास आघाडी टिकेल की नाही व ऑक्टोबर मध्ये पुन्हा सत्तेवर येईल की नाही? याबद्दल ही कार्यकर्ते साशंक आहेत. या साऱ्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखदीला पवारांनी ‘सुरुंग लावून स्फोट घडवावा’ त्याप्रमाणे “मी रणांगणावर लढायला तयार आहे ..काळजी करू नका” असा प्रचंड विश्वास आपल्या मंडळींना या इशारेवजा तिस-या डोसमधून दाखवून दिला आहे.
एकूणच शरद पवार यांनी आपल्या राजकारणाचे पत्ते अद्याप काहीच उघडलेले नाहीत, जसजसे वातावरण तापेल तसतसे ते एकेक पत्ता बाहेर काढतील, याबाबत काही शंका नाही. कुठल्याही परिस्थितीत यंदा बारामती जिंकणे ही भाजपची तीव्र महत्वाकांक्षा आहे तर कुठल्याही परिस्थितीत बारामतीत आपला पराभव घडू द्यायचा नाही, असा शरद पवारांचा प्रयत्न आहे. भाजपच्या प्रत्येक चालीला चोख उत्तर देण्यासाठी कदाचित ऐनवेळी स्वतः शरद पवार बारामतीतून निवडणूक लढवू शकतात आणि सुप्रिया सुळे यांना माढामध्ये पाठवू शकतात ? कारण धक्कातंत्र देण्यात शरद पवार मशहूर आहेत.आणि समजा असे झालेच तर निकाल काय लागेल हे सांगायला भविष्य वाल्यांची गरज नसणार आहे.