विजय जगताप –
शिरूर आणि मावळमधील सततच्या अपयशाचा शिक्का बुजविण्यासाठी प्रचारात व संपर्कात प्रचंड वेग येण्यासाठी राष्ट्रवादीने कधी नव्हे ती इतकी जोरात कंबर कसली आहे. डॉ. अमोल कोल्हे व पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होऊन ४८ तासही होत नाही, तोच जाहीर प्रचार सभांचे आयोजन करून ‘सबसे तेज’ आघाडी घेतली आहे. तर मावळ मधून सेनेची उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याने युतीमधील भाजपचे व सेनेचे कार्यकर्ते निरोपाची वाट पहात असल्याचे चित्र आहे.
सलग तीन वेळा शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीला जिंकण्यात अपयश आलेले आहे. तर मावळमधूनही सलग दोन वेळा पराभवाची चव चाखावी लागल्याने आपल्या हक्काच्या पुणे जिल्ह्यातच शिवसेनेकडून आपली डाळ शिजत नसल्याची भावना शरद पवार व अजित पवार यांना प्रचंड आस्वस्थ करून गेली आहे. तर दोन वर्षांपूर्वी पिंपरी महापालिकाही हातातून गेल्याने आपला पक्ष आता या शहरातून व या दोन मतदारसंघातून व्हेंटिलिटरवर जातो की काय? या काळजीने राष्ट्रवादीला पछाडले आहे.
त्याचाच भाग म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुंबईतून मावळसाठी पार्थ पवार व शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांची नावे जाहीर होत नाही तोच अवघ्या ४८ तासाच्या आत रविवारी सकाळी चाकण येथे कोल्हेंसाठी व सायंकाळी चिंचवड येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा लावून राष्ट्रवादीने प्रचारात तरी फॉर्म भरायच्या आधीच बार उडवून दिला आहे.
यंदाच्या लोकसभेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही निवडणूक तरुणाईच्या हातात असल्यामुळे जाणीवपूर्वक शरद पवार यांनी शिरूरमधून डॉ. कोल्हे व मावळमधून पार्थ यांना उमेदवारी दिली आहे. आज सकाळी चाकणला झालेल्या सभेत आख्खी तरुणाई डॉ. अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी वेडी झाल्याचे चित्र होते. तर राष्ट्रवादीचे मंगलदास बांदल यांनी आपली तलवार म्यान करून व्यासपीठावर लावलेली हजेरी चर्चेचा विषय होती.