( विजय जगताप, सचिन जगताप, राहुल जगताप यांचा’आॅन द स्पाॅट’रिपोर्ट)
पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासात एकाच दिवशी ९४ जणांचा मृत्यू होऊ शकतो व अंत्यसंस्कारासाठी तास न् तास प्रतिक्षा करावी लागू शकते?अशी कल्पनाही स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या या शहराबद्दल कधी कोणी केली नसेल.
परंतू हे प्रत्यक्षात घडलं होतं व कोरोनाने ते घडवून आणलं होतं.कोरोनाच्या दुस-या लाटेने घातलेल्या विळख्यात भारतातील प्रमुख शहरांप्रमाणे पिंपरी चिंचवड हे शहर देखील सापडलंय….मागील एक महिन्यापासून दररोजची दोन अडीच हजारांच्या आसपास आढळून येणारी रूग्णसंख्या, त्यातच रेमडिसिव्हरची टंचाई निर्माण झाल्यापासून वीसच्या पुढेच असलेले दररोजच्या मृत्यूंचे आकडे शनिवारी ( २४ एप्रिल) तर ८१ संख्येपर्यंत पोहोचले आणि पालिका प्रशासनासह शहरातील सर्वच नागरिकांच्या काळजाचे ठोके वाढण्यास सुरूवात झाली.
मृत्यूदर वाढतोय व विद्युतदाहिन्या अपु-या पडणार याची जाणीव झालेल्या पालिकेने स्वखर्चाने कोरोनामुळे मृत पावलेल्यांचे अंत्यसंस्कारासाठी मागील आठवड्यापासून सरपणाचीही सोय केलेली होती.
शनिवारच्या ८१ जणांच्या मृत्यूमुळे शहरातील निगडी,सांगवी,भोसरी,लिंक रोड चिंचवड,व नेहरूनगर येथील स्मशानभूमींवर अंत्यसंस्कारासाठी ताण पडतोय हे लक्षात आल्याने पालिकेने रविवारी (२५ एप्रिल ) ला तातडीने दुपारी पत्रक प्रसिद्धीस काढून या पाच स्मशानभूमींबरोबरच मोरवाडी,काळेवाडी, पिंपळे गुरव व पिंपरी नगर येथेही कोरोनाने मृत पावलेल्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील असे जाहीर केले.मात्र शहरातील नागरिकांना ते समजायला सोमवार उजाडणार होता. दरम्यान रविवारचा आजपर्यंतचा सर्वाधिक हादरवून सोडणारा ९४ जणांचा मृत्यूचा आकडा साडेचारच्या सुमारास पालिकेने जाहीर केला.
९४ जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील (कोरोना मृतांसाठी)जाहीर करण्यात आलेल्या पाच राखीव स्मशानभूमींवर अंत्यसंस्कारासाठी शंभर टक्के ताण येणार, याची मला कल्पना आली.सरपण असलेली चिता पूर्ण व्हायला व राख थंड व्हायला १० ते १३ तास लागतात. निगडी, सांगवी, भोसरी, लिंक रोड व नेहरूनगर येथील स्मशानभूमींमध्ये एकाच वेळी तीन ते जास्तीत जास्त चार मृतदेहांना अग्नी देता येऊ शकतो अशी स्थिती मी पाहिलेली होती. आजवर इतके मृत्यू एकाच दिवशी कधीच झालेले नसल्याने स्मशानभूमी वाढवाव्यात किंवा शेडची संख्या वाढविण्याचे कल्पना कधी कुणी केलेली नव्हती.त्यातच मृत्यूंची इतकी मोठी संख्या असल्याने गॅस वाहिनी असो की विद्युत दाहिनी की पारंपरिक सरपण रचून करावयाचा विधी यामध्ये वेळ लागणार हे माझ्या मनाने ताडले.माझे चुलत बंधू सचिन व राहुल हे पण माझ्यासमवेत निघाले.
वास्तविक रविवारी दुपारच्या साडेबारापासूनच शववाहिका समशानभूमीत यायला सुरूवात झाली होती. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना कळविल्यानंतर संबंधित रुग्णालयातच मृतदेह पाहणे व शेवटचे दर्शन घेणे हा गेल्या एक वर्षापासून नातेवाईकांचा जणू प्रघात पडला होता.काही नातेवाईक तर फक्त सही करायला येतो…आम्हाला मृतदेह दाखवू पण नका…थेट तुम्हीच अंत्यसंस्कार करा..असे धीटपणे बोलणारे देखील होते.
लिंक रोड चिंचवड येथील स्मशानभूमीत रात्री साडेनऊला आम्ही तिघे पोहोचलो.चार ॲमब्युलन्स रांगेत उभ्या दिसल्या.भोसरी व निगडीत अंत्यसंस्कारासाठी जागा न मिळाल्याने लिंक रोड येथे जागा मिळेल असे चालकांना वाटले असावे बहुधा…!
लिंक रोड येथे विद्युत वाहिनी वगळता पारंपारिक पध्दतीने एकाच वेळी तीन अंत्यसंस्कार होतील असे शेड आहे . परंतू आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन येथील काळजीवाहकांनी या स्मशानभूमीत एकाचवेळी आठ मृतदेहांना अग्नी देऊन टाकला होता.एरव्ही मृतदेह जळत असताना नागरिक बहुसंख्येने जिथे उभे असतात, शोक सभा व शोकसंदेश व्यक्त करतात तिथेही सरपण रचून चिता पेटविण्यात आल्या होत्या.भयानक व भेसूर असे हे चित्र होते. ज्वाळा व धूरांचे लोट संपूर्ण स्मशानभूमीत पसरलेले होते.जागा थोडीशी जरी उपलब्ध झाली की इशारा दिला जायचा.मग ॲमब्युलन्स गाडी गेटजवळ आणल्यानंतर दरवाजा उघडून प्लॅस्टिकमध्ये पॅक केलेला मृतदेह स्ट्रेचरवर पीपीई किट घातलेले तीन कर्मचारी ठेवायचे.मृताचे नातेवाईक आलेत का नाही हे नजर फिरवून ते एकदा बघत. नसेल कोणी आलेले तर स्मशानपास तेथील कर्मचा-याकडे देत व मृतदेह उचलून रचून ठेवलेल्या सरपणापाशी ते आणून ठेवत.एखादया मृताचे नातेवाईक आलेच तर त्यांनी आणलेला हार व शाल ते कर्मचा-यांकडे देत व पुढे मृतदेहावर ते चढवले जात.
अस्वस्थ करणारे व काळीज चिरून जाणारे ते दृश्य होते.गेल्या वीस वर्षात आग, अपघात, डेडहाऊस,स्फोट अशा अनेक ठिकाणी पत्रकार असल्याने थेट जाण्याचा संबंध मला आला होता.परंतू कोरोनाचे मृतदेह व अंत्यविधी पाहणे प्रथमच हादरवून सोडणारा अनुभव होता.
लिंक रोड स्मशानभूमीनंतर सांगवी येथे मध्यरात्री आम्ही गेलो.अडीच वाजत आले तरी तीन पारंपरिक पध्दतीने चिता पेटत असलेल्या दिसत होत्या.तर गॅसवाहिनीजवळ एक मृतदेह घेऊन दोन कर्मचारी प्रतिक्षेत होते.कोणीच कोणाशी बोलत नव्हते.काही मिनिटे जात नाही तोच तीन मृतदेह घेऊन दोन ॲमब्युलन्स तेथे आल्या.एका यांत्रिक मशीनसारखे खुणेनेच स्मशानभूमीतील काळजीवाहक कर्मचारी आता ह्यांचा नंबर व नंतर तुमचा असे चालकांना सांगत होते.घाई, गडबड, रांगेत तिष्ठत असल्याचा संताप कोणीच व्यक्त करीत नव्हते.कोरोनाने जगाला धडा शिकविला होता.परंतू कोरोनाग्रस्तांची सेवा करणारे आज खरे वीर ठरले आहेत.या कोरोना योध्दयांना सलाम करीत पहाटे आम्ही घरची वाट धरली.