विजय जगताप –
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर जवळ श्री साई शिवनेरी नावाचे हॉटेल आहे. जर तुम्ही या हॉटेलमध्ये चहापानी किंवा जेवणासाठी थांबलात तर जाताना मात्र तुम्हाला एक भेट स्विकारावी लागेल. ती भेट असेल पुस्तकाची..! हे पुस्तक जरूर वाचणार! असे तुम्ही म्हणाल तर फसाल बरं..? कारण तुम्ही पुस्तक वाचले का? आणि त्यामधले काय आवडलं? अशी प्रेमळ विचारणा नंतर झाली तर मग तुम्हाला ते पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही.
वाचनाचे सध्या कमी होत चाललेले प्रमाण पाहता वाचन चळवळीपुढे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. युवा पिढीने तर ‘वाचायचे कशासाठी’? हाच सूर सध्याच्या मोबाईल युगात आवळला आहे.
वाचनसंस्कृती लोप पावते की काय? अशी चिंता असताना मात्र साहित्य, कला, संगीत या तीनही क्षेत्रांवर नितांत प्रेम व निष्ठा असलेले रोहित खर्गे ही व्यक्ती मात्र ही चळवळ जगवण्यासाठी व टिकवण्यासाठी धडपड करीत आहे.
मुळचे जुन्नरचे परंतू आयुष्याचा बराचसा काळ पिंपरी चिंचवड मध्ये काढलेल्या रोहित खर्गे यांनी १ जून २०१८ रोजी भागीदारीत दौंड येथील कुरकुंभ एमआयडीसी जवळ साई सहयाद्री नावाचे हॉटेल सुरू केले. या हॉटेलचे उद्घाटनही साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुरूषोत्तम सदाफुले (कामगार साहित्य परिषद अध्यक्ष) व सुदाम भोरे यांच्या हस्ते केले होते. या हॉटेलमध्ये येणाऱ्या पहिल्या ग्राहकास त्यांनी दररोज एक पुस्तक भेट देण्याची सुरुवात केली. साहित्य कलेची सेवा यानिमित्ताने का होईना करण्याचे त्यांनी ठरवून ग्राहकांना ते पुस्तक भेट तर देतात शिवाय सेल्फी काढून सोशल मिडियात त्याचा प्रभावी प्रचार व प्रसारही करतात. नुकतेच त्यांनी २३ डिसेंबर २०१८ रोजी ला राजगुरूनगर येथे स्वत:चे श्री साई शिवनेरी हॉटेल सुरू केले. ही परंपरा या हॉटेलमध्येही त्यांनी कायम ठेवली आहे. हरहुन्नरी कला रसिक व्यक्तिमत्व असलेले रोहित खर्गे यांना मैत्री जमविण्याचा छंद आहे. बोलका स्वभाव असल्यामुळे मैत्रीचा धागा विणण्यात ते पटाईत आहेत. ही मैत्री सर्व सामान्य माणसापासून चित्रपट व नाटय कलावंतापर्यंत त्यांनी वाढविली आहे. डॉ. अमोल कोल्हे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, शंतनु मोघे, भाऊराव कऱ्हाडे, केदार शिंदे, आदी मंडळीचे ते ‘फॅन’ नाही तर हे सारे रोहित खर्गे यांचे ‘फॅन’ आहेत. मोबाईल युगाचा १९९६ मध्ये जन्म झाला. तर २००२ ला रिंगटोन आपल्या मनासारखी ठेवण्याची सोय झाली. तेव्हापासून त्यांनी आपल्या मोबाईलची रिंग ‘जिंदगी का नाम दोस्ती… दोस्ती का नाम जिंदगी’ या गाण्याची ठेवली आहे. यश, अपयश, समस्या, संकट, दु:ख यामधून कोणाचीही सुटका नाही; परंतु क्षणभंगूर असलेल्या या जीवनात माणसे कमावणे, आनंद वाटणे, पुस्तकाच्या माध्यमातून विचार रूजविणे यासाठी झटत असलेला हा ‘मुसाफिर’ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे व्रत निभावणार आहे.