जी परिक्षा पास होण्यासाठी बुद्धीचा कस लागतो आणि तिथलं प्रशिक्षण व शिस्त म्हणजे ‘बाप…रे’ या शब्दाची ताकद दाखवून देतं… असं केंद्र म्हणजे पुण्यातील एनडीए. भारतीय संरक्षण दलातील अधिकारी निवडण्याचं जगातील सर्वोच्च सेंटर असलेल्या या एनडीएमध्ये साहिल बिर्जे हा मुलगा आपल्या पिंपरी-चिंचवडचे नाव अभिमानाने मिरवत आहे.
साहिल विजय बिर्जे (वय १८) एलआयजी कॉलनी, सिंधुनगर प्राधिकरण येथे राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलाने संरक्षण खात्याशी संबंधित कुठलीही पार्श्वभूमी नसताना नुकत्याच झालेल्या एनडीएच्या परिक्षेमध्ये देशात ५४ वा क्रमांक मिळवून शहराची मान व शान अभिमानाने उंच केली आहे. विशेष म्हणजे सर्व सामान्य बुद्धांकाची साईड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला शाखेतून तो बारावी झाला आहे. देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयातून दहावी व बारावीलाही ९२ टक्के गुण मिळविलेल्या साहिलच्या अचाट व अफाट बुद्धीची कल्पना आल्यानंतर पालकांच्या सल्ल्यानुसार आय.ए.एस.ची तो तयारी करू लागला. त्याचबरोबर एनडीएची परिक्षा देण्याचेही त्याने प्रयत्न सुरू केले. दोन वेळा या प्रयत्नात त्याला अपयशही आलं; परंतु संधी कधी, कुठे व कशी निर्माण होईल हे सांगता येत नसते. प्राधिकरणातील वीर सावरकर मंडळाने एनडीए परिक्षेची तयारी करण्यासाठी गेल्या वर्षी वर्ग सुरू केले आणि साहिलने तिथे प्रवेश घेतला. या मंडळाने नेमलेले प्रशिक्षक बलजीतसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली साहिलने परिक्षेची तयारी सुरू केली आणि या मंडळाचा पहिला विद्यार्थी एनडीएत निवडल्याचे सिद्ध करून दाखविले.
जनरेटरचे स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करणारे साहिलचे वडील विजय बिर्जे यांची थोरली मुलगी नेहा हिने देखील कला शाखेतून एमए केलं (भूगोल विषयात) असून नुकतीच तिची मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय जीपीएस कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. साहिलच्या प्रशिक्षणास २७ डिसेंबर २०१८ पासून सुरुवात झाली असून त्याने संरक्षण दलात विशेष नोंद घेतली जाणाऱ्या सैन्यदलाची निवड केली आहे. येत्या ३ वर्षात लेफ्टनंट होऊन साहिल बाहेर पडेल.
आपल्या मुलाचे कौतुक अभिमानाने त्याचे वडील विजय बिर्जे इतरांना सांगतात. विजय बिर्जे यांना ट्रेकिंगची आवड. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आपल्या वडिलांचे निधन झाल्याचा धक्का बसलेल्या विजय बिर्जे यांनी चालणे, पळणे व ट्रेकिंग करणे हीच आपली जीवनसूत्री मानली. आणि याच संस्कारात साहिल घडला. भारतात ट्रेकिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या उत्तराखंड येथील नेहरू माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट
(नीम) आणि काश्मिर मधील जवाहरलाल माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट (जीम) या दोन्ही ठिकाणचे ट्रेकिंगचे कोर्स साहिलने वयाच्या १६ व्या वर्षी पूर्ण केले. ते पण एकट्यालाच काश्मीरला व उत्तराखंडला पाठवून. ‘तुला तीनही भाषा येतात ना, जग समजण्यासाठी मोबाईल वापरता येतो ना? मग जा एकटा धाडसाने कुठेही…! अशा रितीने विजय बिर्जे यांनी साहिलला मोकळं सोडलं.
साहिलच्या चाणाक्ष बुद्धीबद्दल ते म्हणतात, ‘‘पिंपरी महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना तो ‘आयडॉल’ मानतो. अतिक्रमण कारवाई असो, सारथी प्रकल्पाची मांडणी असो की राजकीय दबावाला झुगारण्याची क्षमता असो साहिल वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा फॅन बनला. माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या चाणक्य मंडळात सीटीएस (CTS) परिक्षा देताना त्याने भारताचा मुख्य शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे हे उदाहरणासह स्पष्ट करून धर्माधिकारी यांनाही चकीत केले होते.
साहिलच्या यशस्वी भरारीसाठी ‘बातमी खास’ परिवारातर्फे त्यास खूप साऱ्या शुभेच्छा..!