( विजय जगताप)
‘ ये दिवार टूटती क्यों नही’? अशा आशयाची बिर्ला सिमेंटची एक भारी जाहिरात आहे. तसं ‘ ये उध्दवकी सरकार फुटती क्यों नही’ ? असं म्हणण्याची पाळी भाजपवर आली आहे.
हे तीन पक्ष एकत्र येऊ शकत नाही, आणि आले तरी सहा महिनेपण टिकू शकणार नाही अशी भविष्यवाणी करणा-या भाजपचा ज्योतिषशास्त्रावरील विश्वास लवकरच उडून जातो की काय,अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.सरकारला व विशेषत: उध्दव ठाकरेंना घेरण्याची कुठलीच संधी मिळत नव्हती तेव्हा त्यांनी शेवटी राज्यपाल नियुक्तीच्या प्रस्तावावरून ठाकरे यांना उच्च न्यायालयाच्या सापळयात अडकविण्याची चाल खेळली मात्र तीदेखील फेल गेल्याने आता हताश व्हायची पाळी त्यांच्यावर आली आहे.
ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्य प्रस्तावावर आता राज्यपाल निर्णय घेतील तेव्हा घेतील परंतू आता यापुढे ताकही फुंकून प्यायचे असे भाजपवाले नक्की ठरवतील अशी चिन्हे आहेत.राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या होणा-या या तडफडीचे खरे शल्य राज्यातील सोन्यासारखी सत्ता हातून गेल्याचे आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस होत नाही तोच राज्यात कोरोनाने डोके वर काढले.आता राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ दिली तरी अडचण आणि नाही दिली तरी अडचण अशा गर्तेत भाजप सुरूवातीला होता.तरीही त्यांनी लोकांना कोरोनासाठीचा मदतनिधी पीएम केअरकडे देण्याचे सांगून आपली या सरकारबरोबरची स्पर्धा निकोप नाही तर अढीबाज असल्याचे दाखवून दिले.
वांद्रे प्रकरणातही सरकारला घेरण्याचा ठोस धागा त्यांना सापडला नाही कारण वांद्रेसारखी सेम त-हा त्याच दिवशी गुजरातमध्ये झाली होती.पालघर प्रकरण व उच्च न्यायालयात गेलेले ठाकरे यांचे राज्यपाल नियुक्त सदस्य प्रकरण एकाच वेळी घडले.पालघर प्रकरणात कुठलाच रंग मिसळला न गेल्याने शिव्या-शाप, संताप व आख्ख्या गावाला संपवून टाकण्याच्या भाषे व्यतिरिक्त त्यांना काहीच करता आले नाही.राहिला प्रश्न ठाकरेंना उच्च न्यायालयात घेरण्याचा परंतू तिथेही न्यायालयाने राज्यपालच निर्णय घेतील असे सांगितल्याने अप्रत्यक्षरित्या आता राज्यपालांनाच या निवडीबाबत सोक्षमोक्ष लावायची पाळी आली आहे.खरं तर याच राज्यपालांनी पाच महिन्यांपूर्वी भल्या पहाटे शपथविधी उरकण्यासाठी जी तत्परता दाखविली होती तेवढी तत्परता १२ दिवस लोटले तरी दाखविली नाही हे विशेष म्हणावं लागेल.राज्यपालपदाची सूत्रे ताब्यात घेताना संविधान आणि कायद्याला साक्ष ठेऊन प्रत्येक राज्यपालाला शपथ घ्यावी लागते महाराष्ट्राचे राज्यपालही त्याला अपवाद नव्हते.परंतू तशी कृती त्यांच्याकडून घडत नाही .
राज्यात कोरोनाचे गंभीर संकट व एकूणच संपूर्ण महाराष्ट्र भिती व दु:खाच्या छायेत असतानाही ठाकरेंना अडचणीत आणण्याची ही किंचितसी सापटही भाजपने सोडली नाही ,वास्तविक राज्य कोलमडून पडले असताना राज्यपाल नियुक्त सदस्यपदावरून अशावेळी जन्मोजन्मीच्या वै-याने देखील खुसपट काढण्याचे टाळले असते. हे असं वागणं म्हणजे सरळसरळ मैतीच्या ठिकाणी वाढदिवसाचा केक कापण्यासारखे होते. परंतू संकटातही संधी शोधावी तसं भाजपच्या राजेश पिल्ले यांनी याचिका दाखल करून स्वतःचे व पक्षाचे हसे करून घेतले.
कोरोनामुळे राज्याने आर्थिकदृष्टया खरोखर मान टाकलीय तर या कोरोनामुळेच व षडयंत्री कारवायांमुळेच उध्दव यांची मान अजून ताठ होत त्यांचा टीआरपी कमालीचा वाढला आहे.